Sanjay Raut : शेतकऱ्यांचा लॉंग मार्चमध्ये शेतकरी चालत आहे. यामध्ये एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला. हा सरकारचा हलगर्जीपणा असल्याची टीका शिवसेना खासदार (ठाकरे गट) संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली. सरकारने वेळेत पाऊल उचलले नाही. चर्चा करण्यासाठी नेमलेले मंत्री हे फुसके असल्याची टीकाही राऊतांनी केली. तुम्ही शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलं नाही म्हणता, एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. त्याच प्रायश्चित तुम्ही घेतलं पाहिजे असेही राऊत म्हणाले. काल देखील अवकाळी पाऊस झाला आहे. शेतकरी हवालदिल झाला आहे. सरकार मात्र फोडाफोडी, विरोधकांच्या नाड्या आवळण्यामध्ये अडकल्याचे राऊत म्हणाले. 


मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांचे प्रश्न कळले का?


मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांचे प्रश्न कळले आहेत का? उद्योजकांचे प्रश्न कळले आहेत का? असे सवाल करत राऊतांनी टीका केली. सुप्रीम कोर्टाचा निकाल काय लागेल. हा निकाल विकत घेऊ का त्याची तयारी सुरु असल्याची टीकाही राऊत यांनी मुख्यमंत्र्यांवर केली. पण आम्हाला खात्री आहे की सर्वोच्च न्यायालयात आम्हाला न्याय मिळेल, मराठी माणसाला न्याय मिळेल असे राऊत म्हणाले.


राज्यात फडणवीसांनी घाणेरडं राजकारण आणलं


घाणेरडं राजकारण फडणवीस यांनी राज्यात आणि मोदी-शाह यांनी केंद्रात आणले असल्याचा आरोप राऊत यांनी केला. कोणाच्याही कुटुंबासोबत राजकारण करु नये, अस राजकारण आम्ही कधीच केले नाही ना बाळासाहेबांनी केलं ना शरद पवारांनी केलं असेही राऊत म्हणाले. आम्ही तुरुंगात गेलो, नवाब मलिक तुरुंगात गेले, देशमुख तुरुंगात गेले. आमच्याकडे असलेले पुरावे खोटे आणि तुमचे पुरावे खरे का? असा सवाल राऊतांनी केला. आम्हाला तोंड उघडायला लावू नका नाहीतर महाराष्ट्रात स्फोट होईल असेही राऊत म्हणाले.


अखेर लाल वादळ शमलं!


दरम्यान, अखेर पाच दिवसांच्या अथक आंदोलनानंतर शेतकरी लॉन्ग मार्च (Long March) माघारी फिरणार आहे. माजी आमदार जेपी गावित, जिल्हा प्रमुख, जिल्हाधिकारी यांच्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. शेतकरी आंदोलनाला यश आले असून सरकारने मागण्या मान्य केल्याने लाल वादळ शमले आहे. आता एका ट्रेनच्या माध्यमातून हे सर्व शेतकरी घरी परतणार असल्याचे समजते.


आमच्या 70 टक्के मागण्या मान्य : जे पी गावित 


आंदोलन (Farmers Protest) स्थगित होणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. मागण्या मान्य न झाल्यास आम्ही आंदोलनावर ठाम राहू असा निर्धार आंदोलक शेतकऱ्यांनी केला होता. मात्र बैठकीच्या झालेल्या चर्चेनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी मागण्या मान्य झाल्याची प्रत जेपी गावित यांना दिल्यानंतर आंदोलन मागे घेत असल्याचे ते म्हणाले. 


इतर महत्वाच्या बातम्या