मुंबई : मराठी सिनेसृष्टीतील उत्कृष्ट चित्रपटांपैकी एक मानला जाणारा चित्रपट म्हणजे 'मुळशी पॅटर्न'. या चित्रपटाने प्रेक्षकांना वेड लावलं होतं.  लोकप्रिय लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेते प्रवीण तरडे यांनी दिग्दर्शित केलेल्या 'मुळशी पॅटर्न या चित्रपटाला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं.  याच चित्रपटाच्या हिंदी रिमेकवर प्रविण तरडेंनी एक खुलासा केला आहे.  जर हा चित्रपट मी केला असता तर सलमान खानला या चित्रपटात मी घेतले नसते, असे मत प्रविण तरडेंनी व्यक्त केले आहे. एबीपी माझाच्या माझा कट्टा या कार्यक्रमात ते बोलत होते. 


प्रवीण तरडे म्हणाले, मुळशी पॅटर्न हा शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आधारित बनवलेला सिनेमा आहे. मुळशी पॅटर्नच्या माध्यमातून मला शेतकऱ्यांचे प्रश्न राष्ट्रीय स्तरावर मांडण्याची संधी आली होती परंतु काही कारणांमुळे ती पूर्ण झाली नाही. हा चित्रपट जर प्रवीण तरडेने बनवला असता तर या सिनेमाचे नाव आणि कथानक कधीच बदलले नसते. हिंदीमध्ये देखील मी चित्रपटाचे नाव मुळशी पॅटर्न ठेवले असते. मी स्वत: मुळशी गावचा आहे. एकेकाळी शेतीवर जगणारं हे सधन गाव मी अनुभवलं. मी जगलो. त्या विषयावर मी काम केले आहे. त्यामुळे या चित्रपटात मी सलमान खानला कधीच घेतले  नसते. कारण सलमान या भूमिकेसाठी कधी सूट झाला नसता.


कलाकारांच्या निवडीवर विचारलेल्या प्रश्नावर प्रवीण म्हणाला, 'माझ्या चित्रपटांमधील कलाकारांची निवड ही माझी सगळ्यात मोठी ताकद आहे. सध्या मराठी चित्रपट 'धर्मवीर',ची सर्वत्र प्रचंड चर्चा आहे. चित्रपट धर्मवीर आनंद दिघेंच्या आयुष्यावर आधारित आहे. अभिनेता प्रसाद ओक यानं आनंद दिघे यांची व्यक्तिरेखा साकारली आहे. तर दिग्दर्शक प्रविण तरडे यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं. चित्रपटाची कथा, मांडणी, कलाकार, संगीत सगळ्याच बाबतीत चित्रपटाने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली. पण या चित्रपटात दिघेंची भूमिका साकारण्यासाठी प्रविण तरडे यांची पहिली पसंती प्रसाद नव्हता. 


प्रवीण तरडे म्हणाले,  मुळशीसारख्या गावाची झालेली वाताहत लोकांसमोर आणावी असे आपल्याला वाटले. मी स्वत: मुळशी गावचा आहे. एकेकाळी शेतीवर जगणारं हे सधन गाव मी अनुभवलं. मी जगलो  आणि त्यानंतर याच गावात जमिनी विकून पेटीभर पैसे घेऊन सधन शेतकरी म्हणून मिरवलेले लोक  नंतर पैसे संपल्यावर आपल्याच जागांवर उभ्या राहिलेल्या 'आयटीपार्क' आणि इतर उद्योगांमध्ये सुरक्षारक्षक  म्हणून कसं काम करू लागले. याच शेतकऱ्यांच्या घरात तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेली मुलं तरुण झाली.  शेतकरी शेतीचा मालक नसून रखवलदार आहे. एका पिढीकरून दुसऱ्या पिढीकडे वारशाने ही जात असते. मातीशी नाते कधीच विकता कामा नये.