Maharashtra Political Crisis Sanjay Raut :  शिवसेना खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यासह बंडखोर आमदारांना चर्चा करण्याचं आमंत्रण दिलेय. का उगाच वण वण भटकताय? घरचे दरवाजे उघडे आहेत.. अशी साद घालत संजय राऊत यांनी बंडखोरांना चर्चेचं आमंत्रण दिलेय. विधान परिषद निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारला. त्यांच्यासोबत 40 पेक्षा जास्त आमदार असल्याचं समजतेय. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर महाविकास आघाडीचं सरकार धोक्यात आलेय. 


 शिवसेनेने महाविकास आघाडीतून बाहेर पडावे अशी आमदारांची इच्छा असेल तर आमदारांनी 24 तासांत मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोर उपस्थित राहून चर्चा करावी असे आवाहन शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा संजय राऊत यांनी बंडखोरांना परत येण्याचं आवाहन केलेय. संजय राऊत यांनी ट्विट करत बंडखोरांना परत येण्याचं आवाहन केले. 


चर्चेतून मार्ग निघू शकतो. चर्चा होऊ शकते. घरचे दरवाजे उघडे आहेत..का उगाच वण वण भटकताय? गुलामी पत्करण्यापेक्षा स्वाभिमानाने निर्णय घेऊ! जय महाराष्ट्र! असं ट्विट संजय राऊत यांनी बंडखोर आमदारांसाठी केलेय. संजय राऊत यांच्या ट्विटला एकनाथ शिंदे अथवा इतर कुणी बंडखोर आमदार प्रत्युत्तर देणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.   






शिवसेना महाविकास आघाडीतून बाहेर पडायला तयार, पण... - संजय राऊत
'वर्षा' निवासस्थानात आज शिवसेना नेते आणि आमदारांची बैठक आयोजित केली होती. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी शिवसेनेचे आमदार कैलाश पाटील आणि नितीन देशमुख यांनी एकनाथ शिंदे यांनी सूरतमधून कशी सुटका केली, याबाबत अनुभव मांडले. त्यांच्या वक्तव्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटले की, बाहेर असलेल्या शिवसेना आमदारांना जर आपण महाविकास आघाडीतून बाहेर पडावे आणि वेगळा विचार करावा असे वाटत असेल तर तोदेखील विचार करू. मात्र, तुम्ही आधी 24 तासात मुंबईत येण्याची हिंमत दाखवावी. मुंबईत आल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत प्रत्यक्ष चर्चा करावी असे आवाहन राऊत यांनी यावेळी केले. 


शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटले की, पत्रकारांना व इतरांना व्हॉट्सअॅपवर हॉटेलमधील फोटो, व्हिडिओ पाठवण्यापेक्षा प्रत्यक्षात येऊन चर्चा करावी. आमचा गुवाहाटीमधील 21 आमदारांसोबत संपर्क झाला असल्याची माहिती यावेळी राऊत यांनी दिली. राऊत यांनी म्हटले की, राज्याबाहेर गेलेले शिवसेनेचे 20-25 आमदार पुन्हा शिवसेनेत येतील असा विश्वास आहे. महाविकास आघाडीतून बाहेर पडावं अशी इच्छा असेल तर तुम्ही प्रत्यक्षात भेटून चर्चा करावी. मात्र, त्यांचा हा बहाणा असल्याचे राऊत यांनी म्हटले. सरकारमधून बाहेर पडावे असं त्यांना वाटत असते तर त्यांनी प्रत्यक्षात चर्चा केली असती, असेही राऊत यांनी म्हटले.


इतर महत्त्वाच्या बातम्या: