मुंबई: आताच नाही तर गेल्या 10-15 वर्षांपासून छगन भुजबळांच मराठा आरक्षणाला (Maratha Reservation) विरोध आहे असा थेट आरोप मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी केला. जर कुणबीच्या नोंदी (Kunbi Certificate) सापडल्या तर मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण द्यायला त्यांचा विरोध का? भुजबळ (Chhagan Bhujbal) म्हणतात की 50 टक्क्यांच्या वरचं घ्या, आम्ही ओबीसी असलो तर आम्ही का घेऊ वेगळं आरक्षण? असे प्रश्नही त्यांनी विचारले. मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे पाटील हे एबीपी माझाच्या माझा कट्टा या कार्यक्रमात आले होते. त्यावेळी त्यांनी मराठा आरक्षण आंदोलनावर भाष्य केलं. 


मनोज जरांगे म्हणाले की, भुजबळांना विरोध हा वैयक्तिक नाही, पण आता त्यांच्यावर बोलणार नाही. आता कुणबीच्या नोंदी सापडल्यानंतर मराठ्यांना वेगळं आरक्षण का? त्यांचा आता विरोध का? कायदा आणि घटना काय सांगते ते पाहा. ज्यांच्या शासकीय नोंदी सापडल्यात त्यांना वरचं आरक्षण का? त्यांना ओबीसीतून आरक्षण देण्याला भुजबळांचा विरोध का? 


त्यांनी एकच सभा घेतली आणि सगळीकडे वाट लावली


छगन भुजबळांचे नाव न घेता मनोज जरांगे म्हणाले की, मराठा आरक्षण मिळवण्यासाठी एक माणून सोडून बाकीच्यांना कुणालाच नाराज करायचं नाही. ते कायद्याच्या मोठ्या पदावर बसलेत पण त्यांनी जातीजातीत तेढ निर्माण केला. आम्ही एवढ्या सभा घेतल्या, त्यांच्यावर सुरुवातीली टीका केली, पण नंतर त्यांच्यावर एकही शब्द बोलायचं नाही असं ठरवलं. पण त्यांनी एकच सभा घेतली आणि सगळीकडे वाट लावली. 


उत्पन्नाचं साधन काय? भुजबळांच्या टीकेला जरांगेंचे उत्तर


छगन भुजबळांनी मनोज जरांगेंच्या सभेला पैसा कुठून येतो, त्यांच्या उत्पन्नाचे साधन काय असा सवाल विचारला होता. त्यावर बोलताना जरांगे म्हणाले की, मी छोटे पैसे बघितले, त्यांनी मोठे पैसे बघितले. त्यांनी कुणाकुणाचे बंगले दाबले, किती पैसे मिळाले हे आम्हाला माहिती आहे. फक्त आरक्षणाची वाट पाहतोय म्हणून आम्ही त्यांच्यावर काही बोलणार नाही. एकदा आरक्षण मिळू दे, मग आपल्या मागे काही नाही, त्यांना सांगतो मग सगळं. आपली पाच सहा एकर जमीन होती, त्यातली दोन तीन एकर जमीन घातली. समाजासाठी काय केलंय ते सांगणार नाही. आता दोन तीन एकर जमीन राहिली आहे, तिकडे भाऊ आणि बाप शेती करतात. आमच्या गरजा काही नाहीत, त्यामुळे शेतीवर कुटुंब चालतं. मी माझ्या गरजा पूर्ण करायला गेलो तर समाजाचं काय? गेल्या दहा बारा वर्षापासून हीच स्थिती आहे.


आपल्याच लोकांकडून हॉटेल जाळून घेतली


आपल्याच लोकांकडून हॉटेल जाळून घेतली आणि बदनाम मात्र गरीब मराठ्यांचं आंदोलन झालं असा आरोप मनोज जरांगे यांनी केला. ते म्हणाले की, ज्या आमदारांची घरं जाळली त्या आमदारांनीच सांगितलं की त्यांची घरं ही मराठा आंदोलकांनी जाळली नाहीत, त्यामागे समाजकंटक होती. 


फडणवीसांचा फोन आलेला


फडणवीसांनी माफी मागितल्यानंतर त्यांच्यावर आम्ही टीका बंद केली. पण त्या आधी त्यांनी पोलिसांची बाजू घेतली. ते म्हणाले की माझ्या पोलिसांना मारलं, मग जनता कुणाची? राज्यातील जनता ही नेत्यांना निवडून देते, त्यामुळे फडणवीसांनी चुकीचं वक्तव्य केलं. पण माफी मागितल्यानंतर मात्र आम्ही त्यांच्यावर टीका बंद केली. त्यानंतर एकदा फडणवीसांचा फोन आला. 


त्यांचा एकतरी बोर्ड शिल्लक राहिल का? 


मनोज जरांगे यांनी सांगितलं की, मुख्यमंत्र्यांना सांगितलं की 24 डिसेंबरपर्यंत वेळ देतो, तुम्ही निर्णय घ्या. त्यानंतर राजकीय नेत्यांना गावबंदी केली होती, ती उठवली. भोकरदानमध्ये एका नेत्याने गावबंदीचे बोर्ड फाडले, ज्यांनी बोर्ड लावले त्यांना मारलं. पण त्यांचे बोर्ड लागणार नाहीत का? आम्ही जर ठरवले तर त्यांचा एक तरी बोर्ड राहिल का?


आमदार-खासदारकी आपली वाट नाही


आमदार खासदारकी नको, ती वाटच वेगळी, आपलं आणि त्याचं काही जमत नाही असं सांगत जरांगे म्हणाले की, साध्या सामान्य लोकांना जे काही पाहिजे ते मिळवतात, ते कुणालाही मॅनेज होत नाहीत, त्यामुळे मग लढा पुढे नेता येतो. आम्ही शांततेची भाषा करतोय पण सरकार आमच्यावरच गुन्हा दाखल करतेय असा आरोपही त्यांनी केला.


या बातम्या वाचा: