Maharashtra Weather : आजपासून (13 ऑगस्ट) पुढील आठवडाभर म्हणजे 20 ऑगस्टपर्यंत पावसाची (Rain) शक्यता कमीच आहे. ' मान्सून खण्ड ' प्रणालीमुळं महाराष्ट्रात ढगाळ वातावरण राहून अगदीच तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता जाणवत असल्याचे मत ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केली. मुंबईसह कोकणात मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता देखील खुळे यांनी व्यक्त केली आहे.
खरीपातील जिरायत क्षेत्र पिकांना ओढ बसण्याची शक्यता
माणिकराव खुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार 21 ऑगस्टपासून मान्सूनच्या श्रावण सरी पुन्हा उर्जीतावस्थेत येऊन त्यापुढील तीन आठवडे म्हणजे रविवार दिनाक 10 सप्टेंबर पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात पुन्हा, मध्यम पावसाची शक्यता जाणवत आहे. सध्याच्या 'पाऊस-खण्ड ' प्रणालीमुळे महाराष्ट्रातील खरीपातील जिरायत क्षेत्र पिकांना ओढ बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. येणाऱ्या रब्बी हंगामाची भिस्तही ह्याच 21 ऑगस्ट नंतर पडू शकणाऱ्या अपेक्षित पावसावरच अवलंबून असू शकते असे खुळे म्हणाले.
सप्टेंबर महिन्यात विदर्भातील सहा जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता
लघु पल्ल्यातील पावसाच्या मासिक अंदाजानुसार ऑगस्ट आणि सप्टेंबरच्या दोन महिन्यात महाराष्ट्रात तसेही सरासरीपेक्षा कमीच पावसाच्या शक्यतेचे भाकीत आहे. केवळ सप्टेंबर महिन्यात विदर्भातील वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली अशा सहा जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. बंगालच्या उपसागरातील आर्द्रता ईशान्येकडे म्हणजे प्रशांत महासागरातील दक्षिण कोरियन किनारपट्टीवरील 'खनून' तर जपान किनारपट्टीवरील 'लान' नावाच्या दोन चक्रीवादळानीं (टायफुन) खेचल्यामुळे देशातील दक्षिणेकडील पाच राज्याबरोबर महाराष्ट्रातही ह्या पंधरवाड्यात पावसाची उघडीप पाहवयास मिळत आहे.
21 ऑगस्टनंतर पावसाची शक्यता
सध्या दोनपैकी एक टायफुन विरळले असुन दुसरेही विरळण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे म्हणून तर ' मान्सून-खण्ड ' प्रणाली नामशेष होणे आणि ' मान्सून आस ' त्याच्या मूळ सरासरी जागेवर प्रस्थापित होणे अशा या शक्यतेमुळेच आपल्याकडे 21 ऑगस्ट नंतर पावसाची शक्यता वाढली आहे.
महत्त्वाच्या बातम्या: