औरंगाबाद :  राज्यातल्या औरंगाबाद विमानतळाला छत्रपती संभाजी महाराज, शिर्डीच्या विमानतळाला साईबाबा आणि कोल्हापूरच्या विमानतळाचे महालक्ष्मी विमानतळ असं नामकरण लवकरच केली जाणार असल्याची माहिती केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी दिलीय. 


औरंगाबाद, शिर्डी, कोल्हापूरसह देशातील 13 विमानतळांचे नामकरण करण्याचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे आहे. येत्या कॅबिनेटमध्ये याबाबत निर्णय होण्याची शक्यता असल्याचं केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी सांगितले. औरंगाबाद विमानतळाचे नाव छत्रपती संभाजी महाराज विमानतळ असे करण्याच्या मागणीचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवण्यात आलाय. त्याबाबत अद्यापही निर्णय झाला नाही. आता देशात 13 विमानतळांच्या नामकरणाचे प्रस्ताव आले. यात महाराष्ट्रातून औरंगाबाद, शिर्डी, कोल्हापूर विमानतळाच्या नामकरणाचा प्रस्ताव आहे, अशी माहिती डॉ. भागवत कराड यांनी दिलीये. खात्याचे विद्यमान मंत्री ज्योतिरादित्य शिंदे लवकरच एकत्रित प्रस्ताव कॅबिनेटसमोर ठेवतील असे त्यांनी सांगितले.


औरंगाबाद विमानतळाचे नाव बदलून छत्रपती संभाजी महाराज विमानतळ, औरंगाबाद असे करण्याची घोषणा  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील दोन वर्षांपूर्वी विधानसभेत केली. दरम्यान औरंगाबादमधील विमानतळाला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव देण्याचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवला असून लवकरच केंद्राचा आदेश येईल असे देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काही दिवसांपूर्वी म्हणाले होते. औरंगाबादचं नाव संभाजीनगर करावं हा वाद गेल्या 28 वर्षांपासून सुरु आहे. 1988 मध्ये औरंगाबादच्या सभेत बाळासाहेब ठाकरे यांनी पहिल्यांदा हा नारा दिला होता, तेव्हापासून औरंगाबादेत शिवसेना संभाजीनगर की औरंगाबाद या मुद्द्यावरुनच निवडणुका लढतेय. त्यात आता सत्तांतर झालं, राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मदतीनं शिवेसेनेचे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झालेत. त्यामुळे शहराचे नामांतर करण्यासाठई शिवसेना प्रयत्नशील आहे. 


विमानतळाचे नामांतर करण्यासंदर्भात लोकप्रतिनिधींकडून सातत्याने मागणी होत आहे. यापूर्वी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नाव छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई असे करण्यात आले आहे. या धर्तीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.  तर कोल्हापूर विमानतळाला 'छत्रपती राजाराम महाराज विमानतळ' नाव देण्यात यावे, अशी मागणी कोल्हापूरकरांची आहे. 


इतर महत्त्वाच्या बातम्या :



औरंगाबाद शहर, नाव आणि इतिहास; संभाजीनगरची चर्चा कधीपासून आणि कुणामुळे?