Maharashtra Rain : राज्याच्या विविध भागात परतीचा पाऊस (Rain) कोसळत आहे. या पावसामुळं शेती पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळं शेतकरी (Farmers) संकटात सापडला आहे. राज्यातील मुंबईसह ठाणे परिसरात पावसानं चांगलीच हजेरी लावली. त्याचबरोबर बीड, लातूर, औरंगाबाद, सातारा, पुणे, सिंधुदुर्ग, परभणी या जिल्ह्यांना परतीच्या पावसानं चांगलचं झोडपलं आहे. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार आजही राज्यात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पुढील दोन ते तीन दिवसात मान्सून काही भागातून माघारी फिरेल. मात्र, तोपर्यंत महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे.


सध्या राज्यात परतीच्या पावसानं धुमाकूळ घातला आहे. या पावसानं राज्यातील शेतकरी संकटात सापडला आहे. अनेक ठिकाणी शेती पिकाचं मोठं नुकसान झालं आहे. सोयाबीन, कापूस, मूग, यासह भाजीपाला द्राक्ष पिकांचे मोठं नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांच्या हाती आलेला घास या परतीच्या पावसानं हिरावून घेतला आहे.  परतीच्या या पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांचे वस्तुनिष्ठ पंचनामे करण्याचे निर्देश कृषिमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी चिंता करु नये असे मंत्री अब्दुल सत्तार म्हणालेत. 


मराठवाड्यात परतीच्या पावसाचं थैमान, बळीराजा संकटात


मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात परतीच्या पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. यामध्ये लातूर, बीड, परभणी, औरंगाबाद या जिल्ह्यांचा समावेश आहे.  परभणी जिल्ह्यात (Parbhani District) सोयाबीन, कापुस, फळबागांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. या पार्श्वभूमीवर तात्काळ पीक विमा, नुकसानभरपाई देण्याची मागणी शेतकरी करत आहेत. शेतकऱ्यांचे काढणीला आलेले आणि काढून ठेवलेले सोयाबीन पाण्यात मिळाले आहे. ठिकठिकाणी सोयाबीनला कोंब फुटले असुन, यासोबतच कापसाचे मोठे नुकसान झाले आहे. सोबतच संत्रा, मोसंबी, सीताफळ बागांचे प्रचंड नुकसान झाले आहे. 


लातूरमध्ये सोयाबीनला फटका


मराठवाड्यातील अनेक भागात सतत परतीचा पावसाचा जोर पाहायला मिळत आहे. लातूर जिल्ह्याचा जर विचार केला तर मागील पाच दिवस सतत पाऊस सुरु आहे. या पावसामुळं काढणीला आलेले सोयाबीन असेल किंवा फुलशेती आणि भाजीपाला शेती याला मोठा फटका बसला आहे. सोयाबीनच्या लागवडीपासून सोयाबीनच्या पाठीमागे काही ना काही संकट येत आहेत. गोगलगायीचा प्रादुर्भाव, विविध रोग आणि अतिवृष्टी अशा तिहेरी फटक्यातून सोयाबीन कसंतरी तगलं होतं. मात्र, परतीच्या पावसानं सोयाबीनचा अक्षरशः चिखल केला आहे.


हिंगोली पाऊस


परतीच्या पावसाने हिंगोली जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पिकांचं नुकसान झालं आहे. जिल्ह्यातील प्रमुख पीक असलेल्या सोयाबीनचे नुकसान झाले आहे. उभ्या असलेल्या सोयाबीनला मोड फुटले आहेत तर अनेक ठिकाणी सोयाबीनच्या शेतामध्ये तळ्याचे स्वरूप प्राप्त झाला आहे. दिवाळी सणाच्या पूर्वी सोयाबीन पीक काढणीला यावं आणि त्या सोयाबीनमधून मिळालेल्या पैशातून दिवाळी साजरी करावी, अशी शेतकऱ्यांची आर्थिक जुळवा जुळवा असते. परंतू या पावसाने शेतकऱ्यांच्या हातात तोंडाशी आलेला घास हिरावला आहे.


महत्त्वाच्या बातम्या:


Maharashtra Rains: परतीच्या पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांचे वस्तुनिष्ठ पंचनामे करा; सरकारचे स्पष्ट निर्देश