Wardha HinganGhat Case Update : वर्ध्यामधील हिंगणघाटमधील शिक्षिकेच्या जळीत हत्याकांड प्रकरणी न्यायालयीन कामकाज पूर्ण न झाल्यामुळेच या प्रकरणाचा निकाल आता नऊ फेब्रुवारी रोजी सुनावला जाणार असल्याची माहिती या प्रकरणाचे सहायक सरकारी वकील अॅड दीपक वैद्य यांनी दिली आहे. संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या या खटल्यात कोरोनाच्या लाटेमुळे काहीशा उशीर झाला. मात्र, या प्रकरणात एकूण 64 सुनावण्या झाल्या. 29 साक्षीदारांचे साक्षपुरावे होऊन खटल्याचा युक्तिवाद आधीच पूर्ण झाला आहे.


विशेष म्हणजे 29 साक्षीदारांपैकी एकही साक्षीदार फितूर झालेला नाही. त्यामुळे आरोपीचा दोष सिद्ध करण्याइतपत भक्कम पुरावे असून ते सरकारी पक्षाने न्यायालयापुढे सादर केल्याचे दीपक वैद्य म्हणाले. 


दरम्यान या प्रकरणाचा आरोपी विकेश उर्फ विकी नगराळे याने न्यायालयात त्याची सुनावणी झाली त्यावेळेला आपल्यावरील आरोप खोटे असल्याचे आणि त्यांनी असे कोणतेही जळीत हत्याकांडाचे कृत्य केले नसल्याचे सांगत आरोप फेटाळले होते. मात्र सरकारी पक्षाने सादर केलेले भक्कम पुरावे लक्षात घेऊन या प्रकरणात न्यायालय योग्य शिक्षा सुनावेल अशी अपेक्षाही दीपक वैद्य यांनी व्यक्त केली आहे. 


3 फेब्रुवारी 2020 रोजी हिंगणघाट इथं आरोपी विकेश नगराळेने एकतर्फी प्रेमातून प्राध्यापिका तरुणीवर पेट्रोल टाकून पेटवलं होतं. यांत गंभीररित्या जखमी झालेल्या पीडित प्राध्यापिका तरुणीचा उपचारादरम्यान 10 फेब्रुवारी 2020 रोजी मृत्यू झाला होता. या जळीतकांड प्रकरणाच्या खटल्यासाठी विशेष सरकारी वकील म्हणून अॅड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली होती. आरोपी विकेश नगराळेविरोधात तब्बल 426 पानांचे दोषारोपपत्र हिंगणघाटच्या प्रथम श्रेणी न्यायालयात दाखल केले होते. या प्रकरणात आतापर्यंत 29 साक्षीदार तपासण्यात आलेत. या प्रकरणी दोन्ही बाजूचा युक्तीवाद संपला असून आता निकालाची प्रतीक्षा आहे.


हिंगणघाट मधील शिक्षिकेच्या जळीत हत्याकांड प्रकरणाला दोन वर्षे पूर्ण झाले आहेत. आज त्या संदर्भात हिंगणघाटच्या न्यायालयात निकाल अपेक्षित होता. मात्र, आजही निकाल लागणार नाही हे स्पष्ट झाल्यानंतर ती शिक्षिका शिकवत असलेल्या मातोश्री आशाताई कुणावार महिला महाविद्यालयात नैराश्याचे वातावरण झाले आहे. फास्ट ट्रॅक कोर्ट असल्यामुळे या प्रकरणी निकाल लवकर लागेल अशी आमची अपेक्षा होती. मात्र, घटनेला दोन वर्ष झाले तरी नराधम आरोपीला अजून शिक्षा झालेली नाही हे दुर्दैवी असल्याचे मत महाविद्यालयातील सहकारी शिक्षक व शिक्षिकांनी व्यक्त केले आहे.


दरम्यान एका तरुण शिक्षिकेला रस्त्यावर अशा पद्धतीने जिवंत जाळल्या गेल्यामुळे हिंगणघाट आणि ग्रामीण भागात वातावरण मोठ्या प्रमाणावर बदल्याचे मतही अनेक शिक्षिका आणि विद्यार्थिनींनी व्यक्त केले आहे. जळीत हत्याकांडाच्या त्या दुर्दैवी घटनेनंतर महिला आणि मुलींच्या बाबतीत घरातून अनेक बंधनं लादली गेल्याचं त्यांचं मत आहे. एकटे बाहेर जाण्यापासून जास्त वेळ बाहेर राहण्याबद्दल ही निर्बंध असल्याचे महिला शिक्षिका आणि विद्यार्थिनींचे मत आहे.


पोलिस चौकीची मागणी प्रलंबित


दरम्यान ज्या महाविद्यालयाच्या शिक्षिकेसोबत ही दुर्दैवी घटना घडली होती त्या मातोश्री आशाताई कुणावार महिला महाविद्यालय जवळ पोलिस चौकीची मागणी ही दोन वर्षानंतर पूर्ण झालेली नाही. घटनेनंतर काही दिवस पोलिसांची गश्त राहिली. मात्र त्यानंतर पोलीसही निष्क्रिय झाले. आजवर पोलिस चौकीची मागणी प्रलंबित असल्याने परिसरातील शाळेत महाविद्यालयात येणाऱ्या विद्यार्थिनींना टवाळखोरांचा त्रासाला अजूनही सामोरे जावे लागत आहे असे मतही काही विद्यार्थिनींनी व्यक्त केले.







या प्रकरणानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली होती. तसेच या प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी झाली होती. या प्रकरणानंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता तर याच प्रकरणानंतर राज्यात शक्ती कायदा आणण्यात येणार असल्याचे सांगितले होते. हिवाळी अधिवेशनात हा कायदा विधिमंडळात मंजूर सुद्धा करण्यात आला आहे. 


इतर महत्त्वाच्या बातम्या :