Maharashtra Rain : सध्या राज्यात पावसाचा (Rain) जोर कमी झाला आहे. राज्याच्या काही भागात हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसानं हजेरी लावली आहे. मुंबईसह ठाणे परिसरात देखील तुरळक ठिकाणी पावसानं हजेरी लावली. तसेच बीड जिल्ह्यातही पावसानं हजेरी लावली. दरम्यान, सध्या राज्यात परतीच्या पावसासाठी पोषक वातावरण तयार झालं आहे. हवामान विभागानं (Meteorological Department) दिलेल्या माहितीनुसार आजही राज्यात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्रासह कोकणात आज पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळं नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.


आज कोकणातील तिन्ही जिल्ह्यात पावासाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तसेच पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर वगळता इतर जिल्ह्यात पावासाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तसेच नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यातही आज पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळं आज देखील राज्यात पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. तसेच आणखी पुढचे तीन दिवस राज्यात पाऊस पडण्याची शक्यता देखील हवामान विभागानं वर्तवली आहे.


यलो अलर्ट म्हणजे नेमकं काय?


यलो अलर्ट म्हणजे नेमकं काय असा प्रश्न सगळ्यांना पडला असेल. तर या यलो अलर्टमध्ये हवामान खात्यानं हलक्या पावसाची शक्यता वर्तवलेली असते. तसेच यलो अलर्ट हा सावध राहण्यासाठी दिला जातो. हा इशारा वॉचसाठी दिलेला असतो. जेव्हा हवामानात बदल होतो तेव्हा हा अलर्ट दिला जातो. तुम्‍हाला तत्‍काळ धोका नाही. परंतु, हवामानाची स्थिती पाहता, तुम्‍ही ठिकाण आणि तुमच्‍या प्रवासाची काळजी घेतली पाहिजे, असे या अलर्टचा अर्थ आहे.


5 ते 10 ऑक्टोबर दरम्यान महाराष्ट्रातून मान्सून माघारी फिरणार


देशात परतीच्या मान्सूनसाठी पोषक वातावरण तयार झाला आहे. वायव्य राजस्थान आणि गुजरातमधील कच्छमधून मान्सून आधीच माघारी परतला आहे. तर दुसरीकडे जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, पश्चिम उत्तर प्रदेश, हरियाणासह दिल्लीतूनही मान्सून माघारी फिरला आहे. त्यामुळं आता पावसाची शक्यता कमी आहे. दरम्यान, महाराष्ट्रातील काही भागात पाऊस पडत आहे. 5 ते 10 ऑक्टोबर दरम्यान महाराष्ट्रातून मान्सून माघारी फिरणार आहे. तर 8 ऑक्टोबरला मुंबईतून मान्सून निरोप घेणार असल्याची माहिती हवामान विभागानं  दिली आहे. 


राज्यात  सरासरीपेक्षा अधिक पाऊस


जून महिन्यात राज्यात पावसानं उघडीप दिली होती. मात्र, त्यानंतर जुलै आणि ऑगस्ट महिन्यात पावसानं राज्यात धुमाकूळ घातला होता. तसेच सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला देखील राज्यात चांगल्या पावसानं हजेरी लावली होती. राज्यातील बहुतांश जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. काही ठिकाणी तर अतवृष्टी झाली आहे. याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठं नुकसान झालं आहे, शेतकऱ्यांची उभी पिकं वाया गेली आहेत. तर अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या जमिनी खरवडून गेल्या आहेत. तसेच या पावसामुळं धरणांच्या पाणी साठ्यात देखील मोठी वाढ झाली आहे. जवळपास राज्यातील 27 लाख शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा फटका बसला आहे.


महत्त्वाच्या बातम्या:


Maharashtra Monsoon : 5 ते 10 ऑक्टोबर दरम्यान मान्सून महाराष्ट्राचा निरोप घेणार, हवामान विभागाची माहिती