Ajit Pawar : बहुमतांनी अस्तित्वात आणलेले हे सरकार आहे. जनतेनं निवडून दिलं असेल तर घराणेशाही कशी? लोकशाहीत घराणेशाही आणू नये, भ्रष्टाचारांचं समर्थन कुणीही करू नये. पंतप्रधान मोदींच्या घराणेशाहीच्या टीकेला विरोधी पक्षनेते अजित पवारांनी उत्तर दिलंय. स्वातंत्र्यदिनानिमित्त मुंबई-राष्ट्रवादी कार्यालयात ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी अजित पवार, सुप्रिया सुळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. त्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. 


...त्यामुळे मी फार खोलात जात नाही- अजित पवार
यावेळी अजित पवार म्हणाले, सर्वांना मी स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो. खुप काही साध्य करणायचा प्रयत्न केला आहे. अजून काही मिळवायचं आहे. जातींमध्ये सलोखा ठेवायचा आहे. आज आनंदाचा दिवस आहे. त्यामुळे मी फार खोलात जात नाही असे अजित पवार यावेळी म्हणाले.


लोकशाहीत घराणेशाही कुणीही आणु शकत नाही.- अजित पवार
अजित पवारांनी पंतप्रधानांच्या टीकेला उत्तर दिले आहे. ते म्हणाले, जनतेने निवडून दिलं असेल तर घराणेशाही कशी? लोकशाहीत घराणेशाही कुणीही आणु शकत नाही. यावेळी पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या कारकिर्दीचा आठवण करुन दिली. जर कुणाच काम चांगल असेल तर आजपर्यंत आपण पाहिलं लोकांनी त्यांना निवडून दिलं आहे. पंडित जवाहरलाल नेहरू यांची कारकिर्द पाहिली. त्यानंतर इंदिरा गांधी यांची कारकिर्द पाहिली, एक पोलादी स्त्री म्हणून त्या लोकप्रिय आहेत. त्यानंतरच्या काळामध्ये आपण राजीव गांधी याचीही कारकिर्द पाहिली.कॉम्प्युटरच युग हे खऱ्या अर्थांनी त्यांनी आणलं.


घराणेशाही, राजकारणाबाबत काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
पंतप्रधान मोदींनी राजकीय पक्षांवर जोरदार निशाणा साधला आहे. ते म्हणाले, गुणवत्तेवर अन्याय होत असल्याने घराणेशाहीचा तिरस्कार करणे आवश्यक आहे. पंतप्रधान मोदी यांनी म्हटले की, मी ज्यावेळी काका-पुतण्याशाही, घराणेशाहीबद्दल बोलतो तेव्हा लोकांना मी फक्त राजकीय क्षेत्राबद्दल बोलतोय असं वाटतं. दुर्देवाने राजकारणातील या घराणेशाहीची लागण देशातील इतर संस्थांमध्ये झाली असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले. राजकारणाच्या बाहेरील घराणेशाहीमुळे देशातील गुणवत्तेचे नुकसान झाले आहे.


कोणतेही खातं छोटे मोठं नसतं - चंद्रकांत पाटील


प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर एकनाथ शिंदे गट आणि भाजपकडून काल मंत्रिमंडळ विस्तारानंतर खातेवाटप जाहीर करण्यात आले. यावर चंद्रकांत पाटील म्हणाले, अतिशय उत्तम खात मिळालं आहे. कोणतेही खातं छोटे मोठं नसतं. तसेच एक नंबर आणि दोन नंबरही नसतं. संघटना काम पाहत असते, त्यानुसार जबाबदारी मिळत जाते. उद्या माझ्या विभागातील सेक्रेटरींची बैठक घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. आधीच्या सरकारने काय चुकीचं केलं, बरं केलं हे पाहणारा मी असल्याचे चंद्रकांत पाटील म्हणाले. बऱ्याला बरं म्हणणारा माणूस असल्याचेही त्यांनी नमूद केले.