सांगली : महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) सांगली लोकसभेसाठी (Sangli Lok Sabha Election 2024) ठाकरे गटाच्या (Thackeray Group) चंद्रहार पाटील (Chandrahar Patil) यांना उमेदवारी देण्यात आली होती. यामुळे काँग्रेस नाराज होती, मात्र, आघाडी धर्म पाळणं ही गरजेचं होतं. असं असताना काँग्रेसच्या विश्वजित कदम यांनी अपक्ष उमेदवार विशाल पाटील (Vishal Patil) यांचा प्रचार केला. पण, विश्वजित कदम (Vishwajeet Kadam) यांनी अपक्ष विशाल पाटील यांचा प्रचार नेमका कसा केला? याचं उत्तर त्यांनी माझा कट्टा (Majha Katta) या एबीपी माझाच्या खास कार्यक्रमात सांगितलं. विश्वजित कदम यांनी रात्रीच्या वेळी प्रचार केल्याचं आणि कार्यकर्त्यांच्या शिस्तीबद्दल सांगितलं.


मविआ धर्म पाळत विशाल पाटील यांचा प्रचार कसा केला? 


यंदाची लोकसभा निवडणूक फारच खास ठरली. त्यातच सर्वाधिक चर्चा झाली ती, सांगली मतदारसंघाची. सांगली मतदारसंघावरुन महाविकास आघाडीमध्ये रस्सीखेच पाहायला मिळत होती. अखेर वरिष्ठांच्या बैठकीत ही जागा शिवसेना ठाकरे गटाकडे गेली आणि ठाकरेंनी चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिली. मात्र, काँग्रेसही जागा सोडण्यास तयार नव्हतं. पण, ठाकरे गटाने उमेदवार जाहीर केल्यानंतर काँग्रेसच्या विशाल पाटील यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आणि संपूर्ण समीकरणच बदललं. अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी सांगली लोकसभेची निवडणूक लाख मतांहून अधिक मताधिक्क्यानं जिंकली. या निवडणुकीत त्यांना आमदार विश्वजित कदम यांनी विजयासाठी मदत केली.


विश्वजित कदम यांनी माझा कट्ट्यावर उघड केलं गुपित


माझा कट्ट्यावर विश्वजित कदम यांनी सांगितलं की, मी 20 दिवस रात्री 9 ते पहाटे 4.30 वाजेपर्यंत झोपलेलो नाही. आमच्याकडे शिस्त आणि संघटन आहे. यावर विशाल पाटील यांनी सांगितलं की, आमच्याकडे शिस्त आणि संघटन खूप स्ट्राँग आहे. आमच्या सर्व सहा विधानसभा मतदारसंघापैकी त्यांच्या (विश्वजित कदम यांच्या) मतदारसंघातील म्हणजे माझ्या लाखांच्या मतांच्या लीडमधली 36,000 मते मला जिथे मिळाले, त्या स्पेसिफिक मतदारसंघांत त्यांचं नेटवर्कींग खूप चांगलं आणि स्ट्राँग आहे. कार्यकर्त्यांचा त्यांच्यावर खूप विश्वास आहे आणि ते त्यांच्यासाठी खूप कमिटेड आहेत. 


विशाल पाटील यांनी पलूस-कडेगावमध्ये प्रचार का केला नाही?


विशाल पाटील पुढे म्हणाले की, अगदी शेवटच्या क्षणापर्यंत कार्यकर्ते निरोपाची वाट पाहतात आणि त्यांची एक यंत्रणा आहे, ज्यातून ते निरोप जातात. त्यांची हायराकी आहे की, कुणी कुणाला निरोप द्यायचा, ती हायराकी मोडून आपण आत शिरु शकत नाही. ती खूपच शिस्तबद्धस कमिटेड लोकं आहेत आणि खूप प्रेम करणारी लोकं आहेत. अगदी अडचणीच्या काळात मोहनशेठ दादा, त्यांचे चिरंजीव, नातू, त्यांचे मेहुणे असतील, त्यांची बांधिलकी आहे. त्यामुळे येथे प्रचाराची गरज नाही. म्हणूनच मी पलूस-कडेगावमध्ये प्रचारासाठी गेलेलो नाही. मी इतर पाच विधानसभा मतदारसंघांकडे लक्ष दिलं. कारण इथे काय करायची गरज नाही. काय ते आणतील नायतर पाडतील, त्यांच्या हातात आहे, आपण इकडे बघायची गरज नाही. त्यामुळे तिथे जाण्याची गरज नाही, हे माहित होतं, असं विशाल पाटील यांनी सांगितलं.


पाहा व्हिडीओ : विशाल पाटील आणि विश्वजित कदम माझा कट्ट्यावर