Maha Vikas Aghadi Morcha: मुंबई : सिंधुदुर्गातील (Sindhudurg) राजकोट किल्ल्यावरील (Rajkot Fort) छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) पुतळा कोसळला आणि अवघ्या महाराष्ट्राच्या (Maharashtra) माना शरमेनं खाली झुकल्या. पण आता या प्रकरणाचा दुसरा अंक राज्यात सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. एकीकडे पुतळा कोसळला म्हणून सरकारवर राज्यभरातून टीकेची झोड सुरू आहे. तर, दुसरीकडे विरोधकांनी सरकारला चांगलंच धारेवर धरल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच आज महाविकास आघाडीच्या वतीनं बीकेसीमध्ये मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र, मुंबई उच्च न्यायालयानं या मोर्चासाठी परवानगी नाकारली आहे. दरम्यान, येत्या 1 सप्टेंबरला होणाऱ्या आंदोलनाच्या परवानगीची मात्र महाविकास आघाडीला प्रतिक्षा आहे. 


सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा कोसळल्याप्रकरणी महाविकास आघाडीकडून सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठवण्यात आली आहे. अशातच आज याच प्रकरणावरुन बीकेसीमध्ये महाविकास आघाडीच्या वतीनं मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र, महाविकास आघाडीच्या या आंदोलनाना मुंबई उच्च न्यायालयानं परवानगी नाकारली आहे. 


सप्टेंबरच्या एक तारखेला महाविकास आघाडीचं आंदोलन 


मालवण मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर आज महाविकास आघाडी कडून 'महाराज आम्हाला माफ करा' या मथळ्याखाली बीकेसीतील एशियन हार्ट येथील आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार,  या परिसरात आंदोलन करता येणार नसल्याचं पोलिसांनी नोटीसमध्ये सांगितलं आहे. एकीकडे आजच्या आंदोलनाला परवानगी नाकारली असताना, दुसरीकडे एक तारखेला महाविकास आघाडीनं पुकारलेल्या 'सरकारला जोडो मारो' आंदोलनालासुद्धा परवानगीची प्रतीक्षा आहे. 


येत्या 1 सप्टेंबर रोजी महाविकास आघाडीकडून हुतात्मा चौक ते गेट वे ऑफ इंडिया पर्यंत मोर्चा काढण्यात येणार आहे. हुतात्मा चौक येथे अभिवादन करून गेट वे ऑफ इंडिया येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला महाविकास आघाडीतील प्रमुख नेते अभिवादन करतील, या ठिकाणी जोडो मारो आंदोलन देखील केलं जाणार आहे. हुतात्मा चौक ते गेटवे ऑफ इंडिया इथपर्यंत काढायच्या मोर्चा संदर्भात आज ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेऊन परवानगीबाबत पत्र दिलं आहे. 


जो मोर्चाचा मार्ग आहे, त्यामध्ये मोर्चासंदर्भात काही मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश आहेत. त्यासंदर्भात पदाधिकारी आणि पोलिसांची बैठक पार पडेल. आज बीकेसी येथे होणाऱ्या आंदोलनाला जरी परवानगी नाकारली असली तरी अद्याप एक सप्टेंबरला होणाऱ्या मोर्चाच्या परवानगी संदर्भात कोणताही निर्णय अद्याप घेण्यात आलेला नाही. महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाची मुंबई पोलिसांसोबत चर्चा होणार आहे. त्यानंतर परवानगीबाबत कळवलं जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.