Kirit Somaiya : मी सगळ्या प्रकारच्या चौकशीला सामोरे जायला तयार आहे, कोर्टाने चार दिवस आर्थिक गुन्हे शाखेकडे चौकशीला दिले आहेत, चार दिवस रोज तीन तास त्यांना हवी ती माहिती घेऊ शकतात, असं वक्तव्य भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी एबीपी माझा सोबत बोलताना केले आहे. आयएनएस विक्रांत प्रकरणी अडचणीत सापडलेले भाजपचे नेते किरीट सोमय्यांची (Kirit Somaiya)आर्थिक गुन्हे विभागातर्फे चौकशी करण्यात येत आहे. दरम्यान ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात किरीट सोमय्यांविरोधात पहिला गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर तो खटला आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला.


चार दिवस काय चार वर्षे उद्धव ठाकरे यांनी माझी चौकशी करावी - सोमय्या
सोमय्यांनी यावेळी उद्धव ठाकरेंनी आव्हान केलंय, ते म्हणाले की, आमच्याकडे जी माहिती आहे ती जगाला माहिती आहे. जे काय आमच्याकडून हवे ते सगळी माहिती आम्ही देऊ, चार दिवस काय चार वर्षे उद्धव ठाकरे यांनी माझी चौकशी करावी, कारण पाप त्यांच्या पोटात आहे 


57 कोटी रुपयांचा आकडा आणला कुठून? संजय राऊतांना सवाल
हायकोर्टात हे सगळं प्रकरण आहे आणि हायकोर्टाने विचारलं आहे की, 57 कोटी रुपयांचा आकडा तुम्ही आणला कुठून? आता पोलिसांनी संजय राऊतांना विचारावा लागणार की आरोप कसा केला गेला, संजय राऊत म्हणाले होते की, किरीट सोमय्या यांनी 57 कोटी रुपये ढापले, तसेच त्यांनी आपल्या अकाउंट मधून मुलाच्या अकाउंट मध्ये ट्रान्सफर केले. या संदर्भात माहिती कोर्टाने ठाकरेंकडे मागितली,  मात्र ठाकरेंकडे काहीच नाही, नुसती फेकाफेकी त्यांनी यासंदर्भात केलीये. त्यामुळे सोमय्या कुटुंबांनी कधीही पैसे ढापण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही, असे सांगत सोमय्यांनी संजय राऊतांचे आरोप खोडून काढले आहेत. 


मी न्यायदेवतेचा सन्मान करतो. ठाकरे सरकार सारखा अपमान करत नाही - सोमय्या
आयएनएस विक्रांत प्रकरणी अडचणीत सापडलेले भाजपचे नेते किरीट सोमय्यांची (Kirit Somaiya)आर्थिक गुन्हे विभागातर्फे चौकशी करण्यात येत असून यावर सोमय्या म्हणाले, मला न्यायव्यवस्थेने सांगितले, पोलिसांना चौकशीमध्ये सहकार्य करा.  मी न्यायदेवतेचा सन्मान करतो. ठाकरे सरकार सारखा अपमान करत नाही. 


खोदा पहाड निकला चूहा


सोमय्या यांनी काल माध्यमांशी संवाद साधला. तेव्हा सोमय्या म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माझ्यावर आतापर्यंत साडे सात हजार कोटी, ईडी सोबत पार्टनरशिप, जुहूच्या 100 कोटीचा प्लॉट, वसई पालघरमध्ये वाधवान सोबत 426 कोटी रुपयांचा आरोप, असे जवळपास एक डझन माझ्यावर आरोप लावलेत.  एसआयटी स्थापन केल्या मात्र खोदा पहाड निकला चूहा अशी स्थिती आहे, असं सोमय्यांनी म्हटलं आहे.