Maharashtra Political Crisis : शिवसेनेचे बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांनी नव्याने शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप केला आहे. राजकीय आकसाने  मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी आमदारांचे संरक्षण काढून घेतले असल्याचा आरोप एकनाथ शिंदे यांनी केली आहे. एकनाथ शिंदे यांनी ट्वीट करून हा आरोप केला आहे. मागील अडीच वर्षात महाविकास आघाडीतील घटक पक्षांकडून अशाच प्रकारे खच्चीकरण करण्यात आल्याचा आरोप एकनाथ शिंदे यांनी केला आहे. 


एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात झालेल्या बंडात शिवसेनेचे जवळपास 38 आमदार सामिल झाले आहेत. सध्या हे आमदार सुरतमार्गे आसाममधील गुवाहाटीत दाखल झाले आहेत. या आमदारांचे वास्तव्य असलेल्या हॉटेलबाहेर आसाम पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आहे. शिवसेनेचे हे बंडखोर आमदार महाराष्ट्रातून बाहेर पडल्यानंतर त्यांची पोलीस सुरक्षा काढून घेतली असल्याचा आरोप केला जात आहे. 


 






राजकीय आकासापोटी ही सुरक्षा काढण्यात आली असल्याचा आरोप शिंदे यांनी केला. या आमदारांच्या कुटुंबीयांच्या संरक्षणाची जबाबदारी राज्य सरकारची असल्याचेही त्यांनी सांगितले. या आमदारांच्या कुटुंबीयांना धमकावण्याचा प्रयत्न होत आहे. या आमदारांच्या कुटुंबीयांना काही झाल्यास त्याची जबाबदारी ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत जबाबदार असतील असेही शिंदे यांनी म्हटले. आमदारांच्या कुटुंबीयांच्या सुरक्षेबाबत एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांच्यासह राज्यातील पोलीस आयुक्तांना हे पत्र लिहिले आहे.  


दरम्यान, राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. गृहमंत्रालयाने कोणत्याही आमदाराचे संरक्षण काढण्याचे आदेश दिले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. 


इतर महत्त्वाच्या बातम्या: