Maharashtra Rains Live Updates : राज्यात पावसाचा जोर कमी, मुंबईसह परिसरात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस

Advertisement

Maharashtra Rains Live Updates : सध्या राज्यात पावसाचा जोर कमी झाला आहे. मात्र, काही भागात चांगला पाऊस पडत आहे.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 29 Jul 2022 12:06 PM
पाचगणी, कुडाळ, मेढा आणि वाई भागात चांगला पाऊस, कवठे गावातील घरात शिरलं पाणी

Satara Rain : सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये अचानक पावसाचा जोर वाढला आहे. त्यात पाचगणी, कुडाळ, मेढा आणि वाई भागात चांगलाच पाऊस झाला आहे. पाचगणीतील रस्त्यावर नदीचे स्वरुप आले होते. वाई तालुक्यातील कवठे या भागात ढगफुटी सदृश्य असा पाऊस झाल्याने या परिसरातील बाजारपेठेत घरात पाणी घुसले आणि मध्यरात्री लोकांची चांगलीच तारांबळ उडाली. झोपलेल्या लोकांना दरवाजा बाहेरही येता येत नव्हते. पाऊस थांबल्यानंतर पाणी ओसरु लागले आहे. ढगफुटी सदृश पावसाने शेतकऱ्याचे मात्र मोठं नुकसान केलं आहे.

Continues below advertisement
नंदूरबार जिल्ह्यातील विरचक धरणात 80 टक्के पाणीसाठा, धरणातून विसर्ग सुरु

Nandurbar Rain : गेल्या दोन वर्षापासून नंदूरबार जिल्ह्यातील विरचक धरण पूर्ण क्षमतेने भरले नव्हते, मात्र यावर्षी जुलै महिन्यात शिवम नदीच्या उगम स्थळावर चांगला पाऊस झाल्याने शिवण नदीवरील विरचक धरणात 80 टक्के पाणीसाठा झाला आहे. पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी धरणाचे दोन दरवाजे अंशतः उघडण्यात आले होते. शिवण नदी पात्रात पाण्याचा विसर्ग होत आसल्यानं दोन वर्षानंतर शिवण नदी दुथडी भरुन वाहत आहे. नंदूरबार शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या विरचक धरणात 80 टक्के पाणी साठा झाल्याने नंदुरबार नगरपरिषदेने सुरु केलेली पाणी कपात 1 ऑगस्टपासून रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. 1 ऑगस्टपासून शहरात पुन्हा पुर्ववत पाणी पुरवठा केला जाणार आहे. गेली दोन वर्षे अपुऱ्या पावसामुळं विरचक धरणात मुबलक पाणीसाठा राहत नव्हता. यंदा मात्र पावसानं चांगली हजेरी लावल्यानं धरणातून शिवण नदीच्या पात्रात विसर्ग सुरु करण्यात आला आहे.

पार्श्वभूमी

Maharashtra Rains Live Updates : सध्या राज्यात पावसाचा जोर कमी झाला आहे. मात्र, काही भागात मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळं अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे. नदी नाल्यांना पूर आल्यानं नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. तसेच शेतीचही मोठं नुकसान झालं आहे. दरम्यान, मुंबई आणि परिसरात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. तसेच पुणे आणि सोलापूर जिल्ह्यातही  पावसानं हजेरी लावली. त्याचबरोबर विदर्भ आणि मराठवाड्यात काही ठिकाणी देखील पाऊस झाला आहे. दरम्यान, आजही राज्यातील काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. 


मुसळधार पावसामुळं नदी नाल्यांना पूर आल्यानं नागरिकांना मोठा अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषत: मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. शेती पिकांचं मोठं नुकसान झाल्यानं शेतकरी संकटात सापडला आहे. जवळपास आठ लाख हेक्टरहून अधिक शेतकऱ्यांच्या पिकांना मोठा फटका बसला आहे. या नुकसानीचे ध्या पंचनामे सुरु असून, शेतकऱ्यांना तत्काळ मदत देण्याची मागणी केली आहे.


नागपूर पाऊस


यावर्षी मान्सूनचे उशीरा आमगन झाले असले तरी, पावसाळ्याच्या दोन महिन्यात आतापर्यंत विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे यावेळी जुलै महिन्यात सर्वाधिकवेळा अतिवृष्टीची नोंद हवामान खात्याने घेतली आहे. मागील 10 वर्षांच्या मान्सूनच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास जुलै अखेरपर्यंत साधारणः 400 मिमी पावसाची नोंद केली जाते. यंदा मात्र पावसाने चांगलाच जोर धरला. नागपूर शहरात आतापर्यंत 746.9 मिली मीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. एवढाच पाऊस जिल्ह्यातही नोंदविण्यात आला आहे. जो सरासरी जून-जुलै महिन्यात होणाऱ्या पावसाच्या 300 मिमी अधिक आहे. जून महिन्याच्या अखेरीस 119 मिमी पावसाची नोंद झाली होती. तर जुलै या एकाच महिन्यात 627 मिमी  पावसाची नोंद हवामान खात्याने केली आहे.


नंदूरबार जिल्ह्यातही काही ठिकाणी पाऊस


नंदूरबार जिल्ह्यातही काही ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली. नवापूर तालुक्यातील निमदर्डा गावाजवळ नागन नदीवर पुलाचे काम सुरु आहे. त्यामुळं पर्यायी पूल बनवण्यात आला होता. मात्र, पंधरा दिवसांपूर्वी नागन नदीला आलेल्या पुरात हा पर्यायी पूल वाहून गेला होता. त्यानंतर संपर्क तुटलेल्या दहा गावांचा संपर्क करण्यासाठी पुन्हा पर्यायी पूल बनवण्यात आला होता. मात्र नागन नदीच्या पाणी पातळीत पुन्हा अचानक वाढ झाल्यानं नवीन बनवण्यात आलेला पूल दुशऱ्यांदा वाहून गेला आहे. त्यामुळं परिसरातील दहा गावांचा संपर्क तुटला आहे.


 

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.