Chhatrapati Sambhaji Nagar News : औरंगाबाद (Aurangabad) शहराचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) करण्याच्या निर्णयाला राज्य आणि केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. या निर्णयानंतर शहरातील अनेक ठिकाणी औरंगाबाद नाव बदलून छत्रपती संभाजीनगर असे लिहिण्यात येत आहे. तर शहरातील शासकीय कार्यालयावरील फलकाचे नावं देखील बदलली जात आहे. मात्र महानगरपालिकेवरील नाव औरंगाबाद असल्याने मोठ्या प्रमाणात टीका होत होती. दरम्यान आता महापालिका प्रशासनाने देखील औरंगाबाद नाव असलेलं फलक काढले आहे. मात्र असे असतानाच महानगरपालिकेच्या इमारतीवर असलेल्या फलकावर 'छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका छत्रपती संभाजीनगर' असे नाव असलेला एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र प्रत्यक्षात हा फोटो फेक असून. अजूनही नवीन नावाचे बोर्ड लावण्यात आला नाही. 


औरंगाबाद शहराचे नाव छत्रपती संभाजीनगर करण्याचा निर्णय झाल्यानंतर महापालिकेने यासंदर्भात ठराव घेतला आहे. दरम्यान शहरातील वॉर्ड कार्यालये, उद्यान व इतर ठिकाणाचे फलक बदलण्याचे आदेश प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांनी महापालिका प्रशासनाला दिले आहेत. त्यामुळे महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारासह इतर इमारतीच्या नामफलकावरील औरंगाबाद हे नाव हटवण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत होती. त्यानुसार महापालिककेच्या कार्यालयातील प्रवेशद्वार, मुख्य प्रशासकीय इमारत आणि टप्पा तीन इमारतीच्या नामफलकावरील औरंगाबाद हे नाव काढून टाकण्यात आले. मात्र मुख्य प्रशासकीय इमारतीच्या प्रवेशव्दारावर 'छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका छत्रपती संभाजीनगर' असा नव्याने उल्लेख असलेला फलक लावण्यात आल्याचे फोटो समाज माध्यमांवर व्हायरल झाले. पण अद्याप महापालिकेने नवा फलक लावलेला नाही. त्यामुळे व्हायरल होत असलेले फोटो फेक असल्याचे समोर आले आहेत. 


भाजपकडून 5 लाख स्टिकरची मोहीम!


औरंगाबाद शहराचे नाव छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबाद जिल्ह्याचे नाव धाराशिव करण्यात आला आहे. या नामांतराच्या निर्णयाचा कुठं समर्थन तर कुठं विरोध होताना पाहायला मिळत. यासाठी अनेक राजकीय पक्ष आणि संघटना रस्त्यावर उतरल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान भाजपकडून शहरातील 5 लाख गाड्यांवर औरंगाबाद समर्थनार्थचे स्टिकर लावण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. शुक्रवारी क्रांती चौकातून या मोहीमेची सुरवात करण्यात आली आहे. तसेच जिल्हाभरात ही मोहीम राबवली जाणार असल्याची माहिती भाजप शहराध्यक्ष शिरीष बोराळकर यांनी दिली आहे. 


27 मार्चला अंतिम सुनावणी!


छत्रपती संभाजीनगर नामांतराला विरोध करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. दरम्यान  याबाबतची अंतिम सुनावणी 27 मार्चला होणार आहे. विशेष म्हणजे सर्वोच्च न्यायालयात देखील याबाबत याचिका दाखल करण्यात आली होती. परंतु शुक्रवारी न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली आहे. मुंबई उच्च न्यायालयात 27 मार्चला अंतिम सुनावणी असल्यामुळे, ही याचिका दाखल करून घेण्यास नकार देण्यात येत असल्याचं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या : 


Coronavirus: चिंता वाढली! छ. संभाजीनगरमध्ये कोरोनाची लागण झालेल्या 65 वर्षीय महिलेचा मृत्यू