सोलापूर : शरद पवार यांनी ईव्हीएमबाबत केलेल्या वक्तव्यावर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवारांच्या ईव्हीएमबाबतच्या मताशी मी सहमत आहे, कारण काही ठिकाणी कमळाऐवजी (भाजप) राष्ट्रवादीच्या घड्याळाला मतदान झालं आहे, असा मिश्कील टोला रामदास आठवले यांनी शरद पवारांना लगावला.

Continues below advertisement

ईव्हीएम मशीन या कॉंग्रेसच्या काळातील आहेत. त्यामुळे काही मशीन खराब असू शकतात. मात्र सर्वच मशीन खराब असू शकत नाहीत, असं रामदास आठवले म्हणाले. फडणवीस सरकार अनुभवी नसल्याच्या शरद पवार यांच्या वक्यव्यावर बोलताना रामदास आठवले म्हणाले की, फडणवीस सरकार अनुभवी नसेल तर त्यांना आणखी पाच वर्षे द्यायला हवीत. रामदास आठवले सोलापूरच्या दुष्काळ दौऱ्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

दुष्काळाला काँग्रेस-राष्ट्रवादीच जबाबदार

Continues below advertisement

शरद पवार हे अनुभवी आहेत, त्यांच्या सरकारने खूप कामे केली, मग तरीही महाराष्ट्र कोरडा कसा? असा सवाल रामदास आठवलेंनी विचारला. त्यामुळे दुष्काळाला कॉंग्रेस-राष्ट्रवादीच जबाबदार आहे, असा घणाघात ही आठवलेंनी केला.

वंचित बहुजन आघाडीला एकही जागा मिळणा नाही

रामदास आठवले यांनी वंचित बहुजन आघाडीवरही टीका केली. प्रकाश आंबेडकरांशिवाय वंचित आघाडीच्या एकाही उमेदवाराला लाखभर मते मिळणार नाहीत. वंचित आघाडीचे बहुतांश नेते ही सत्तेसाठी वंचित आघाडीत गेले आहेत. सत्ता मिळाली नाही तर ते सगळे माझ्याजवळ परततील. प्रकाश आंबेडकर यांनी दोन जागी निवडणूक न लढता एका जागी निवडणूक लढवायला हवी होती, असं मत ही त्यांनी यावेळी व्यक्त केलं. तसेच वंचित बहुजन आघाडीला एकही जागा जिंकता येणार नाही, असंही ते म्हणाले.

लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुतीला महाराष्ट्रात 37 ते 38 जागा मिळतील. सोलापूरची जागा महायुतीकडेच राहणार आहे. देशात युपीएच्या काही जागा वाढतील, काही कमी होतील. मात्र भाजप 260 पेक्षा जास्त जागा जिंकून सत्ता स्थापन करेल, असा विश्वास रामदास आठवले यांनी व्यक्त केला.