मुंबई : महाविकास आघाडीचे शिल्पकार शरद पवार यांनी महाविकास आघाडी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र लढवणार असे सूतोवाच केले तरी दुसरीकडे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मात्र स्वबळाचा नारा दिला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीमधील मतभेद समोर आले आहेत.


पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची दिल्लीत 45 मिनिट भेट झाली आणि राज्याच्या राजकारणात चर्चाना सुरुवात झाली. पण महाविकास आघाडीचे शिल्पकार शरद पवार यांनी महाविकास आघाडी सरकार पाच वर्षे चालणार आणि लोकसभा, विधानसभा निवडणुका एकत्र लढवणार हे स्पष्ट केलं. 


शरद पवार यांनी महाविकास आघाडी एकत्र असण्याचे स्पष्ट करूनही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे आपल्या दौऱ्यात काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याचा नारा देत आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीत मतभेद असल्याचे चित्र आहे. राष्ट्रवादी आणि सेना एकत्र दिसत असली तरी काँग्रेसचा सूर मात्र वेगळा आहे.


भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी राज्यात तिन्ही पक्ष एकत्र आले आहेत. राज्यातील काँग्रेसची ताकद पाहता काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढण्यात मर्यादा आहेत असं राजकीय विश्लेषकांच मत आहे.


एकीकडे 2024 सालच्या लोकसभा निवडणुकीत भाजप विरोधात सर्व पक्षानी एकत्र यावे यासाठी प्रयत्न सुरु आहेत तर महाराष्ट्रात सत्तेत असूनही काँग्रेस स्वबळाचा नारा देत असल्यामुळे काँग्रेसच्या भूमिकेबाबत प्रश्न निर्माण होत आहे.


महत्वाच्या बातम्या :