Maharashtra Politics Ajit Pawar: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (BhagatSingh Koshyari) यांनी छत्रपती शिवाजी महाराज (Shivaji Maharaj) यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यानंतर राज्यभरात संताप व्यक्त केला जात आहे. राज्यपालांना केंद्र सरकारने माघारी बोलवावे अशी मागणी सुरू असताना दुसरीकडे आता राज्यपालांनी पदावर राहण्याबाबत पुनर्विचार करावा, अशी संतप्त प्रतिक्रिया राज्याचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी व्यक्त केली आहे. 


विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी ट्वीट करत आपला संताप व्यक्त केला आहे. अजित पवार यांनी म्हटले की, महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज जगातील सर्वकालिन, सर्वश्रेष्ठ आदर्श राजे आहेत. राजसत्तेचा उपयोग विलासासाठी नव्हे तर लोककल्याणासाठी कसा करता येतो, याचा आदर्श त्यांनी निर्माण केला. छत्रपती शिवरायांना आदर्श मानून महाराष्ट्र आजवर घडला, यापुढेही घडत राहील असेही पवार यांनी म्हटले. 


महाराष्ट्राच्या राज्यपालपदी तीन वर्षांहून अधिक काळ राहूनही माननीय राज्यपाल महोदयांना छत्रपती शिवाजी महाराज समजत नसतील, महाराष्ट्र व महाराष्ट्राची लोकभावना कळत नसेल, तर माननीय राज्यपाल महोदयांनी पदावर राहण्याबाबत गांभीर्यानं पुनर्विचार करण्याची वेळ आली असल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे.


 






पंतप्रधानांनी गांभीर्याने दखल घ्यावी


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यपालांच्या अनावश्यक, अनाकलनीय, निंदनीय वक्तव्यांची गांभीर्याने दखल घेण्याची वेळ आली असल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे. राज्यपालांना सद्बुद्धी लाभो असे म्हणत पवार यांनी राज्यपालांवर टीकास्त्र सोडले.


राज्यपाल कोश्यारी काय म्हटले होते?


औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या 62 व्या दीक्षान्त समारंभात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आपल्या भाषणात म्हटले की,  शिवाजी महाराज तर जुने युगाचे हिरो, डॉ. आंबेडकरांपासून तर डॉ. गडकरीपर्यंत नवीन युगाचे हिरो आहेत.  


छत्रपती शिवाजी महाराज यांना जुन्या युगाचे नायक म्हटल्याने वाद निर्माण झाला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी राज्यपालांना माघारी पाठवण्याबाबत राज्य सरकारने निर्णय घ्यावा असे म्हटले आहे. त्यांनी या मुद्यावरून भाजपवरही टीका केली.