Maharashtra Rain News : राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस (Heavy Rain) कोसळत आहे. पावसामुळं अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाल्याचं देखील पाहायला मिळत आहे. दरम्यान, ज्या भागात चांगला पाऊस झालाय, त्या ठिकाणी शेती कामांना वेग आलाय. दरम्यान, आज राज्यात वातावरण (Weather) कसं असेल याबाबतची माहिती हवामान विभागानं दिली आहे. आज राज्यातील काही भागात पावसाचा ऑरेंज अलर्ट (orange alert) देण्यात आला आहे, तर काही भागात पावसाचा यलो अलर्ट (Yellow alert) देण्यात आला आहे. जाणून घेऊयात सविस्तर माहिती. 


आज विदर्भातील काही जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट 


हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, आज विदर्भातील काही जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या भागात आज अति मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. विदर्भातील गडचिरोली, यवतमाळ आणि अमरावती या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. या पावसाच्या पार्श्भूमीवर नागरिकानी योग्य ती खबरदारी घ्यावी असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे.


 कोकणासह पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा यलो अलर्ट


दरम्यान, आज कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. यामध्ये रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा समावेश आहे. तसेच पुणे आणि सातारा जिल्ह्यांना देखील पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्याबरोबर मराठवाड्यातील काही जिल्ह्यांसह विदर्भातील काही जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.


रायगड जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला, वळगणीचे मासे पकडण्यासाठी खवय्यांची धडपड


कोकणात पावसाची लगबग सूरु होताच वळगण मारण्यासाठी मासेप्रेमी धडपड करत असतात. मागील काही तासात रायगड जिल्ह्यात पावसाचा जोर वाढताच अनेक छोट्या मोठ्या नाल्यांना पाणी वाढले आहे. या पाण्यासोबतच येणारे मासे ही खवय्यांची चांगलीच चंगळ समजली जाते. वळगणीचे मासे पकडण्यासाठी अनेक जणांची धडपड सुरू असते . गुरुवारी पडलेल्या जोरदार पावसात रायगड जिल्ह्यातील महाड पोलादपूरात नदी पात्रामध्ये ओव्हाळीत दिवस-रात्र मासे पकडण्यासाठी पागिर व झिला लावून यांसह विविध मासेमारीच्या पद्धतीचा अवलंब करून खवय्ये शेतात व व्हाळीत जाऊन वळगण पकडताना पाहायला मिळत आहेत. यावेळी वळगनित विविध प्रकारचे मासे मिळाले  असून अंड्याने भरलेले हे मासे खवय्यांसाठी चवदार मेजवानी ठरत आहेत. वर्षातून एकदा लागणारी वळगन ही स्थानिक नागरिकांसाठी एक पर्वणीच असून आपली इतर कामे बाजूला ठेवून गावागावातील नागरिक वळगन पकडण्यासाठी मग्न होतात. या माशांची चवच न्यारी असून यामध्ये मळे, शिवडा, दंडाळी, पांडरुस विविध मासे पकडले जातात.


महत्वाच्या बातम्या:


राज्यात कधी पडणार मोठा पाऊस? पंजाबराव डखांनी सांगितली तारीख, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा