Maharashtra Rain News : गेल्या दोन तीन दिवसांपासून राज्यात पावसानं (Rain) उघडीप दिली आहे. काही ठिकाणी मात्र, हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडत आहे. मुंबईसह (Mumbai) ठाणे (Thane) परिसरात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. तसेच कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यातील काही ठिकाणी पावसानं हजेरी लावली. अन्य ठिकाणी मात्र, पावसानं उघडीप दिली आहे. दरम्यान, आज संपूर्ण विदर्भात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळं तिथे पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. अतिवृष्टीचा मोठा फटका विदर्भ आणि मराठवाड्याला बसला आहे. अशातच आता पुन्हा एकदा पावसाचा इशारा देण्यात आला आहे.


आत्तापर्यंत राज्यात पावसाचे प्रमाण समाधनाकारक राहिले आहे. जूनपासून आत्तापर्यंत राज्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. नदी आणि धरणांच्या पाणी साठ्यात देखील मोठी वाढ झाली आहे. जून महिन्यात पावसानं दडी मारली होती. मात्र, जुलै आणि ऑगस्टमध्ये राज्यात सर्वत्र पावसाने जोरदार हजेरी लावली होती. दरम्यान, मराठवाडा, विदर्भ आणि कोकणात मुसळधार पावसामुळं काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं होतं. अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर आल्यानं वाहतुकीवरही परिणाम झाला होता. तसेच शेतीचंही मोठं नुकसान झालं आहे.   


कोल्हापूर पाऊस


कोल्हापूर जिल्ह्यात सुरु असलेल्या रिपरिपमुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत पुन्हा एकदा वाढ होऊ लागली आहे. पंचगंगा नदीच्या पाणी पातळी 21 फुट 10 इंचांवर पोहोचल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली आहे. पंचगंगेची इशारा पातळी 39 फुट, तर धोका पातळी 43 फुट आहे. पावसाच्या रिपरिपमुळे जिल्ह्यातील अजूनही 13 बंधारे पाण्याखाली आहेत. दुसरीकडे, पाणलोट क्षेत्रामध्ये होत असलेल्या पावसाने राधानगरी धरणाचा सहाव्या क्रमांकाचा उघडला गेला आहे. धरणातून सध्या 3 हजार 28 क्युसेक्सने विसर्ग सुरु आहे. कोल्हापूर शहर परिसरात पावसाने उघडीप दिली असली, तरी राधानगरी, गगनबावडा तसेच भुदरगड तालुक्यात पावसाचे प्रमाण जास्त आहे. 


अतिवृष्टीचा मोठा फटका


राज्यात अतिवृष्टीचा खूप मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. मोठ्या प्रमाणावर शेती पिकांचं नुकसान झालं आहे. अतिवृष्टीनं राज्यातील 81 लाख 2 हजार हेक्टर जमीन बाधीत झाली आहे. यामध्ये जिरायती क्षेत्र 17 लाख 59 हजार 633 हेक्टर असून, बागायती क्षेत्र 25 हजार 476 हेक्टर आहे. फळ पिकांमध्ये 36 हजार 294 हेक्टर एवढे क्षेत्र बाधित झाले असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. अतिवृष्टी आणि पूर यामुळं आत्तापर्यंत सुमारे 138 व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. मृतांच्या कुटुंबियांना चार लाख रुपये तातडीची मदत केली आहे. 21 हजार व्यक्तींना सुरक्षित स्थळी हलवल्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.