मुंबई : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात युद्धपातळीवर उपाययोजना सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर महावितरणची राज्यभरातील यंत्रणा अत्यावश्यक सेवेसाठी सज्ज झाली आहे. आरोग्याची योग्य खबरदारी घेऊन राज्यभरातील 40 हजार अभियंता व कर्मचारी तसेच देखभाल व दुरुस्तीसाठी नेमण्यात आलेल्या 5250 एजन्सीज सुरळीत वीजपुरवठ्याला प्राधान्य देत कर्तव्य बजावत आहेत. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी येत्या 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन करण्यात आले आहे. जमावबंदीचा आदेश तसेच ‘घरुनच काम’ (वर्क फ्रॉम होम)चा निर्णय घेण्यात आला आहे.


राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी दैनंदिन कार्यपद्धतीत बदल करण्याचे निर्देश दिले आहेत. त्याप्रमाणे महावितरणकडून विविध उपाययोजनांसह वीजपुरवठ्याच्या अत्यावश्यक सेवेसाठी नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये सुरळीत वीजपुरवठ्याला सर्वाधिक प्राधान्य देण्यात आले आहे. सरकारी कार्यालयांत 5 टक्के उपस्थितीची महावितरणमध्ये अंमलबजावणी करण्यात येत असली तरी प्रामुख्याने अभियंता आणि तांत्रिक कर्मचारी (जनमित्र) सुरळीत वीजपुरवठ्यासाठी सज्ज आहेत.



काम करताना संपूर्ण खबरदारी
प्रतिकूल परिस्थितीत कर्तव्य बजावणाऱ्या अभियंता व तांत्रिक कर्मचाऱ्यांना कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी योग्य खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहेत. तसेच कार्यालयप्रमुखांना मास्क, लिक्विड हॅण्डवॉश, सॅनिटायझर खरेदी करण्यासाठी खर्चाचे अधिकार देण्यात आले आहेत. यासोबतच दुरुस्तीच्या कामासाठी जाताना अभियंता व जनमित्रांनी स्वतःचे ओळखपत्र सोबत ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहे. वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर तो तत्परतेने पूर्ववत करण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत. मात्र, काही गंभीर तांत्रिक बिघाडामुळे वेळ लागल्यास नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.


दिवे लावा, टाळ्या वाजवा हे सांगणं पंतप्रधानांचं काम आहे का? बाळासाहेब थोरातांचा संतप्त सवाल


अवकाळी पावसाचा महावितरणालाही फटका
कोरोना विषाणूच्या आपत्तीमध्ये सुरळीत वीजपुरवठ्यासाठी काम करणाऱ्या महावितरणच्या प्रकाशदुतांना अवकाळी पावसाने गेल्या काही दिवसांत मोठे आव्हान दिले आहे. वादळी पावसाच्या थैमानामुळे राज्याच्या अनेक भागात वीजपुरवठा खंडित झाला होता. मात्र, महावितरणचे अभियंते आणि जनमित्रांनी युद्धपातळीवर व अविश्रांत वीजयंत्रणा दुरुस्तीचे काम करून वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी दिलेली झुंज यशस्वी झाली. राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसाने वादळासह हजेरी दिली. धो-धो पाऊस झाला. त्याआधी सुमारे 37-38 अंशावर गेलेल्या तापमानामुळे तापलेल्या वीजयंत्रणेवर या अवकाळी पावसाचा परिणाम झाला आणि या दोन्ही शहराच्या विविध भागात वीजपुरवठा खंडित झाला. हा वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणचे अभियंते व जनमित्रांची कसोटी लागली. राज्याच्या अनेक भागात वीजयंत्रणेवर अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या पडल्या. त्यामुळे वीजखांब व तारा जमीनदोस्त झाल्या. महामार्गांच्या बाजूला असलेल्या मोठमोठ्या जाहिरात फलकांचे बॅनर्स फाटून ते वीजतारांवर जाऊन अडकले.



कोरोनाचा परिणाम; शेतकऱ्यांवर हातातोंडाशी आलेला शेतीमाल फेकून देण्याची वेळ


अखंडीत वीजपुरवठा देण्यासाठी कर्मचाऱ्यांची मेहनत
राज्याच्या ग्रामीण भागात 33 केव्ही, 22 केव्ही आणि 11 केव्ही या मुख्य वीजवाहिन्यांचे उन्हामुळे तापलेल्या डिस्क व पिन इन्सूलेटरवर पाणी पडल्याने त्या फुटल्या. शहरांत विविध ठिकाणी यापूर्वी झालेल्या खोदकामांमध्ये महावितरणच्या भूमिगत वाहिन्या क्षतीग्रस्त झाल्या होत्या. त्यात या पावसाचे पाणी गेल्याने अनेक भागातील वीजपुरवठा खंडित झाला होता. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महावितरणचे अभियंता व जनमित्र सध्या वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी सर्वाधिक प्राधान्य देत आहेत. मात्र, त्यातच अवकाळी वादळी पावसामुळे या प्रकाशदुतांना अस्मानी संकटाला सामोरे जावे लागत आहे. वीजयंत्रणेत बिघाड झाल्यास सर्वप्रथम पर्यायी व्यवस्थेतून अनेक ठिकाणी वीजपुरवठा सुरळीत करण्यात येत आहे. ज्या ठिकाणी ही व्यवस्था नाही तेथे प्राधान्याने वीजयंत्रणेच्या दुरुस्तीचे काम सुरु करण्यात येत आहे. कोरोनामुळे दुरुस्तीच्या इतर कामांसाठी मनुष्यबळ उपलब्ध नसल्याने जनमित्रांनी स्वतःच वीजयंत्रणेवर पडलेल्या फांद्या काढणे, वीजतारांना अडकलेले पातळ पत्रे, बॅनर्स काढणे, वीजखांब उभारणे, वीजतारा ओढणे, नादुरुस्त भूमिगत वीजवाहिन्यांसाठी खोदकाम आणि दुरुस्ती, फिडर पिलर्सची दुरुस्ती इत्यादी सर्व कामे करून अत्यंत संकटकाळात वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी जिगरबाज कामगिरी बजावत आहेत व महावितरणच्या ग्राहकसेवेचा प्रत्यय देत आहेत.


 


Lockdown | सांगलीतील मिरजेत लॉकडाऊनमध्येही सामूहिक नमाज पठण, 41 जण ताब्यात


सध्याच्या प्रतिकूल परिस्थितीत वीजग्राहकांनी वीजपुरवठ्यासंबंधीच्या तक्रारी किंवा अन्य सेवेसाठी महावितरणच्या कार्यालयात येऊ नये. किंबहुना अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर पडूच नये. वीजपुरवठा खंडित झाला असल्यास किंवा अन्य महत्वाची तक्रार किंवा माहिती देण्यासाठी महावितरणच्या 24x7 सुरु असणाऱ्या कॉल सेंटरच्या 18001023435 किंवा 18002333435 किंवा 1912 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.


Aurangabad Social Distancing | गर्दी टाळण्यासाठी औरंगाबादमध्ये महाराष्ट्र बँकेचा अनोखा उपक्रम