Delay Sowing in Maharashtra : राज्यात मान्सून दाखल झाला मात्र, अद्याप पाऊसच नसल्याचं चित्र दिसत आहे. शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत आहेत. खरीपाच्या पेरणीसाठी राज्यातील शेतकरी सज्ज झाले आहेत. राज्यात आत्तापर्यंत केवळ 1 टक्काच पेरणी झाली आहे. 18 जिल्ह्यात कमी पाऊस झाला आहे. दरम्यान, 75 मिमी पाऊस झाल्यावरच पेरणी करावी, असा सल्ला कृषी तज्ज्ञांनी दिला आहे. पावसानं ओढ दिल्यानं बहुतेक धरणांनी आता तळ गाठला असून, पाऊस लांबल्यानं जमिनीतील ओलावाही कमी झाला आहे. त्यामुळं राज्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. 
 
एकीकडे हवामान खात्याकडून भाकितांचा पाऊस पडतोय, तर दुसरीकडे राज्यभरात पावसाअभावी पेरणी रखडली आहे. मान्सूननं महाराष्ट्र व्यापल्याचं हवामान खात्यानं जाहीर केलं असलं तरी प्रत्यक्षात राज्यभरात पावसाची प्रतीक्षा आहे. जूनचा तिसरा आठवडा संपायला आलाय, तरी राज्यभरात केवळ 1 टक्का इतकीच पेरणी झाली आहे. राज्यातील खरीपाच्या दीड कोटी हेक्टर क्षेत्रापैकी 17 जूनपर्यंत केवळ एक लाख 47 हजार हेक्टरवर (एक टक्का) पेरणी झाली आहे. गतवर्षी 17 जूनपर्यंत पावणेपाच लाख हेक्टरवर पिकांची पेरणी झाली होती. पण, आता पावसानं दडी मारल्याने शेतकऱ्यांना पेरणीची तिफण गोठ्यातच ठेवावी लागली आहे. राज्यात खरीप हंगामातील तृण धान्याखालील क्षेत्र 36 लाख 37 हजार हेक्टरपर्यंत आहे. तर तेलबियांचे (भुईमूग, तीळ, कारळ, सुर्यफूल, सोयाबीन) क्षेत्र 41 लाख 58 हजार हेक्टर तर कापसाचं क्षेत्र जवळपास 42 लाख हेक्टरपर्यंत आहे.




जून महिन्यात 90 मिलिमीटर एवढाच पाऊस


7 जूनपासून राज्यात मान्सून पावसाला सुरुवात होते आणि त्यामुळं जूनअखेर दरवर्षी जवळपास 54 लाख हेक्टरवर पिकांची पेरणी होते. मात्र, यंदा पावसानं दडी मारल्यानं 17 जूनपर्यंत केवळ एक टक्के क्षेत्रावरच खरीप पिकांची पेरणी तथा लागवड झाली आहे. उजनी धरणासह राज्यातील बहुतेक धरणांनी तळ गाठला आहे. मागील वर्षी 17 जूनपर्यंत सरासरी 120.4 मिलिमीटर पाऊस पडला होता. पण, यंदा जून महिन्यात 90 मिलिमीटर एवढाच पाऊस झाला आहे. त्यामुळं जमिनीतील ओलावा कमी झाला असून पेरणी केलेल्या बियादेखील उगवलेल्या नाहीत. बळीराजाचे डोळे आता आभाळाकडे लागले असून पाऊस पडल्याशिवाय बळीराजाची चिंता दूर होणार नाही, अशी स्थिती आहे.


पेरणीची घाई नको


महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात जरी पाऊस झाला असला तरीसुद्धा शेतकऱ्यांनी 75 ते 100 मिलिमीटर पाऊस झाल्याशिवाय कुठेही शेतकर्‍यांनी पेरणी करु नये. पेरणीची घाई करु नये असे मत कृषी विभाग आणि तज्ज्ञांकडून  व्यक्त करण्यात आलं आहे. जोपर्यंत शेतामध्ये तीन ते चार इंच ओल निर्माण होत नाही तोपर्यंत पेरणी करणे हे धोकादायक ठरु शकते. दुबार पेरणीचं संकट शेतकऱ्यांवर येऊ शकतं जे आज परवडणार नाही. त्यामुळं शेतकऱ्यांनी आत्ताच पेरणीची घाई करु नये असे आवाहन करण्यात आलं आहे.




जूनमध्ये कमी पाऊस पडलेले जिल्हे


जूनमध्ये राज्यातील अनेक जिल्ह्यात खूप कमी पाऊस झाला आहे. यामध्ये नांदेड, परभणी, हिंगोली, धुळे, नंदुरबार, सोलापूर, सांगली, औरंगाबाद, जालना, बीड, लातूर, उस्मानाबाद, बुलडाणा, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर या जिल्ह्यांचा समावेश आहे.  या जिल्ह्यात गतवर्षीच्या तुलनेत यंदा पाऊस कमी झाला आहे. त्यामुळे या जिल्ह्यांमध्ये पेरणी खोळंबली आहे.


महत्वाच्या बातम्या: