PM Modi Shirdi Visit: शेवगाव : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या शिर्डी (Shirdi Visit) दौऱ्यासाठी नागरिकांना घेण्यासाठी आलेल्या गाड्या परत पाठवण्यात आल्या आहेत. गावबंदी असल्यानं शेवगाव तालुक्यातील मठाचीवाडी येथील मराठा समाजाच्या वतीनं निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, मनोज जरांगेंच्या आवाहानानंतर मंत्री विखे यांच्या कुटुंबीयांविरोधात मठाचीवाडी येथील सकल मराठा समाज आक्रमक झाल्याचंही पाहायला मिळत आहे.


शेवगाव तालुक्यातील भातकूडगाव येथे पंतप्रधान मोदींच्या सभेसाठी जाणाऱ्या बसेस अडवण्यात आल्या आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील सकल मराठा समाज आक्रमक झाला असून गावागावत नेत्यांना गावबंदी केली जात आहे. भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे यांची गाडी देखील अडवण्यात आली आहे.
तसेच, काही गावकऱ्यांनी मराठा आरक्षणाबाबत अरुण मुंडे यांना देखील जाब विचारला आहे. 


पंतप्रधान मोदी आज शिर्डी दौऱ्यावर 


पंतप्रधान नरेंद्र मोदी आज शिर्डीतील साईमंदिरात दर्शनासाठी येणार आहे. दुपारी 1 वाजता पंतप्रधान मोदी साईमंदिरात दर्शन घेतील. मोदींच्या हस्ते साईबाबांची पाद्यपूजा आणि आरती होईल. साईबाबा संस्थानच्या वतीने पंतप्रधानांचा सत्कार केला जाईल. मात्र पंतप्रधान मंदिरात असताना अर्ध्यातासाठी दर्शन रांग बंद राहणार आहे. दरम्यान पंतप्रधान मोदींच्या हस्ते अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी आणि अकोले या दोन ठिकाणी विविध प्रकल्पांचा लोकार्पण सोहळा होणार आहे. 2018 मध्ये साई समाधी शताब्दी सोहळ्या निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी शिर्डीत आले होते, त्यानंतर पाच वर्षांनी पंतप्रधान मोदी साई समाधीचे दर्शन घेतील.


हिंगोलीत मराठा आरक्षणासाठी ग्रामपंचायतीचा निवडणुकांवर बहिष्कार 


मराठा आरक्षणाची धग आता खेडोपाड्यातसुद्धा वाढू लागली आहे हिंगोलीच्या वडगाव या गावांमध्ये मराठा आरक्षणासाठी ग्रामपंचायतीने निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे तसा ठराव सुद्धा ग्रामपंचायत ने घेतला आहे त्याचबरोबर मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या सर्व राजकीय पुढारी आणि नेते मंडळींना गावात प्रवेश बंदी करण्यात आली आहे तशा आशयाचे बॅनरच गावामध्ये लावण्यात आले आहे त्यामुळे जोपर्यंत मराठा आरक्षण ओबीसी मधून मिळत नाही तोपर्यंत गावांमध्ये सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांना गावबंदी असणार आहे


मराठा समाज आक्रमक, राजकीय नेत्यांना गावबंदी


मागील काही दिवसांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला आहे. त्यामुळे मराठा समाजाकडून आता वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करून सरकारचे लक्ष वेधण्यात येत आहे. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर अनेक गावात राजकीय नेत्यांना बंदी घालण्यात आली आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत गावात कोणत्याही राजकीय नेत्यांना प्रवेश दिले जाणार नसल्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे. तसेच, गावात राजकीय नेते किंवा लोकप्रतिनिधी आल्यास त्यांना विरोध करण्यात येत आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा आता ग्रामीण भागात देखील तापतांना दिसत आहे. 


जरांगे आमरण उपोषणावर ठाम


सरकारला देण्यात आलेली 40 दिवसांची मुदत संपल्यानं मनोज जरांगे यांनी पुन्हा जालना येथील आंतरवाली सराटी गावात उपोषणाला सुरुवात केली आहे. बुधवारपासून आपण आमरण उपोषण सुरू केल्याची घोषणा देखील जरांगे यांनी केली होती. मात्र, छत्रपती संभाजीराजे यांनी जरांगे यांची भेट घेऊन उपोषणादरम्यान पाणी पिण्याचं आवाहन केलं होतं. त्यामुळे संभाजीराजे यांचा मान राखत आपण पहिल्या दिवशी पाणी घेणार असून, आजपासून म्हणजेच, आजपासून जरांगे आमरण उपोषण करणार असल्याचो घोषणा जरांगे यांनी केली आहे. त्यामुळे, आज देखील सरकारकडून जरांगे यांच्याशी संपर्क केले जाण्याची शक्यता आहे. तर, त्यानंतर जरांगे यांची भूमिका महत्वाची असणार आहे.