Maharashtra Rains Live Updates : राज्याच्या विविध भागात जोरदार पावसाची हजेरी, जनजीवन विस्कळीत

Maharashtra Rains Live Updates : राज्यातील विविध भागात जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. या पावसामुळं काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 05 Aug 2022 11:18 AM
 उस्मानाबाद जिल्ह्यातील मुख्य असलेलं तेरणा धरण भरलं, पाण्याचा प्रश्न मिटला
 उस्मानाबाद जिल्ह्यातील मुख्य तेरणा धरण फुल भरले आहे. तेरणा धरण ओसंडून वाहत आहे. हे धरण भरल्याने तेरणा नदी व तेर गावातील नागरिकांना पुराचा इशारा दिला आहे. तेरणा धरण भरल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे.
बार्शीत मुसळधार पाऊस, बार्शी-उस्मानाबाद रस्त्यावरील घोर ओढ्याला पूर

Barshi Rain : बार्शी शहर आणि तालुक्यात दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. काल मध्यरात्रीच्या सुमारास देखील बार्शीत मुसळधार पाऊस पाहायला मिळाला. यामुळं बार्शी-उस्मानाबाद रस्त्यावरील घोर ओढ्याला पूर आला आहे. ओढ्याच्या पुलावरुन जवळपास पाच फूट पाणी वाहत असल्यानं दोन्ही बाजूची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. बार्शीत मागील काही दिवसात झालेल्या पावसामुळं सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. कालपर्यंत प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार बार्शी तालुक्यात एकूण 400 मिमी इतका पाऊस झाला आहे. यामुळं बार्शी तालुक्यातील नदी, ओढे ओसंडून वाहत आहेत.

पुढील चार दिवस कोकणात मुसळधार पावसाचा इशारा,

सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या काही दिवसात विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा एकदा एन्ट्री घेतली आहे.  सिंधुदुर्गात पुन्हा मान्सून सक्रिय झाला आहे. त्यामुळे बळीराजा सुखावला आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याम पुढील चार दिवस कोकणात मुसळधार पाऊस कोसळणार आहे. रात्रीपासून जिल्ह्यातील सर्वच भागात पावसाची संततधार सुरू आहे. जिल्ह्यात पुढील तीन ते चार दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यात दोन दिवस ऑरेंज अलर्ट तर दोन दिवस यलो अलर्ट देण्यात आला आहे. रात्री आंबोलीत ढगफुटी सदृश पाऊस सलग सहा तास कोसळला.

नांदेडमधील उमरी तालुक्यात ढगफुटीसदृश्य पाऊस, बेलदरा, हातनी रस्ता बंद; उंची कमी असलेल्या पुलाला पूर, शेकडो नागरिक अडकले .

Nanded Rains : नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्यात आज ढगफुटीसदृश्य पाऊस झाला. बेलदरा, हातनी, येंडाळा, महाटी, कौडगाव जाणाऱ्या अरुंद व उंची कमी असलेल्या पुलावरून पाणी गेल्याने जवळपास 500 पेक्षा अधिक नागरिक चार तास पुराच्या पाण्यात अडकून पडले होते. दरम्यान काही नागरिकांनी नाहक धाडस दाखवत, पुराच्या पाण्यातून जोखमीचा प्रवास करत पुल ओलांडला. दरम्यान आठ दिवसांच्या विश्रांतीनंतर झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे उमरी तालुक्यातील रस्त्यांची मात्र दयनीय अवस्था झाली आहे. तर अरुंद रस्ते आणि पुलाची उंची कमी असल्याने चांगला पाऊस झाला की पुलावरुन पाणी वाहते आणि रस्ता बंद होतो. त्यातच आज झालेल्या ढगफुटीसदृश्य पावसामुळे बेलदरा, हातनी या मार्गावरील पुलाला अचानक पूर आल्याने रस्ता बंद झाला. त्यामुळे अलीकडील आणि पलीकडच्या भागातील जवळपास 500 पेक्षा अधिक नागरिक, शेतकरी, शालेय विद्यार्थी अडकून पडले होते. पुलाला पूर आलेला असताना देखील अनेकांनी आपला जीव धोक्यात घालून रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न केला.

तळकोकणात मान्सून पुन्हा सक्रिय, जिल्ह्यात पुढील चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता

Sindhudurg Rains : सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या काही दिवसात विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा एकदा एन्ट्री घेतली आहे. सिंधुदुर्गात मान्सून पुन्हा सक्रिय झाला आहे. त्यामुळे बळीराजा सुखावला आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याम पुढील चार दिवस कोकणात मुसळधार पाऊस कोसळणार आहे. रात्रीपासून जिल्ह्यातील सर्वच भागात पावसाची संततधार सुरु आहे. जिल्ह्यात पुढील तीन ते चार दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यात दोन दिवस ऑरेंज अलर्ट तर दोन दिवस यलो अलर्ट देण्यात आला आहे. रात्री आंबोलीत ढगफुटी सदृश पाऊस सलग सहा तास कोसळला.

आटपाडीसह जत तालुक्यात रात्री मुसळधार पाऊस, शेती पिकांचे नुकसान
Sangli Rain : आटपाडी, जत तालुक्यात रात्रीच्या सुमारास मुसळधार पाऊस झाला आहे. आटपाडी तालुक्यातील करगणीमध्ये 6 वाजण्याच्या सुमारास आठवडी बाजारात पावसाने दैना उडाली. मुसळधार पावसाने बाजारातील भाजीपाला वाहून गेला. यामध्ये भाजीपाला विक्रेत्याचे मोठे नुकसान झाले. दुसरीकडे जत तालुक्यातील डफळापुर मध्ये रेकॉर्ड ब्रेक मुसळधार पाऊस झाला आहे. या पावसामुळं एका तासामध्येच गावालगत असलेल्या ओढ्याला महापूर आला. ओढा पात्र पूर्णपणे भरून फुलाच्या साईटने डांबरी रस्त्यावर जत सांगली रस्त्यावरती पाणी मोठ्या प्रमाणात आले. तब्बल एक तास जत सांगली रस्ता बंद होता. वाहने दोन्ही साईटने रांगा लावून उभ्या होत्या. पाणी मोठ्या प्रमाणात वाहत असल्याने वड्या लगतच्या रामोशी वस्ती व मकानदार वस्ती मधील घरामध्ये पाणी घुसले आहे. त्यामुळे राहत्या घरामधील नागरिकांची तारांबळ उडाली आहे. घरातील साहित्य पाण्यामध्ये गेल्याने लाखोचे नुकसान झाले आहे. पाऊस मोठ्या प्रमाणात झाल्याने ऊस. मका. उडीद बाजरी या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
पुराच्या पाण्यात पडलेल्या महिलेची एका तासानंतर सुखरूप सुटका

Beed News : बीडच्या माजलगाव तालुक्यातील मोगरा गावची एक महिला पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची घटना घडली होती. मात्र, गावकऱ्यांच्या सतर्कतेने एक तासानंतर या महिलेला पुराच्या पाण्यात बाहेर काढून वाचवण्यात यश आलं आहे. सोनाली बिजुले असे या महिलेचे नाव असून ती आपल्या पतीसोबत नदीचा पूल पार करत असताना अचानक पूल खचला. त्यावेळी सोनाली या दहा फूट खोल नदीत पुरामध्ये कोसळल्या. यावेळी त्यांच्या पतीने इतर लोकांच्या मदतीने तब्बल एक तासानंतर मोठ्या शर्तीने आपल्या पत्नीला पाण्याच्या बाहेर काढले आहे. 

यवतमाळमधील अडान नदीला पूर, यवतमाळ ते दारव्हा मार्ग बंद

Yavatmal Rain : यवतमाळ जिल्ह्यात काल रात्री जोरदार पाऊस झाला. या पावसामुळं बोरीअरब येथून वाहणाऱ्या अडाण नदीला पूर आला आहे. त्यामुळं बोरी अरब जवळच्या पुलावरुन पाणी वाहत आहे. त्यामुळं यवतमाळ ते दारव्हा मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. या ठिकाणी बॅरेकेट्स लावण्यात आले आहेत.

सांगलीच्या आटपाडी, जत तालुक्यात रात्री मुसळधार पाऊस

Sangli Rains : आटपाडी, जत तालुक्यात रात्रीच्या सुमारास मुसळधार पाऊस झाला. आटपाडी तालुक्यातील करगणीमध्ये सहाच्या सुमारास आठवडी बाजारात पावसाने दैना उडाली. मुसळधार पावसाने बाजारातील भाजीपाला वाहून गेला. यामध्ये भाजीपाला विक्रेत्याचे मोठे नुकसान झाले. दुसरीकडे जत तालुक्यातील डफळापूरमध्ये रेकॉर्ड ब्रेक मुसळधार पाऊस झाला आहे. या पावसामुळे एका तासामध्येच गावालगत असलेल्या ओढ्याला महापूर आला. ओढा पात्र पूर्णपणे भरुन पुलाच्या बाजूने डांबरी रस्त्यावर जत सांगली रस्त्यावर पाणी मोठ्या प्रमाणात आले. तब्बल एक तास जत सांगली रस्ता बंद होता. वाहने दोन्ही बाजूने रांगा लावून उभ्या होत्या. पाणी मोठ्या प्रमाणात वाहत असल्याने ओढ्यालगतच्या रामोशी वस्ती आणि मकानदार वस्तीमधील घरामध्ये पाणी घुसले. त्यामुळे राहत्या घरामधील नागरिकांची तारांबळ उडाली आहे. घरातील साहित्य पाण्यामध्ये गेल्याने लाखोचे नुकसान झाले. पाऊस मोठ्या प्रमाणात झाल्याने ऊस, मका, उडीद, बाजरी या पिकांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले.

बुलढाणा जिल्ह्यातील सर्वात मोठं खडकपूर्णा धरण 85 टक्के भरलं, आज विसर्ग होणार

Buldhana Rain : बुलढाणा जिल्ह्यातील सर्वात मोठे धरण असलेले खडकपूर्णा धरण हे 85 टक्के भरलं आहे. आज दुपारी एक वाजता धरणाचे तीन दरवाजे अर्धा मीटरने उघडून खडकपूर्णा नदीत मोठा विसर्ग सोडण्यात येणार आहे. त्यामुळं खडकपूर्णा नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्क रहावे असा इशारा प्रशासनाने दिला आहे.

अहमदनगर शहरात मुसळधार पाऊस, नगर-कल्याण विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्ग बंद

Ahmednagar Rain : अहमदनगर शहरात काल रात्री झालेल्या पावसामुळे नगर-कल्याण विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्ग हा बंद झाला आहे. सीना नदीच्या पुलावरुन पाणी वाहत असल्यानं दोन्ही बाजूच्या रस्त्यानं होणारी वाहतूक बंद झाली आहे. पुलावरचे पाणी पाहण्यासाठी नागरिक गर्दी करत आहेत. सकाळी शाळेत विद्यार्थ्यांना सोडण्यासाठी आलेले पालक मुलांना परत घरी घेऊन जात आहेत.

गंगापूर तालुक्यातील लासूर गावात जोरदार पाऊस, प्राथमिक आरोग्य केंद्रात शिरलं पाणी

Aurangabad Rain : गंगापूर तालुक्यातील लासूर गावात जोरदार पाऊस झाला. या पावसामुळं रस्त्यावरील पाणी प्राथमिक आरोग्य केंद्रात शिरलं आहे. आरोग्य केंद्रात उपचार घेणाऱ्या रुग्णांना संपूर्ण रात्र जागून काढावी लागली. समोरील जागेतही पाणी साचल्यामुळे नवीन येणाऱ्या रुग्णांचे हाल होत आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्र लासुर स्टेशनमध्ये दरवर्षी अशाच प्रकारचे पाणी साचत असल्यानं उपचार घेणाऱ्या रुग्णांना व कर्मचाऱ्यांना त्रास सहन करावा लागतो. मागील कित्येक वर्षांपासून वार्डातील व कार्यालयातील खोल्यांमध्ये पाणी साचून औषधे, रजिस्टर, कपाट, फ्रिज, संगणक असा दस्तऐवज भिजत असल्याचे निदर्शनास येत आहे.

यंदाच्या पावसाळ्यात आतापर्यंत महाराष्ट्रात जिल्हानिहाय सर्वाधिक पाऊस किती झाला? 

यंदाच्या पावसाळ्यात आतापर्यंत महाराष्ट्रात जिल्हानिहाय सर्वाधिक पाऊस किती झाला? 


(1 जूनपासून ते 4 ऑगस्टपर्यंत)
——— 


 नांदेड : १०२ टक्के 
 लातूर : ६७ टक्के
 नाशिक : ६५ टक्के
 उस्मानाबाद : ६३ टक्के
 वर्धा : ६२ टक्के 
 परभणी : ४८ टक्के
 बीड : ४७ टक्के
 गडचिरोली : ४५ टक्के
 औरंगाबाद : ४३ टक्के
 नागपूर : ४१ टक्के 
 चंद्रपूर : ३७ टक्के
 पालघर : ३५ टक्के 
 यवतमाळ : ३५ टक्के 
 पुणे : २८ टक्के

उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तेर ढोकी परिसरात मुसळधार पाऊस, शेतीचं मोठं नुकसान



Osmanabad Rain : उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तेर ढोकी परिसरात मुसळधार पाऊस झाला आहे. या पावसानं शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नदी नाले व ओढे यात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. मुसळधार पावसाने अनेक ठिकाणी शेतीचे बांध फुटल्याने शेती वाहून गेली असून शेतकरी पुन्हा एकदा अतिवृष्टीने संकटात सापडला आहे.

