Maharashtra Rain Updates:  मुंबईसह राज्यातही काही ठिकाणी पावसाने (rain in Maharashtra) दमदार हजेरी लावली. दमदार पावसाने काही जिल्ह्यातील बळीराजा सुखावला. तर, काही ठिकाणी पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. लांजा तालुक्यातील काजळी नदीला पूर आल्याने मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. ठाणे जिल्ह्यातही पावसाने चांगली हजेरी लावलीय भिवंडी, अंबरनाथमध्ये पावसामुळे काही ठिकाणी पाणी साचले. वाहतुकीवरही परिणाम झाला आहे.


परभणीत सकाळपासून संततधार पाऊस 


परभणी जिल्ह्यात आज सकाळपासून सर्वत्र संततधार पाऊस सुरू आहे.  सायंकाळी मात्र या पावसाचा जोर वाढला असून अनेक दिवसानंतर परभणी जिल्ह्यामध्ये दमदार पाऊस होत आहे. यामुळे पीक बहरली आहेत. सकाळपासून सुरू असलेल्या पावसाने शहरातील छोट्या मोठ्या ओढे व नाल्यांना पाणी आले असुन रस्त्यावरही पाणी साचायला सुरुवात झाली आहे. 


नागपूरमध्ये मुसळधार पाऊस 


नागपूर (Nagpur Rain) जिल्ह्यातही मुसळधार पाऊस सुरु आहे. जोरदार पावसामुळं नागपूरचा अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो झाला आहे. तसेच शहरातील अनेक रस्त्यांना नद्यांचं स्वरुप आलं आहे. दरम्यान, हिंगणा भागातील वेणा नदीला पूर आला आहे. यामध्ये काही नागरिक अडकले होते, त्यांना सुखरुप बाहेर काढण्यात आलं आहे. 


अहमदनगर जिल्ह्यात पावसाची हजेरी, शेतकरी सुखावला


अहमदनगर शहरसह जिल्ह्यात दमदार पावसाने हजेरी लावली आहे. जुलै महिना लोटला तरीही अहमदनगर जिल्ह्यातील दक्षिण भागातील तालुक्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा होती. अहमदनगर शहरासह कर्जत-जामखेडचा काही भाग, पाथर्डी, श्रीगोंदा, पारनेर, शेवगाव तालुक्यात दुपारपासून जोरदार पावसाने हजेरी लावली. शेवगाव, पाथर्डी तालुक्यात दमदार पाऊस न झाल्याने दुबार पेरणीचे संकट ओढवले होते. मात्र, आज जिल्ह्यात सर्वदूर जोरदार पाऊस बरसला आहे. त्यामुळे पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण पाहायला मिळत आहे. उशिरा का होईना दक्षिण नगर जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला आहे. नगर शहरात पाऊस झाल्याने सखल भागात पाणी साचले आहे.



वर्धा जिल्ह्यात पावसाची हजेरी


वर्धा जिल्ह्यात जोरदार पावसाने हजेरी लावली. वर्धामधील हिंगणघाट तालुक्यात झालेल्या पावसामुळे अनेक रस्ते बंद झाले. तर नद्या देखील भरल्या आहेत.  हिंगणघाट परिसरात जास्त पाऊस झाला असून हिंगणघाट ते वाळदुर या मार्गावरील पूलच वाहून गेला आहे. परिसरातील शेकडो एकर शेती या पुराने खरडून गेली आहे. 



मालवण मधील तोंडवळीमधील नवीन जेट्टीला फटका


सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण मधील तोंडवळी किनारपट्टी भागात समुद्री उधानाचा फटका बसला असून नवीनच बांधलेली जेटी ही वाहून जाण्याच्या स्थितीत आहे. सततचा पडणारा पाऊस आणि समुद्राला आलेल्या उधाणाचा जोर वाढल्याने त्याचा फटका मधली तोंडवळीला बसला आहे. मधली तोंडवळी किनारी बंधारा नसलेल्या भागात मोठया प्रमाणात धूप होऊन समुद्राने भूभाग गिळंकृत केला आहे. याच भागात दोन वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या जेटीचा पाया उद्धवस्त झाला असून जेटी वाहून जाण्याच्या मार्गावर आहे. येणाऱ्या पौर्णिमेपर्यंत उधाणाचा जोर अजून वाढणार आहे. त्यामुळे समुद्राचे पाणीही वस्तीच्या दिशेन मार्गक्रमण करत आहे. उधाणाचा जोर कायम राहिल्यास मोठी धूप होण्याची शक्यता ग्रामस्थांनी वर्तवली.



