Maharashtra Politics : काँग्रेस आमदारांनी विधान परिषदेच्या निवडणुकीत (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) पक्षाच्या निर्देशांच्या विरोधात मतदान केलंय, त्यांना पक्षातून सहा वर्षासाठी निलंबित केलं पाहिजे, अशी मागणी काँग्रेस आमदार विकास ठाकरे (Vikas Thakre) यांनी केली आहे. काँग्रेस पक्षाच्या आमदारांनी कोणाला मतदान केलंय,  कोणी पक्षाच्या निर्देशानुसार मतदान केले आहे आणि कोणी पक्षादेश धुडकावून क्रॉस वोटिंग केलंय, हे पक्षाच्या निरीक्षकांच्या सहज लक्षात आलं असेल. अशा क्रॉस वोटिंग करणाऱ्या आमदारांविरोधात सहा वर्षासाठीच्या निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी विकास ठाकरे यांनी केली आहे.


दरम्यान, नाना पटोले यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षाला गेल्या काही महिन्यात जे यश मिळालय, त्यामुळे पक्षातील काही नेते नाना पटोले विरोधात अशा क्रॉस वोटिंगला प्रोत्साहन देत आहेत का? या प्रश्नावर मात्र विकास ठाकरे यांनी कुठलेही स्पष्ट उत्तर दिलं नाही. मला त्या संदर्भात माहिती नाही, मात्र जे कोणी असं करत असेल त्यांच्या विरोधात कठोर कारवाई केली पाहिजे. असंही विकास ठाकरे म्हणाले.


क्रॉस वोटिंग करणार्‍यांवर सहा वर्षाच्या निलंबनाची कारवाई करा


विधानपरिषदेची निवडणूक (Vidhan Parishad Election Result) चांगलीच चुरशीची झाली. यात महायुतीचे सर्वच्या सर्व 9 उमेदवार विजयी झाले. शरद पवार (Sharad Pawar) यांच्या राष्ट्रवादीचे (NCP) समर्थन असलेल्या शेकापचे जयंत पाटील (Jayant Patil) यांचा मात्र या निवडणुकीत पराभव झाला. या निवडणुकीत काँग्रेसची जवळपास आठ मतं फुटल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, याच संभाव्य फुटीर आमदारांना ओळखण्यासाठी काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी एक सापळा रचला होता, या सापळ्यात अडकलेल्या फुटीर आमदारांवर आता कारवाई होणार असल्याची चर्चा आहे. 


नाना पटोले यांनी नेमकं काय सांगितलं? 


"मतं फुटल्याचं सांगितलं जात आहे. याआधीच्या विधानपरिषदेच्या निवडणुकीत चंद्रकांत हंडोरे उभे होते, तेव्हाही असाच प्रकार झाला होता. तेव्हाच्या निवडणुकीतील बदमाश लोक ओळखले गेले नव्हते. मात्र यावेळी आम्ही ट्रॅप लावला होता. या सापळ्यात हे बदमाश आमदार सापडले आहेत. आम्ही याबाबत वरिष्ठांना कळवलं आहे. पार्टीविरोधी काम करणाऱ्या, पार्टीशी बेईमानी करणाऱ्या, गद्दारी करणाऱ्या आमदरांना बाहेरचा रस्ता दाखवला जाईल," असे स्पष्टपणे नाना पटोले म्हणाले. 


काँग्रेसची आठ मतं फुटली?


दरम्यान, या निवडणुकीत काँग्रेसची एकूण 8 मतं फुटल्याचे म्हटले जात आहे. ही काँग्रेसची मतं अजित पवार यांच्या उमेदवाराला मिळाल्याचे म्हटले जात आहे. काँग्रेसने उमेदवार प्रज्ञा सातव यांना पहिल्या पसंतीची 28 मते दिली होती. या 28 पैकी 3 आमदारांनी सातव यांना मतदान  न करता महायुतीच्या उमेदवाराला मतदान केल्याचे म्हटले जात आहे. काँग्रेसने मिलिंद नार्वेकर यांना सहा मते दिली होती. यातील एक मत फुटल्याचाही संशय व्यक्त केला जातोय. अशोक चव्हाण यांच्याबरोबर असलेले काही आमदार तसेच अन्य काही आमदारांची मतं फुटल्याचे म्हटले जात आहे.


इतर महत्वाच्या बातम्या