 

 

 


 


आंबोलीमध्ये सलग पाच तास ढगफुटी सदृश्य पाऊस, आंबोली घाटातील वाहतूक ठप्प

आंबोलीमध्ये सलग पाच तास ढगफुटी सदृश्य मुसळधार पाऊस झाला आहे. या मुसळधार पावसामुळे सुरक्षिततेच्या पार्श्वभूमीवर आंबोली घाटातील वाहतूक पोलिसांनी थांबवली आहे. माडखोल नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.  तेरेखोल नदीची पाणीपातळीत वाढ नाही. मात्र बांदा पोलिसांनी व्यापारी आणि ग्रामस्थांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.

पार्श्वभूमी

Maharashtra Rains Live Updates : हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार राज्यातील विविध भागात जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. या पावसामुळं काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे. मुंबई, ठाणे, पनवेल, पालघर, नवी मुंबई यासह लातूर, सोलापूर या जिल्ह्यात तुफान पाऊस झाला आहे. तसेच पुणे, नाशिक, रायगड, सातारा या जिल्ह्यात मध्यम ते हलक्या स्वरुपता पावसानं हजेरी लावली आहे. दरम्यान, हवामान विभागाकडून, महाराष्ट्रासाठी पुढील चार दिवस चांगल्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.  


लातूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस


लातूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला आहे. निलंगा आणि औसा तालुक्यात ढगफुटी झाली असून शेताचे रुपांतर शेततळ्यात झाले आहे. त्यामुळं पिकं वाहून गेली आहेत. पुलावर पाणी आल्यामुळे विद्यार्थी आणि शेतकरी अडकून पडले आहेत.   कमी कालावधीमध्ये झालेल्या तुफान पावसाने शेतातील पिकं वाहून गेली आहेत. लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यात जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. भेटा आणि अंदोरा गावाच्या शिवारात तुफान पाऊस झाल्यामुळे भेटा - अंदोरा पुलावरून पाणी वाहत आहे. पुलावरून पाणी वाहत असल्याने विद्यार्थी आणि शेतकऱ्यांना घरी जाण्यासाठी पाणी उतरण्याची वाट पहावी लागणर आहे. 


नाशिक पाऊस


जुलैच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यात नाशिक सह जिल्हाभरात पावसाने थैमान घातले होते. त्यानंतर शेवटच्या आठवड्यात पावसाने उघडीप दिली. त्यामुळे नागरिकांनी दिलासा व्यक्त केला होता. त्यानंतर दोन दिवसांपासून वातावरणात बदल होऊन ढगाळ वातावरण पाहायला मिळाले. मात्र काल रात्रीपासून नाशिक जिल्ह्यात जोरदार पावसाला सुरुवात झाली. नाशिक शहरासह मुंबई नाका, सीबीएस, पाथर्डी फाटा, गंगापूर नाका, गंगापूर रोड परिसरात सायंकाळी सहा वाजेच्या दरम्यान मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यानंतर पुढील एका तासातच शहरात तब्बल 27 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. 


दरम्यान एका तासांत पडलेल्या मुसळधार पावसाने नागरिकांची अक्षरशः तारांबळ उडाली होती. रस्त्यावर पाणीच पाणी झाल्याचे पाहायला मिळाले, अनेक रस्त्यांवर पाणी साचल्याने चालकांना वाहणे चालविणे कठीण झाले होते. तर शहर परिसरात म्हणजे नाशिक रोड, गिरणारे परिसरात मध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली होती. नाशिकसह राज्यातील काही भागात पुढील काही दिवस मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. 


नागपूर विभागात सरासरीपेक्षा अधिक पाऊस


नागपूर विभागात जुलै महिन्यात सरासरी 360.10 मिलिमीटर पाऊस पडतो, यावर्षी प्रत्यक्षात 684.22 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. सरासरीपेक्षा 190 टक्के अधिक पाऊस पडल्यामुळे निर्माण झालेली पूरपरिस्थिती, सततचा पाऊस यामुळे शेतपिकांचे, पायाभूत सुविधांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नदी काठावरील गावांना पुराचा धोका निर्माण झाल्याने अशा गावांतील नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले होते. राज्य शासनाने पूरग्रस्तांना तातडीची मदत दिली असून अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसानीचे पंचनामे करण्यात आले आहेत. त्यानुसार शासनाला अहवाल सादर करण्यात येत असल्याचे विभागीय आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी सांगितले.


 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.