पालघरमधील धामणी धरणाचे पाच दरवाजे पन्नास सेंटीमीटरने उघडले सूर्या नदीत विसर्ग


पालघर जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून जोरदार पाऊस सुरू असून रात्रीपासून धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे. पालघर जिल्ह्यातील सूर्या प्रकल्पाचे सर्वात मोठी पाणी क्षमता असलेलं धामणी धरण 97.51 टक्के भरले असून रात्री दोन वाजता धामणी धरणाचे पाचही दरवाजे पन्नास सेंटीमीटरने उघण्यात आले असून धामणी मधून 253.11क्युमेक आणि कवडास मिळून 618.66 क्यूमेक (21829 क्युसेक्स) पाण्याचा विसर्ग सूर्या नदीत करण्यात आला आहे. त्यामुळे सूर्य नदीला मोठा पूर असून नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. धामणी धरणातून पालघर जिल्ह्यातील प्रमुख शहरांसह वसई विरार आणि मीरा-भाईंदर महानगरपालिकांना पाणीपुरवठा होत आहे. तसेच सूर्या प्रकल्पाच्या उजवा आणि डावा कालव्याच्या मार्फत शेतकऱ्यांना शेतीसाठीही पाणीपुरवठा करण्यात येतो. धरण क्षेत्रात आज 188 मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून आत्तापर्यंत 2583 मिलीमीटर पाऊस नोंदविण्यात आला आहे. 


पालघर जिल्ह्यातील जव्हार भागात मुसळधार पाऊस जव्हार नगरपालिका हद्दीतील जांभूळ विहीर भागातील घरांमध्ये पुराचे पाणी शिरलं. अति मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत  झाले आहे.


पालघर जिल्ह्यातील जव्हार विक्रमगड डहाणू तलासरी या तालुक्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरू असून ठीक ठिकाणी सकल भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे तर पुराचा पाणी रस्त्यांवर आल्यामुळे रस्तेही बंद होण्याची पाळी निर्माण झाली आहे. विक्रमगड तालुक्यातील जव्हार कासा रोड वरील तलवाडा येथील मोरीवर पुराचे पाणी आल्यामुळे हा रस्ता सुद्धा बंद झाला आहे. तर सारणी उरसे ऐना या रोडवरील साकवांवर पुराचे पाणी आल्यामुळे जवळपास बारा गावांचा संपर्क तूटला आहे


हिंगोलीत संततधार


हिंगोली जिल्ह्यात आज सकाळपासून संततधार पावसाने हजेरी लावली आहे त्यामुळे नागरिकांची कामे खोळंबली आहेत तर हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसामुळे शेतातील सुध्धा कामे खोळंबली आहेत दिवसभर सुरू असलेला  हा पाऊस शेतातील पिकांना फायदेशीर ठरतोय शेतातील सोयाबीन हळद कापूस तूर यासह अन्य पिकांना या पावसाचं फायदा होतोय तर ढगाळ वातावरणामुळे सकाळपासून सूर्यदर्शन सुध्धा झाले नाही
 
नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यात रात्रीपासून संततधार पाऊस पडतोय, त्यामुळे इस्लापुर गावाजवळच्या ओढ्याला पूर आला असून पुराचे पाणी गावात शिरलंय. त्यातुन इस्लापुर गावाकडून तेलंगणा राज्यातील निर्मलकडे जाणारी वाहतूक ठप्प झालीय. काही सखल भागातील घरात पुराचे पाणी शिरून ग्रामस्थांचे अन्नधान्य भिजल्याने नुकसान झाले आहे. 


लातूरमध्ये मध्यरात्रीपासून पावसाची रिपरिप...


मध्यरात्री पासून लातूर शहर आणि परिसरात पावसाची रिपरिप सुरूच आहे. मागील पाच दिवसांपासून सतत पावसाची रिपरिप सुरू आहे. लातूर जिल्ह्यात काही भागात जोरदार पावसाची हजेरी लागली असली तरीही जिल्हाभरात अजून ही मोठा पाऊस झालाच नाही. हा पाऊस पिकांसाठी चांगला आहे. मोठा पाऊस अद्याप झाला नसल्यामुळे अनेक प्रकल्पात अद्याप पाणी आलेच नाही. ज्या भागात मोठा पाऊस झाला आहे, त्या भागात मोठ्या पावसामुळे शेत जमिनी खरवडून गेल्या आहेत. त्यात जलकोट तालुक्यातील 400 एकर पेक्षा अधिक शेतजमिनीवरील पिके आणि माती खरवडून गेली आहेत. सतत पाच दिवसापेक्षा अधिक काळ सूर्यदर्शन झाले नसल्यामुळे अनेक ठिकाणी कोवळी पिके मान टाकत आहे.