Maharashtra Rain News : सध्या राज्यात कुठं जोरदार तर कुठं हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस (Rain) पडत आहे. काही ठिकाणीच मोठा पाऊस पडत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. दरम्यान, पावसाबाबत पंजाबराव डखांनी (Panjabrao dakh) महत्वाचा अंदाज वर्तवला आहे. येत्या 23 तारखेपासून राज्यात मोठा पाऊस होणार असल्याचा इशारा पंजाबराव डखांनी दिला आहे. 


पंजाबरावांनी वर्तवलेल्या आपल्या सुधारित हवामान अंदाजानुसार राज्यात 22 जून पर्यंत भाग बदलत पाऊस पडणार आहे. यानंतर मात्र परिस्थिती बदलणार आहे 23 जून नंतर महाराष्ट्रात विदर्भाकडून पावसाला सुरुवात होणार आहे. 23 जून ते 25 जून दरम्यान तुरळक ठिकाणी पण चांगला मोठा पाऊस पडण्याची शक्यता पंजाबराव डखांनी वर्तवली आहे.


 26 जून ते 30 जून दरम्यान महाराष्ट्रात सगळीकडे मोठा पाऊस पडणार


दरम्यान, 26 जून ते 30 जून दरम्यान महाराष्ट्रात सगळीकडे मोठा पाऊस पडण्याची शक्यता आहे. या पाच दिवसांच्या कालावधीत राज्यात सर्वत्र मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता पंजाबराव डखांनी वर्तवली आहे. एवढेच नाही तर त्यांनी जुलै महिन्यात 10 ते 15 जुलै या कालावधीत चांगल्या पावसाची शक्यता वर्तवली आहे. तसेच 19, 20 आणि 25, 26 जुलै दरम्यानही चांगला पाऊस पडणार असा अंदाजही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.


आज राज्याच्या विविध भागात जोरदार पावसाचा इशारा


हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, आज राज्यातील विविध भागात जोरदार पावसाची शक्यता आहे. यामध्ये पालघर, ठाणे, रायगड आणि मुंबई जिल्ह्यांतील काही ठिकाणी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, पुढील 24 तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबईत पहाटेपासूनच पावसाची रिमझिम पाहायला मिळत आहे. तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण आहे. मुंबईसह पालघर, ठाणे, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग  या भागात मुंबईच्या हवामान खात्यानं यलो अलर्ट जारी केलाय. विदर्भातही आज पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.


ज्या भागात चांगला पाऊस, त्या ठिकाणी पेरणीला सुरुवात 


चांगला पाऊस झालेल्या ठिकाणी शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात देखील केली आहे. दरम्यान, अनेक भागात चांगला पाऊस झाला नाही, त्या भागातील शेतकरी चांगल्या पावसाच्या प्रतिक्षेत आहेत. दरम्यान, जोपर्यंत चांगला पाऊस होत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांनी पेरणी करु नये असं आवाहन कृषी विभागाच्या वतीनं करण्यात आलं आहे. 100 मिलीमीटर पााऊस झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणी करु नये, असं आवाहन कृषी विभागाच्या वतीनं करण्यात आलं आहे.