सोलापूर : आपण गावोगावी बोअर मशीनने बोअर पडताना नेहमीच पाहतो, परंतु हातांनी बोअर पाडलेली कधी पाहिली आहे का? सांगोला तालुक्यातील बलवडी गावच्या एका अवलियाने आतापर्यंत 56 बोअर हातांनी खणल्या आहेत आणि तेही अगदी एका मापाचे.


गेल्या कित्येक वर्षांपासून सोलापूरमधील सांगोल्याची दुष्काळी तालुका अशीच ओळख जनमानसात रुजलेली आहे. तालुक्यात पिण्याच्या पाण्याची कायम भीषण टंचाई असताना बोअर पाडणेदेखील सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या आर्थिकदृष्ट्या आवाक्याबाहेर असते. त्यामुळेच 2011 मध्ये सांगोल्यातल्या दत्त शिंदे यांनी हाताने बोअर पाडण्याच्या प्रयोगाला सुरुवात केली.

पूर्वी पिण्याच्या पाण्यासाठी लहान लहान आड तयार केले जायचे. हीच संकल्पना डोळ्यासमोर ठेवून दत्त यांनी छोटे दांड्याचे फावडे आणि छोट्या कुदळीचा वापर करीत एकट्यानेच बोअर खणायला सुरुवात केली. अवघ्या 3 फुट व्यासाचा आड खोदायला सुरुवात केली. हळूहळू शिंदे यांच्या प्रयत्नाला यश मिळू लागले.

3 फुट इतक्या कमी व्यासाचा आड बोअरिंग मशीनशिवाय खोदने अशक्य आहे. असे सर्वजण दत्त यांना सांगत होते, परंतु दत्त यांनी निर्धार केला होता. त्यात त्यांना यश मिळाले आहे.

दत्त शिंदे अतिशय कमी खर्चात शेतकऱ्यांना आड काढून देऊ लागले. मदतीला पत्नी आणि एखाद्या मजुराच्या साहाय्याने ते हळूहळू आड खोल करीत जाऊ लागले. पाहतापाहता चक्क एकाच मापात दत 100 फुटापर्यंत आड तयार करू लागले.

दत्त जसेजसे अधिक खोलपर्यंत खोदकाम करु लागले, तेव्हा तिथे प्रचंड उष्णता, कमी प्राणवायू अशा त्रासाला त्यांना तोंड द्यावे लागले. परंतु गेल्या आठ वर्षात दत्त यांना याची चांगलीच सवय झाली आहे. आज त्यांच्या नावावर तब्बल 56 आड तयार झाले आहेत.

100 फूट खोदकाम केल्यानंतरदेखील पाणी सापडले नाही, तर 30 फुटांपर्यंत खोडात जाऊन ते शेतकऱ्यांना पाणी मिळवून देतात, हे त्यांचे वैशिष्ठय आहे. त्यामुळेच पिण्याच्या पाण्यासाठी वणवण कराव्या लागणाऱ्या बलवडीमधील शेतकरी दत्त यांच्या या मानवी बोअरमुळे आता बागायती शेतीची स्वप्ने पाहू लागले आहेत.

हालाकीच्या आर्थिक परिस्थितीमुळे जगण्यासाठी जीवावर उदार होऊन दत्त हे आड खोदण्याचे काम करत आहेत. दत्त यांनी खोदलेल्या आडांमुळे बलवडीतील शेततळी पाण्याने भरु लागली आहेत. त्यामुळे बलवडी परिसरात डाळिंब बागा आणि इतर पिके जिवंत राहिली आहेत. जनावरांसाठी हिरवा चारा उपलब्ध झाला आहे. या पाण्यावर शेतकरी नवीन बागा लावू लागले आहेत.

दत्त यांनी त्यांच्यासोबत काम करणाऱ्या अजून तीन जणांना असे हाताने बोअर पाडायला शिकवले असून आता ही मंडळीदेखील परिसरात अशा पद्धतीचे आड तयार करू लागले आहेत.

बलवडीमधील गावकऱ्यांनी सांगितले की, मशीनने बोअर पाडण्यास जवळजवळ एक ते सव्वा लाख रुपये खर्च होते. परंतु दत्त हे केवळ 25 हजार रुपयांमध्ये आड खोदून देतात.