Nashik Crime : नाशिक (Nashik) शहरात दिवसेंदिवस तरुणाच्या आत्महत्यांचे (Suicide) प्रमाण वाढत आहेत. अशातच नाशिक शहरातील महाविद्यालयाच्या हॉस्टेलमध्ये (Hostel Suicide) एका विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याने महाविद्यालयासह वसतिगृह परिसरात खळबळ उडाली आहे. त्यामुळे अल्पवयीन तरुणांच्या आत्महत्यांच्या घटनांमुळे नागरिकांसह पालकवर्गात भीतीचे सावट पसरले आहे. 


गौरव रमेश बोरसे (Gaurav Borse) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून तो नाशिक जिल्ह्यातीलच सटाणा (Satana) परिसरात असलेल्या डांगसौंदाने येथील रहिवासी आहे. गौरव हा नाशिकच्या गंगापूर रोड (Gangapur Road) परिसरामध्ये असलेल्या एका नामांकित महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत होता. शिवाय महाविद्यालयाच्याच हॉस्टेलमध्ये राहत होता. मात्र टी वाय बी कॉममध्ये शिकणाऱ्या गौरवने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार आज सकाळच्या सुमारास उघडकीस आला आहे. वाणिज्य शाखेच्या तिसऱ्या वर्षाला असणाऱ्या गौरवने अचानक जीवन संपविल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. शिवाय गौरव आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले? असा प्रश्न आता महाविद्यालय प्रशासनासह विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना पडला आहे. गौरवने आत्महत्या का केली त्यामागील कारण अद्याप अस्पष्ट आहे. 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गौरव बोरसे हा वाणिज्य शाखेत शिक्षण घेत होता. त्यामुळे येथीलच वसतिगृहामध्ये त्याने प्रवेश घेतला होता. महाविद्यालयाच्या तासिका संपल्यानंतर फावल्या वेळेत तो आपल्या मामाकडे काम करायचा. मात्र आज सकाळच्या सुमारास अघटित घडलं. गौरवच्या राहत असलेल्या वसतिगृहातील शेजारील रूममध्ये राहणारा एक मुलगा इस्त्री मागण्यासाठी गौरवकडे गेला. मात्र त्याला समोरील चित्र पाहिल्यानंतर पायाखालची वाळू सरकली. त्याला विश्वासच बसेना. वसतिगृहात ही बाब पसरल्यानंतर तातडीने पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मृतदेहाचा पंचनामा केला. या प्रकरणाचा अधिक तपास सरकारवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस करत आहे. गौरव बोरसेने टोकाचे पाऊल उचलून जीवन यात्रा संपविल्याने बोरसे कुटुंबीयावर दु: खाचा डोंगर कोसळला असून महाविद्यालय आणि हॉस्टेलमधील विद्यार्थ्यांकडून देखील हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. 


महाविद्यालय प्रशासनाने लक्ष देणे आवश्यक 
गौरवच्या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून कुटुंबियांना माहिती मिळताच त्यांनी नाशिक गाठले. यावेळी घटनास्थळावर कुटुंबीयांनी हंबरडा फोडला. दरम्यान नाशिक शहर हे एज्युकेशन हब म्हणूनही ओळखले जाते. अलीकडच्या वर्षांत मोठं मोठ्या शिक्षण संस्था नाशिक शहरात अस्तित्वात आहेत. त्यामुळे राजभरातील विद्यार्थी शहरात शिक्षण घेत आहेत. अशातच गेल्या काही वर्षात नाशिक शहरात विदयार्थ्यांच्या आत्महत्यांचे घटना उघडकीस आल्या आहेत. त्यामुळे महाविद्यालय प्रशासन किंवा वसतिगृह प्रशासनाने याकडे गांभीर्याने बघणे आवश्यक आहे.