ST Bus:  'गाव तेथे एसटी' असं ब्रीद कायम ठेवताना आर्थिक अडचणींनादेखील एसटी महामंडळाला सामोरे जावे लागत होते. एसटी संपानंतर पुन्हा प्रवाशांच्या सेवेत आलेल्या एसटी समोर आर्थिक अडचणी कायम होत्या. मागील वर्षभरापासून तब्बल 4000 कोटी रुपये तोट्यात असलेली एसटी आता लवकरच फायद्यात येण्याची शक्यता आहे. एसटी महामंडळाचा हा तोटा अगदी दहा कोटी रुपयांवर आला आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षात एसटी महामंडळ फायद्यात येण्याची शक्यता असल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटले. मागील वर्षात एसटी महामंडळाला 4000 कोटींचा तोटा झाला होता. त्याच्या तुलनेत, यंदाच्या मे महिन्यात तोटा हा सरासरी 10 कोटींवर आला असल्याची माहिती एसटीच्या अधिकाऱ्यांनी दिली. 


महाविकास आघाडी सरकारच्या काळात तब्बल सहा महिने एसटी महामंडळातील कर्मचारी संपावर होते. त्यानंतर एसटी महामंडळाला तब्बल 4000 कोटी रुपयांचा तोटा झाल्याची बाब समोर आली होती. त्यामुळे एसटी महामंडळ पुन्हा फायद्यात येणार की नाही याची चर्चा जोरदार सुरू होती. एसटी महामंडळाचा चार हजार कोटी रुपये एकीकडे तोटा असताना दुसरीकडे गाड्या चालवण्यासाठी डिझेलसाठी पैसा देखील उपलब्ध नसल्याची बाब समोर आली होती. अजित पवार अर्थमंत्री असताना महिना 300 कोटी रुपये देण्याची सरकारने कबुली दिली होती. मात्र ती देखील रक्कम वेळेत न मिळाल्याने तोटा दिवसेंदिवस वाढत चालला होता. यंदा मात्र, मागील वर्षीच्या तुलनेत एका महिन्याचा तोटा हा 10 कोटींवर आला असल्याची माहिती एसटीच्या अधिकाऱ्यांनी दिली.


दिवसेंदिवस वाढत जाणारा तोटा कमी करण्यासाठी एसटी महामंडळाला खऱ्या अर्थाने राज्य सरकारच्या मदतीची गरज होती. दरम्यानच्या काळात एसटीने प्रवास करण्यापेक्षा खाजगी वाहनांना प्रवास करण्याकडे नागरिकांचा ओढा वाढत होता. मात्र त्यावेळी नव्याने सत्तेवर आलेल्या शिंदे फडणवीस सरकारने दोन महत्त्वाचे निर्णय घेतले आणि याचा फायदा एसटी महामंडळाला झाल्याचे पाहायला मिळालं. राज्य शासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या योजनेतील प्रवास शुल्काची प्रतिपूर्ती होत असल्याने आणि मिळणारी आर्थिक मदत याचा एसटी महामंडळाला मोठा आधार मिळत असल्याचे म्हटले जात आहे. 


एसटी महामंडळाने ज्येष्ठ नागरिकांना 50 टक्के आणि 75 वर्ष पूर्ण झालेल्या नागरिकांना 100 टक्के प्रवासात तिकीटात सवलत दिली. तर महिलांना थेट 50 टक्के एसटी भाड्यात सवलत दिली, त्याचा फायदा होताना दिसत असल्याचे एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि महाव्यवस्थापक शेखर चन्ने यांनी म्हटले. 


विविध योजनेतून महामंडळाला मिळालेला फायदा


> 75 वर्ष पूर्ण केलेल्या नागरिकांना मोफत प्रवास या योजनेसाठी सरकारकडून मिळालेली रक्कम 91 कोटी रुपये


>  महिलांना 50 टक्के तिकीट सवलत योजनेसाठी सरकारने प्रतिपूर्तीसाठी दिलेली रक्कम - 179 कोटी रुपये


> 65 ते 75 वय असलेल्या नागरिकांना 50 टक्के सवलत योजनेसाठी सरकारने दिलेली रक्कम 26 कोटी रुपये 


एसटी महामंडळाचे 18 विभाग फायद्यात


एसटी महामंडळाचे राज्यातील 31 विभागांपैकी 18 विभाग सध्या फायद्यात आहेत. यामध्ये बीड पहिल्या क्रमांकावर असून परभणी दुसऱ्या आणि जळगाव तिसऱ्या क्रमांकावर आहे. बीड विभागाला मे महिन्यात साडेतीन कोटी रुपये परभणी विभागाला तीन कोटी रुपये आणि जळगाव विभागाला दोन कोटी 90 लाख रुपयांचा फायदा झाला आहे. पुढील महिन्यात हीच रक्कम आणखी वाढेल असा विश्वास एसटीच्या अधिकाऱ्यांना आहे. 


शिंदे फडणवीस सरकारने घेतलेले या दोन महत्त्वाचे निर्णयामुळे हळूहळू एसटीची आर्थिक क्षमता रुळावर येत असल्याचे पाहायला मिळत असल्याचे बोललं जात आहे. आज घडीला एसटी महामंडळ तब्बल 4000 कोटी रुपये तोट्यातून थेट दहा कोटी रुपये तोट्यावर आला आहे. यामुळे आता पुढील काळात एसटी महामंडळाला राज्य सरकारकडून पगारासाठी पैसे घेण्याची देखील गरज उरणार नसल्याची शक्यता महामंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.