CM Eknath Shinde, Majha Maharashtra Majha Vision 2024 : आम्ही विकासाला महत्त्व दिलंय. नवीन महायुतीचं सरकार स्थापन करण्यापूर्वी जे प्रकल्प बंद होते, बंद पाडले होते, त्या सर्व आम्ही दूर केल्या, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. एबीपी माझाचा विशेष कार्यक्रम 'माझा महाराष्ट्र, माझं व्हिजन' यामध्ये मुख्यमंत्र्यांनी हजेरी लावली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं की, समृद्धी महामार्ग, मेट्रो असे अनेक राज्याचे हिताचे आणि विकासासाठीचे प्रकल्प आपण मार्गी लावले. एक विकासाची घोडदौड जोरात सुरु आहे. महाराष्ट्र असं एकमेव राज्य आहे, ज्यामध्ये विकासाचे प्रकल्प मोठ्या प्रकल्पावर राबवले जात आहेत. मेट्रो 3 हा 13 किलोमीटरचा पहिला टप्पा लवकरच पूर्ण होणार आहे. ठाणे, रायगड, पालघर तिन्ही जिल्ह्यांची प्रगती होणार आहे. विकासाचा सर्व सामान्याला फायदा झाला पाहिजे. 


मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका


2019 मध्ये शिवसेना-भाजप युती होती. बाळासाहेब आणि पंतप्रधान मोदींचं फोटो लावून आमच्या उमेदवारांनी मतं मागितली आणि स्वत:चं सरकार स्थापन करण्यासाठी स्वार्थासाठी काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन केलं, हा खरा विश्वासघात होता. मतदारांशी विश्वसघात, आपल्या विचारांसोबत विश्वासघात, बाळासाहेबांच्या विचारांशी विश्वासघात आहे, असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर नाव न घेता इशारा साधला आहे.


मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंना डिवचलं 


जनतेला काम करणारा माणूस पाहिजे, घरी बसणारा नको, फिल्डवर काम करणारा पाहिजे, जागेवर जाऊन मदत करणारा पाहिजे, घरी बसून फेसबुक लाईव्ह करणारा माणूस लोकांना आवडत नाही. कोरोनामध्ये स्वत: हा एकनाथ शिंदे कोविडमध्ये पीपीई किट घालून फिरत होता, तेव्हा कुठे होते लोक. स्वत:च्या जीवाची पर्वा मी केली नाही, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंना डिवचलं आहे.


मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विविध मुद्द्यांवर भाष्य करताना म्हटलं की, 'आम्ही महिला सक्षमीकरणाचा निर्णय घेतला, महिलांना खूप फायदा झाला. विकास होत नाही, असं नाही, विकासाचा लाभ घेता येत नाही. माझ्यावर मोदींची जादू चालली आहे, त्यांचीच गॅरंटी देशात चालली आहे. त्यांना काम करणारा कार्यकर्ता आवडतो.'


मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून पंतप्रधान मोदींचं कौतुक


'मोदींनी एकही सुट्टी घेतली नाही. पूर्ण जीवन त्यांनी देशासाठी समर्पित केलं आहे. जे दिवाळी देशाच्या जवानांसोबत साजरी करतात. भारताचं नाव जगभरात आदराने, सन्मानाने घेतलं जातं. किती राष्ट्राचे प्रमुख, देशांचे राष्ट्राध्यक्ष, पंतप्रधान त्यांना सलाम करतात, कुणी बॉस म्हणतो, कुणी नमस्कार करतो', असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान मोदी यांचं कौतुक केलं आहे. मी मेहनती, प्रामाणिक आहे, कष्टाळू आहे, पंतप्रधानांनी माझं कौतुक करणं ही अभिमानाची बाब मी मुख्यमंत्री असलो, तर सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून काम करतो, असंही त्यांनी यावेळी सांगितलं आहे.


पंतप्रधानांकडून माझं कौतुक ही अभिमानाची बाब : मुख्यमंत्री


मी मेहनती, प्रामाणिक आहे, कष्टाळू आहे. मी मुख्यमंत्री असलो, तर सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून काम करतो. मी लोकांना नेहमी भेटतो, संवाद साधतो, कुठे दुर्घटना झाली तर वैयक्तिक जातो, सर्व यंत्रणा कामाला लावतो. त्यांना लवकर मदत होते आणि त्यांचा जीव वाचतो, हे शेवटी मेहनतीचं काम. मेहनत, कष्ट आणि एकनाथ शिंदे हे समीकरण आहे. पंतप्रधानांनी माझं कौतुक करणं ही अभिमानाची बाब आहे, असं म्हणत मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलं आहे.


शेती आणि दुष्काळग्रस्त भागासाठी मुख्यमंत्र्यांचं व्हिजन काय?


जे दुष्काळग्रस्त भाग आहेत, तिकडे पाणी कसे नेता येईल, हे आम्ही निर्णय घेतले. मराठवाडा वॉटर ग्रीड बासणात गेला होता, बंद केला होता, तो आम्ही सुरु केला. जलयुक्त शिवार योजना बंद होती, ती आम्ही सुरू केली. शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये बदल कसे होतील, यासाठी आम्ही काम केलं. आज तुम्हाला मी सांगतो. अडीच वर्षाच्या पूर्वीच्या काळामध्ये आणि आमच्या दीड वर्षाच्या काळात 120 प्रकल्प सिंचन प्रकल्पांना आम्ही मान्यता दिली. 12 लाख हेक्टर जमीन सिंचना खाली येणार आहे, ते शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा असेल, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.


आदित्य ठाकरेंच्या आव्हानाला मुख्यमंत्र्यांचं उत्तर


आदित्य ठाकरेंच्या निवडणूक लढवण्याच्या आव्हानाला मुख्यमंत्र्यांनी उत्तर देत म्हटलं आहे की, मला महाराष्ट्रात खूप मोठी कामे करायची आहे, एकच मतदारसंघ माझ्यासाठी महत्त्वाचा नाही. येणाऱ्या काळामध्ये लोक ठरवतील की, निवडणुकीमध्ये कोण कुठे उभा राहतो आणि कोण कुठे जिंकून येतो, त्यामुळे मला त्याच्यावर भाष्य करणे योग्य वाटत नाही, त्यामध्ये वेळ मला वाया घालवायची इच्छा नाही.


पाहा व्हिडीओ : माझा व्हिजनमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले?



'माझा महाराष्ट्र माझं व्हिजन'ला राजकीय नेत्यांची मांदियाळी


'माझा महाराष्ट्र माझं व्हिजन' (Majha Maharashtra Majha Vision 2024) या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde), भाजप मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार (Ashish Shelar), राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रीया सुळे (Supriya Sule) यांच्यासह राज्यातल्या प्रमुख नेत्यांशी दिलखुलास संवाद साधला जाणार आहे. आज दिवसभर एबीपी माझावर 'माझा महाराष्ट्र माझं व्हिजन' या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. माझा महाराष्ट्र माझं व्हिजन कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजप मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रीया सुळे, एमआयएमआयचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी, राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) नेते प्रफुल्ल पटेल, ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची उपस्थिती असणार आहे.  


'माझा महाराष्ट्र माझं व्हिजन' हा कार्यक्रम आज दिवसभर एबीपी माझावर पाहता येणार आहे. एबीपी माझाच्या अधिकृत यू-ट्यूब चॅनल, फेसबुक पेज, ट्विटर हॅण्डलवर प्रेक्षकांना हा कार्यक्रम लाईव्ह पाहता येणार आहे.


'माझा महाराष्ट्र माझं व्हिजन' लाईव्ह पाहा :