Nashik : एकीकडे देशाच्या कानाकोपऱ्यात स्वातंत्र्यांचा अमृत महोत्सव (Swatantrya Amrit Mahotsav) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला, त्याचबरोबर अजूनही अनेक ठिकाणी साजरा होत असताना मात्र आजही रस्त्यांच्या कडेला, महामार्गावर 'ना घर ना दार, इथं फुललाय संसार' म्हणत अनेक कुटुंबे आजही संघर्षमय जीवन जगताना दिसत आहेत. असच नाशिकच्या (Nashik) महामार्ग परिसरात (Nashik highway) गेल्या क्रित्येक वर्षांपासून मोडका तोडका संसार मांडलेल्या अवस्थेत संघर्षांत वास्तव्य करीत असल्याचे चित्र आहे. 


नाशिक शहर स्मार्ट सिटी (Nashik Smart City) म्हणून ओळखले जाते. शहरात स्मार्ट रस्त्यांसह अनेक भागात स्मार्ट कामे केली जात आहेत. अलीकडेच नाशिकमध्ये मोठ्या उत्साहात स्वातंत्र्यांचा अमृत महोत्सव साजरा करण्यात आला. मात्र आजही महामार्गावरील झोपड्या, नदी काठावरील झोपड्यांचे आयुष्य जगणारे अनेक जण पाहायला मिळत आहेत. यामध्ये छोटे मोठे व्यावसायिक, मजूर, भिक्षेकऱ्यांनी झोपड्या थाटल्या आहेत. ऊन वर पाऊस कशाचीही तमा न बाळगता हि लोक इथंच वास्तव्य करतात. महामार्गावरून जाणाऱ्या चारचाकीने अनेकदा यांचे संसार उद्धवस्त केल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे संबंधित नागरिकांना स्थानिक प्रशासनाने पुनर्वसनासाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे.


नाशिक शहरातील मुंबईनाका (Mumbai Naka) ते द्वारका परिसरात उड्डाणपूलाखाली हे नागरिक तोडगा मोडका संसार घेऊन बसलेले असतात. काही लोक फुल, गाडीला लागणार साहित्य, कधी गजरे तर कधी पेन विकत असल्याचे दिसते. बहुतांश वेळा आमच्या वाट्याला तर संघर्षच नाहीच, अशा अविर्भावात असणारील लहान मुलेही वस्तू विकण्यासाठी रस्त्याच्या कडेला उभी असतात.  या लोकांनी आपला संसारच रस्त्याच्या कडेला थाटला असून शहरातील मध्यवर्ती भागात अतिशय विदारक दृश्य बघावयास मिळत आहे. खऱ्या अर्थाने नाशिक शहराच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या महामार्गावर उड्डाणपुलाची निर्मिती करण्यात आलेली आहे. तसेच शहराचे अधिक सौंदर्य अधिक वाढावे, यासाठी उड्डाणपुलाच्या खालच्या बाजूला फुलझाडे लावण्यात आलेली आहे. मात्र मुंबई नाका ते द्वारका परिसरात उड्डाणपुलाच्या खालच्या बाजूस सदर लोकांनी संसार थाटल्याने विद्रूपीकरण वाढल्याची ओरडही शहर वासियांकडून केली जात आहे. 


दादा गाडी हळू चालवा हो.... 
दरम्यान नाशिकचा हा महामार्ग 24 तास वाहनांच्या वर्दळीने भरलेला असतो. अनेकदा महामार्गावर अपघाताच्या घटनाही समोर आल्या आहेत. त्यामुळे संसार थाटलेली हि मंडळी नेहमीच या वाहनधारकांना दबकूनच असते. कधी एखादी गाडी अंगावर येऊन संसार उध्वस्त करेल सांगता येत नाही, त्यामुळे दादा गाडी हळू चालवा हो, इथं आमचाही संसार फुललाय, अशी साद तर घालत नसावेत ना? असाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो आहे. 


पुनर्वसन होणं महत्वाचे... 
छगन भुजबळ यांनी नाशिकचे मनपा आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार, पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे व राष्ट्रीय महामार्ग प्रशासन अधिकारी यांना याबाबत माहिती दिली आहे. या विदारक दृष्याबाबत नाराजी व्यक्त करत प्रशासनाकडून होत असलेल्या दुर्लक्षाबाबत अधिकाऱ्यांची कानउघडणी केली. तसेच तातडीने अनधिकृत व्यावसायिक असतील त्यांना हटविण्याच्या तसेच इतर बेघर नागरिक असतील त्यांच्या पुनर्वसनाच्या बाबतीत उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या आहेत. शहरात मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात, मात्र अशा पद्धतीने शहरात विदारक दृश्य डोळ्यात अंजन घालणारे आहे, प्रशासन याकडे दुर्लक्ष कसे करू शकते असा सवाल त्यांनी अधिकाऱ्यांना करत तातडीने याठिकाणी साफसफाई करून नागरिकांचे पुनर्वसन करण्यासंदर्भात सूचना केल्या आहेत.