रायगड : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) बाबतीत सरकारने काढलेल्या अध्यादेशाला 9 फेब्रुवारीला पंधरा दिवस पूर्ण होणार आहे. त्यामुळे या अध्यादेशाची अंमलबजावणी न झाल्यास 10 फेब्रुवारीपासून पुन्हा एकदा आमरण उपोषण सुरू करणार असल्याचा इशारा मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी दिला आहे. आंतरवाली सराटीमध्येच हे आंदोलन होणार असल्याचं जरांगे म्हणाले आहे. आमचं आंदोलन अजूनही संपलेलं नाही. जोपर्यंत सरकारने काढलेल्या अध्यादेशाचा लाभ मराठा समाजाला होणार नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचा देखील जरांगे म्हणाले आहे.


मराठा समाजाच्या फायद्यापुढे आम्ही दुसरे काही सहन करणार नाही. सगेसोयरेबाबत करण्यात आलेल्या कायद्याची अमलबजावणी करण्यासाठी मी खंबीर आहे. काही ठिकाणी काही दस्तऐवज  सापडत नाही असे सांगितले जात आहेत. ज्यांचा विरोध होत आहे, त्यांच्यासाठी हा कायदा नाही. गरजवंत मराठ्यांसाठी हा कायदा आहे. त्यामुळे विचारवंतानी या कायद्यासाठी मत मांडावे. मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय मी मागे हटणार नाही.  गैरसमज करून घेवू नका. विशेष अधिवेशन बोलावून कायदा पास करावा. तसेच, 9 फेब्रुवारीपर्यंत नवीन अध्यादेशाची अमलबजावणी न झाल्यास 10 फेब्रुवारीला पुन्हा आमरण उपोषण करणार असल्याचे जरांगे म्हणाले आहेत. 


मला शंका सरकारबद्दलच आहे...


यावेळी बोलतांना जरांगे म्हणाले की,'सरकारची समिती काम करीत नाही. कुणाच्या दबावाखाली काम करू नका. सगेसोयऱ्यांना उद्यापासून प्रमाणपत्र देण्यात यावेत. अर्ज दाखल करून देखील प्रमाणपत्र मिळत नाही. हैदराबाद गॅझेट देऊन चार दिवस झाले, मात्र अजूनही तो स्वीकारला नाही. राजपत्रीत अध्यादेश दिला असून, तो टिकवणे सरकारची जबाबदारी आहे. सरकारमध्येच दोन भुमिका दिसत आहेत. 10 तारखेला काढलेला अध्यादेश आम्ही मिडीयाला देणार असून, 10 फेब्रुवारीपासून परत अमरण उपोषण सुरू करणार आहे. 10 तारेखेला हरकतींचे 15 दिवस पुर्ण होत आहेत. मात्र, सरकारमध्येच अर्धे विरोधात आणि अर्धे पाठींबा देतांना पाहायला मिळत आहे. सरकारमधून दोन भुमिका येत असल्याने मी अमरण उपोषणावर बसणार आहे. दिल्लीपर्यंत जाण्याची गरज नसून, मला शंका सरकारबद्दलच असल्याचे मनोज जरांगे म्हणाले आहेत. 


सरकारमधील दोन भुमिका पुढे येवू लागल्यात...


सराकारला एकच व्यक्ती हवा आहे. करोडो मराठे नको असतील, तर मी आंदोलनावर का बसू नयेत. आम्ही 16 फेब्रुवारीपर्यंत काहीच बोलणार नव्हतो. पण, सरकारमधील दोन भुमिका पुढे येवू लागल्याने 10 फेब्रुवारीलाच आंदोलन सुरु करणार आहे. एकीकडे सरकारच्या शिष्टमंडळाकडून अध्यादेश दिला जातो, आणि दुसरीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत जाणार आहेत. सरकारमध्येच दोन भूमिका पाहायला मिळत आहे. त्यामुळे संशय येत आहे. मी 10 तारखेला उपोषणाला बसणार असून, मागे हटणार नाही. गुलालाचा अपमान झाल्यास सरकारला जड जाईल. शिंदे समिती मराठवाड्यामध्ये काम करीत नाही. मराठवाड्यात नोंदी सापडत नाहीत. खालचे अधिकारी ऐकत नाहीत. विभागीय आयुक्तांनी सांगितल्यावर खाली हालचाल होते. गावात सापडलेल्या नोंदीची कागदपत्र ग्रामपंचायतीवर लावले पाहिजे. गुन्हे चार दिवसात मागे घेणार होते. आता तीन महिने होवून गेले, तरी मागे घेतले नाहीत.


अशी असणार आंदोलनाची दिशा...


10 फेब्रुवारीला आंतरवाली सराटीत आमच्या आभ्यासकांची बैठक होणार आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यावर आमचा आताही विश्वास आहे. पण ते अचानक भुमिका बदलतात. आता होणारे अमरण उपोषण हे शेवटचे असेल. एकदाच तुकडा पाडणार आहे. आंदोलनांचे सात टप्पे असणार असून, 9 तारखेला याची घोषणा करणार आहे. आज रायगडावर आलो असून, आता छत्रपती शिवाजी महाराजांची भेट होईल की माहित नाही. आता लढा तीव्र असणार असल्याचे जरांगे म्हणाले आहेत. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


'जरांगे तू कोर्टात येच, दूध का दूध पानी का पानी होईल'; लक्ष्मण हाकेंचा थेट इशारा