Maharashtra Political News : गेल्या काही दिवसांपासून राज्यात सुरु असलेल्या सत्तानाट्याचा आज पंधरावा दिवस. मोठ्या भूकंपातून महाराष्ट्रात नवं सरकार स्थापन झालं आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या राजीनाम्यानंतर राज्याला एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या स्वरुपात नवे मुख्यमंत्री मिळाले. एकनाथ शिंदेंना समर्थन देण्यासाठी त्यावेळी एकापाठोपाठ एक आमदार शिंदेंच्या गटात सामील होऊ लागले. आता हे शिंदे समर्थक आमदार त्यांच्या मतदारसंघात परतणार आहेत. अशातच त्यांचा विरोध होतो? की स्वागत होणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे


शिंदे समर्थक आमदार मतदारसंघात परतणार; कुठे स्वागत, कुठे विरोध?
हिंगोली-आमदार संतोष बांगर सकाळी 7 वाजता हिंगोलीत पोहचणार आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार त्यांना शिवसैनिकांच्या रोषाला सामोर जावं लागू शकतं.


मुंबई- शिंदे समर्थक आमदार प्रकाश सुर्वे यांच्याकडून शक्तीप्रदर्शन केले जाणार आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान ते अशोक वन परिसरात स्वागत रॅली काढली जाणार आहे. शेकडो कार्यकर्त्यांसह या शक्ती प्रदर्शनात सेना खासदार श्रीकांत शिंदे यांची हजेरी असेल.


जळगाव- बंडखोर आमदार गुलाबराव पाटील आणि किशोर पाटील जळगावमध्ये पोहोचणार आहेत. मंत्रीपद मिळाल्यानंतरच जल्लोष केला जाणार असल्याची माहिती गुलाबराव पाटील यांच्या निकटवर्तीयांनी दिली आहे. तर पाचोरा आमदार किशोर पाटील समर्थक मात्र आयत्या वेळी जल्लोष करण्याची शक्यता आहे.


धुळे- एकनाथ शिंदे यांच्या गटात गेलेल्या साक्री विधानसभा मतदार संघाच्या आमदार मंजुळा गावित आणि त्यांचे पती शिवसेनेचे जिल्हाप्रमुख डॉक्टर तुळशीराम गावित हे आज धुळ्यात येणार आहेत. त्यांचे स्वागत केले जाणार आहे.



आमदारांपाठोपाठ आता खासदारांचा दबाव? खा. राहुल शेवाळेंचे उद्धव ठाकरेंना पत्र


राष्ट्रपती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या खासदाराचा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर भाजप प्रणित राष्ट्रपती उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्यासाठी दबाव वाढत असल्याचं चित्र आहे. आदिवासी महिलेच्या कर्तृत्वाची दखल घेऊन त्यांना पक्षाने पाठिंबा द्यावा अशी मागणी राहुल शेवाळे यांनी एका पत्राद्वारे केली आहे. महत्त्वाचं म्हणजे राहुल शेवाळे यांच्या विचाराचे 11 खासदार असल्याची माहिती आहे. 


..अन् महाविकास आघाडी सरकार कोसळलं


शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि राज्यात नवं सरकार स्थापन झालं. विशेष म्हणजे, राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. राज्यात नवं सरकार स्थापन झालं.शिवसेनेचे प्रबळ नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड केलं आणि राज्यातील सत्तासंघर्षाची सुरुवात झाली. शिवसेनेतील काही आमदारांसह 21 जून रोजी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) नॉट रिचेबल झाले आणि शिवसेनेतील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला. एकापाठोपाठ एक आमदार आणि मंत्री एकनाथ शिंदेंच्या गटात सामील होऊ लागले. खरं तर तेव्हापासूनच महाविकास आघाडी सरकारचं काउंटडाऊन सुरु झालं होत. भावनिक साद, आवाहन, अल्टिमेटम सर्व काही करुन झालं पण बंडखोर आमदार आपल्या भूमिकेवर ठाम होते. आरोप-प्रत्यारोपांची सत्र रंगली आणि अखेर या राजकीय नाट्यावर पडदा पडला तो म्हणजे, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या राजीनाम्यामुळे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्री पदाचा त्याग केला आणि गेल्या अडीच वर्षांपासून महाराष्ट्रात सत्तेत असलेलं महाविकास आघाडी सरकार कोसळलं.