Maharashtra Rain : हवामान विभागानं (Meteorological Department) दिलेल्या अंदाजानुसार राज्याच्या काही भागात पावसानं (Rain) हजेरी लावली आहे. रात्रीपासूनच मुंबईसह, ठाणे परिसरात पावसाची रिपरिप सुरु आहे. तसेच पुणे, पालघर, नाशिक आणि यवतमाळ जिल्ह्यातील काही भागात पावसानं हजेरी लावली आहे. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार आजही राज्यात पावासाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. येत्या तीन दिवसांत कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. आज कोकणातील रायगड तसेच ठाणे, पालघर, मुंबई आणि पुण्याला पावासाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
 
दोन दिवसांपासून मुंबईसह पुणे, रायगड, रत्नागिरी, नगर, कोल्हापूर, वर्धा आणि बुलढाणा या जिह्यांमध्ये मुसळधार पाऊस होत आहे. येत्या तीन दिवसांतही मुसळधार ते अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मुंबईत सकाळच्या सुमारास ऊन येते आणि सायंकाळनंतर आभाळ भरून पाऊस सुरू होतो असे वातावरण आहे. नाशिक नंदूरबार, सातारा, रत्नागिरी, कोल्हापूर, आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान, पिकांसाठी पावसाबरोबर पुरेशा सूर्यप्रकाशाचीही गरज असते. परंतू, गेले काही दिवस सतत ढगाळ वातावरण असल्याने शेतकरी मात्र चिंतेत आहेत. अशा वातावरणामुळं शेंगअळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते.


पुढील 3 ते 4 दिवस मान्सून सक्रीय राहणार


पुढील तीन ते चार दिवस मान्सून सक्रीय राहील, अशी माहिती हवामान तज्ञ के.एस. होसाळीकर यांनी दिली आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात याचा मोठा परिणाम होऊ शकतो, असा इशारा देण्यात आला आहे. रायगड आणि रत्नागिरीमध्ये शनिवारपर्यंत तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मात्र सिंधुदुर्गात शुक्रवारपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला गेला आहे.


यलो अलर्ट म्हणजे नेमकं काय?


यलो अलर्ट म्हणजे नेमकं काय असा प्रश्न सगळ्यांना पडला असेल. तर या यलो अलर्टमध्ये हवामान खात्यानं हलक्या पावसाची शक्यता वर्तवलेली असते. तसेच यलो अलर्ट हा सावध राहण्यासाठी दिला जातो. हा इशारा वॉचसाठी दिलेला असतो. जेव्हा हवामानात बदल होतो तेव्हा हा अलर्ट दिला जातो. तुम्‍हाला तत्‍काळ धोका नाही. परंतु, हवामानाची स्थिती पाहता, तुम्‍ही ठिकाण आणि तुमच्‍या प्रवासाची काळजी घेतली पाहिजे, असे या अलर्टचा अर्थ आहे.


ऑरेंज अलर्ट म्हणजे नेमकं काय?


कोकणात आज पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मुसळधार पाऊस असेल त्या ठिकाणी ऑरेंज अलर्ट हवामान खात्याकडून दिला जातो.  ऑरेंज अलर्टमध्ये, रेड अलर्टपेक्षा थोडी कमी धोकादायक स्थिती असते.  ऑरेंज अलर्टचा अर्थ त्या भागात कोणत्याही क्षणी नैसर्गिक आपत्ती येण्याची शक्यता असते.