Nashik News : घरातील लहान मुलांकडे लक्ष न दिल्यास कधी अनुचित घटना घडेल हे सांगता येत नाही. त्यामुळे लहान मुलांच्या (Child Care) जीवाला धोका निर्माण होईल अशा ठिकाणी काळजी घेणारे कोणीतरी असणे आवश्यक असते. अन्यथा एखादी लहान चूक कुटुंबाला महागात पडू शकते. अशीच एक घटना नाशिक (Nashik) जिल्ह्यातील सटाणा शहरानजीक असलेल्या लखमापूर गावात घडली आहे. 


सटाणा शहराजवळील लखमापूर (Lakhamapur) येथील सहा वर्षे वयाची चिमुरडी उकळत्या तेलाच्या कढईत पडल्याने मृत्युमुखी पडली आहे. ही घटना फेब्रुवारी महिन्यात 22 तारखेला घडली असून उपचार सुरु असताना या चिमुरडीचे निधन (Death) झाले आहे. नाशिक जिल्ह्यातील सटाणा पोलीस स्टेशनच्या (Satana Police Station) हद्दीत ही घटना घडली आहे. 


सटाणा शहराजवळील लखमापूर हे चिमुरडी कुटुंबासमवेत राहत होती. 22 फेब्रुवारी रोजी सायंकाळी घरी स्वयंपाक करण्याचे काम सुरु होते. याचवेळी मोठ्या कढईत शेव काढण्याचे कामही सुरू होते. याचवेळी ही चिमुरडी कढईत पडल्याने गंभीर जखमी झाली. तिला तातडीने लखमापूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. 


लखमापूर रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर तिला नाशिक शहरातील मुंबई नाका परिसरात असलेल्या खासगी रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले. या रुग्णालयात काही दिवस उपचार केल्यानंतर तिला मेडिकल कॉलेज आडगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरु असताना 13 मार्च रोजी तिचे निधन झाले. तब्बल वीस दिवसांची झुंज अयशस्वी ठरली. याबाबत सटाणा पोलिसांत शनिवारी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अवघ्या सहा वर्षाच्या चिमुरडीचा असा करुण अंत झाल्याने कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे. 


दुसरी घटना ही दिंडोरी (Dindori) पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून याबाबत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. रवळगाव येथील रहिवासी असलेले हिरामण सावळीराम भोये हे यात्रेनिमित्त रासेगाव येथे गेले होते. 13 मार्च रोजी  पहाटे तीन वाजेच्या सुमारास रासेगाव यात्रेत असताना मंदिराचे बाहेरील पेटता दिवा भोये यांच्या अंगावर पडला. यात शरीरास गंभीर जखम झाल्याने मुलगा बळवंत हिरामण भोये याने त्यांना उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटल नाशिक दाखल केले होते. त्यांच्यावर उपचार सुरु असताना 17 मार्च रोजी डॉ. कल्पेश भोये यांनी तपासून मयत घोषित केले. 


लहान मुलांबाबत वेळोवेळी घटना घडत असताना... 


आपल्या प्रत्येकाच्या घरात लहान मुलं असत. त्यामुळे त्याला सांभाळणं खूपच महत्वाचं असते. कारण लहान वयात मुले कुठेही फिरत असतात किंवा कशाचीही तमा न बाळगता ते वस्तू उचलतात, हात लावतात. मात्र अशावेळी थोडे दुर्लक्ष झाल्यास अनुचित घटना होण्याचा धोका असतो. यापूर्वी देखील अशा घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे खेळत्या वयात मुलांना धोका, सुरक्षा या गोष्टी समजून येत नाहीत. मात्र यासाठी पालकांनी सजग असणे महत्वाचे आहे. अनेकदा पालक कामात व्यस्त असता मुलं चालत चालत किंवा खेळत खेळत घराबाहेर पडत असतात. अशावेळी रस्त्यावर जाण, कुठेतरी पडणं अशा गोष्टी होणे स्वाभाविक आहे. त्यामुळे पालकांनी लहान मुलांची काळजी घेणं महत्वाचे आहे.