Maharashtra Weather News : महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात किमान तापमानात (Minimum Temperature) घट झाली आहे. याचा परिणाम थंडी वाढली आहे. थंडीमुळं ठिकठिकाणी शेकोट्या पेटल्या आहेत. सध्या राज्यातील मराठवाड्यासह (Marathwada) विदर्भ (Vidarbha) आणि पश्चिम महाराष्ट्र (West Maharashtra) चांगलाच गारठला आहे. काही ठिकाणी तर तापमानाचा पारा 10 अंशाच्या खाली आल्यानं हुडहुडी चांगलीच वाढली आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील किमान तापमानात मोठी घट झाली आहे. पाहुयात कोणत्या विभागात काय स्थिती आहे. ख्रिसमसनंतर म्हणजे 25 डिसेंबरनंतर मुंबईत थंडी वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
औरंगाबादमध्ये किमान तापमान 10.2 अंश सेल्सिअस
मराठवाड्यात किमान तापमानात चांगलीच घट झाली आहे. औरंगाबादमध्ये किमान तापमान 10.2 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं आहे. त्यामुळं तिथे चांगलीच हुडहुडी वाढली आहे. तिथे नागरिकांनी थंडीपासून बचावासाठी शेकोट्या पेटवल्याचं चित्र दिसत आहे. तर दुसरीकडं पुण्यात 11.05 अंश सेल्सिएस तापमानाची नोंद झाली आहे. तर नागपुरात 12.09 अंश सेल्सिअस, नाशिकमध्ये 13 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तर मुंबईत 19.06 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. दरम्यान, मराठवाडा आणि विदर्भातील तापमानाचा पारा हा सरासरी 11 ते 14 अंश सेल्सिअसमध्ये आहे.
मुंबईत गारठा वाढणार
मागील आठवड्यात मुंबईतील किमान तापमान सरासरी 24 अंश सेल्सिअस होते. मात्र, मागील दोन दिवसांपासून पुन्हा घट होण्यास सुरुवात झाली आहे. ख्रिसमसनंतर मुंबईत हिवाळा जाणवणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. सोबतच उर्वरित महाराष्ट्रात देखील तापमानात आणखी घट होण्याचा अंदाज हवामान विभागान वर्तवला आहे. त्यामुळं राज्यात पुन्हा थंडीचा कडाका जाणवणार आहे.
हवामान विभागाचा अंदाज काय?
हवामान विभागाच्या अंदाजानुसार आजपासून राज्यात पुन्हा गारठा वाढला आहे. आजपासून थंडी हळूहळू वाढत जाणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दरम्यान, डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला तामिळनाडूच्या किनारपट्टीवर आलेल्या मंदोस चक्रीवादळाचा परिणाम वातावरणावर झाला होता. या चक्रीवादळामुळं राज्यात थंडी कमी झाली होती. अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण तयार झालं होतं. तसेच काही ठिकाणी पाऊस देखील पडला होता. आता मात्र, मंदोस चक्रीवादळाचा प्रभाव कमी झाला आहे.त्यामुळं पुन्हा राज्यात थंडी जाणवू लागली आहे. डिसेंबर महिन्यातील उर्वरित 10 दिवसात थंडीत चांगलीच वाढ होणार आहे. ही थंडी कदाचित शनिवार (31 डिसेंबर) पर्यंतही टिकून राहण्याची शक्यता माणिकराव खुळे यांनी व्यक्त केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या: