Palkhi Marga : बारामती, (baramati) इंदापूर आणि दौंड तालुक्यात (Palkhi Marga) विकासाच्या विविध प्रकल्पांनी वेग पकडल्यानंतर भूसंपादनाचीही कामे वेगाने झाली. दौंड, बारामती आणि इंदापूर तालुक्यात संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाचे काम सुरू आहे. या पालखी महामार्गाच्य भूसंपादनापोटी बारामती, इंदापूर व दौंड या तीन तालुक्यात मिळून आतापर्यंत 1093 कोटी 29 लाख रुपयांचे वाटप शासनाकडून लाभार्थ्यांना झालेले आहे. दौंड तालुक्यातील पाटस ते बारामती या संत तुकाराम महाराज पालखी मार्गाच्या भूसंपादनापोटी आतापर्यंत 424 कोटी रुपये वितरीत करण्यात आले आहे. 


तर बारामती तालुक्यातील कण्हेरी ते इंदापूर या टप्प्यासाठी 314 कोटी रुपये तर इंदापूर तालुक्यातील वडापुरी ते सराटी या मार्गासाठी 168 कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. या तिन्ही टप्प्यांसाठी 1236 कोटी रुपये भूसंपादनासाठी मिळणार असून त्या पैकी 907 कोटी रुपयांचे वाटप प्रत्यक्षात झालेले आहे. बारामती ते फलटण रेल्वे मार्गाच्या भूसंपादनापोटी आतापर्यंत 186 कोटी रुपयांचे वाटप झालेले असून अजून 50 कोटी रुपये महसूल विभागाकडे शिल्लक आहेत. 


रेल्वे भूसंपादन प्रक्रिया आगामी सहा महिन्यात पूर्ण करण्याच्या दृष्टीने प्रयत्न असून त्या दृष्टीने आता सक्तीने भूसंपादनाची प्रक्रिया सुरु झाली आहे. 186 हेक्टरपैकी 134 हेक्टरचे भूसंपादन पूर्ण झालेले आहे. बारामती पंचक्रोशीत भूसंपादनापोटी आलेल्या रकमेतून अनेकांनी शेत जमीन, शहरालगत अकृषक जमीन खरेदी, सदनिका, व्यापारी गाळे, सोने खरेदीसह वाहन खरेदी मोठया प्रमाणावर केली आहे. अनेक शेतकऱ्यांना पैसे मिळाल्याने जमिनीच्या किंमती काही प्रमाणात वाढल्या आहेत. परिणामी बाजारपेठेत गर्दी पाहायला मिळाली.


संत तुकाराम महाराज राष्ट्रीय पालखी मार्गाचं काम सध्या सुरु आहे. यामध्ये प्रामुख्याने दौंड, इंदापूर, बारामती भागाचं मोठ्या प्रमाणात भूसंपादन झालं आहे. या मार्गामुळे शेतकऱ्यांना भूसंपादनाच्या बदल्यात चांगले पैसे मिळाले आहेत. तसेच बारामती, फलटण असा रेल्वेदेखील जोडण्यात येत आहे. या मार्गासाठीचं भूसंपादनदेखील लवकर केलं जाणार आहे. यातदेखील शेतकऱ्यांना चांगला मोबदला मिळणार आहे. मागील काही दिवसांपासून कोरोनानंतर बाजारात मंदी होती मात्र भूसंपादनाचा मोबदला मिळाल्याने शेतकऱ्यांना फार फटका बसला नाही आहे. 1093 कोटी 29 लाख रुपयांचे वाटप शासनाकडून लाभार्थ्यांना झालेले आहे. त्यामुळे शेतकरी सधन झाले आहे. त्यांनी विविध ठिकाणी प्लॉटिंगदेखील केलं आहे. त्यामुळे जमिनील चांगली किंमत आल्याचं बोललं जात आहे. मात्र बायपास रस्ता जाणाऱ्या मार्गावरील भूसंपदानाचा शेतकऱ्यांना कमी मोबदला मिळाला आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर दिसत आहे. त्यांनाही इतर शेतकऱ्यांप्रमाणे मोबदला मिळावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.