Maharashtra Weather : राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल होत आहे. कुठे उन्हाचा चटका जाणवत आहे तर कधी अवकाळी पाऊस ( Unseasonal rain) पडत आहे. याचा शेती पिकांना मोठा फटका बसला आहे. आजही राज्यात काही ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज पश्चिम महाराष्ट्रातील (western Maharashtra) सोलापूर, सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यासह मराठवाड्यातील (Marathwada) लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात पावसाची शक्यता जाणवत आहे.  


दरम्यान, आजपासून (16 एप्रिल) संपूर्ण महाराष्ट्रात अपेक्षित असलेलं अवकाळी वातावरण निवळण्याची शक्यता असल्याची माहिती ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली. माणिकराव खुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार कोकणातील चार आणि विदर्भातील 11 अश्या एकूण 15 जिल्ह्यात 16 आणि 17  तारखेला वातावरण निवळण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातील 10,  मराठवाड्यातील 8 अशा एकूण 18 जिल्ह्यात अजुनही रविवार 23 एप्रिलपर्यंत अवकाळी वातावरणाची शक्यता टिकून असल्याचे खुळे यांनी सांगितले.


उष्णतेत वाढ होण्याची शक्यता


मान्सूनचे आगमन होण्यापूर्वी होणारा पूर्व-मोसमी (15 ते 20 मे नंतरचा) व सध्याच्या (मार्च-एप्रिल मधील) होणाऱ्या अवकाळी पावसात साध्यर्मता दिसत आहे. मात्र, त्यांचे स्वरूप त्या पाठीमागील वातावरणीय प्रणाली कारणेही पूर्णपणे वेगळी असल्याचे माणिकराव खुळे म्हणाले. सध्या महाराष्ट्रात उष्णतेची काहिली वाटत असली तरी सदर तापमान सरासरीइतकेच जाणवत आहे. येत्या एक ते दोन दिवसात या उष्णतेत साधारण तीन अंश सेल्सिअसपर्यंत वाढ होवू शकते असा अंदाज माणिकराव खुळे यांनी वर्तवला आहे.


अवकाळी पावसाचा शेती पिकांना मोठा फटका


सध्या सुरु असलेल्या अवकाळी पावसाचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र विदर्भासह पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात अवकाळी पावसामुळं पिकांचं नुकसान झालं आहे. केळी, आंबा, संत्रा, द्राक्ष या बागांचे मोठे नुकसान झालं आहे. तर रब्बी हंगामातील गहू, हरभरा, ज्वारी तसेच कांदा या पिकांना देखील मोठा फटका बसला आहे. भाजीपाला पिकांचेही मोठं नुकसान झालं आहे. नाशिक जिल्ह्यात सर्वात जास्त कांदा पिकाचे नुकसान झालं आहे. काढणी केलेला कांदा या पावसामुळं जागेवरच सडत असल्याची स्थिती निर्माण झाली आहे. या अवकाळी पावसामुळं राज्यातील शेतकरी चिंतेत आहेत. दरम्यान, आजही राज्यातील काही भागात अवकाळी पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. आज पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यात अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळं शेतकरी पुन्हा चिंतेत आहेत. 


महत्त्वाच्या बातम्या:


Maharashtra Rain : नाशिकसह अहमदनगर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस, शेती पिकांना मोठा फटका