Nashik Sanjay Raut : त्र्यंबकेश्वरमध्ये (Trimbakeshwer) काहीही चुकीचं घडलेलं नाही. उरुसचं धूप देवांना दाखविण्याची प्रथा आहे. त्यांनी मंदिराच्या गेटवर जाऊन देवांना धूप दाखविले. सदर घटनेची माहिती घेतली असून कुणीही मंदिरात बळजबरीने घुसण्याचा प्रयत्न केला नसल्याचे मत खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले. त्याचबरोबर महाराष्ट्रात हिंदुत्वाच्या नावाने टोळ्या निर्माण करायच्या आणि वातावरण दूषित करायचे असा कट मला दिसतो असल्याचे सूचक वक्तव्य यावेळी संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केले. 


खासदार संजय राऊत हे नाशिक (Nashik) दौऱ्यावर होते. आज सकाळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधत त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwer Mandir) येथील घटनेवर प्रतिक्रिया दिली. संजय राऊत यावेळी म्हणाले की, महाराष्ट्रातला सामाजिक सलोखा बिघडविण्याचा हा प्रयत्न आहे. नकली हिंदुत्वाच्या नावावर काही टोळ्या निर्माण करुन वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न असून मला काही कट दिसत असल्याचे राऊत म्हणाले. ते पुढे म्हणाले की, आमचं हिंदुत्व कडवट असून नकली हिंदुत्व नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील मंदिरं ही आमची श्रद्धास्थानं असून आमच्यासाठी त्र्यंबकेश्वर हे सुद्धा श्रद्धास्थान आहे. त्यामुळे घटनेची माहिती घेतली असता तिथं कुणी घुसलं नसल्याचे ते म्हणाले. 


संजय राऊत यावेळी म्हणाले की, मुस्लिम लोक संदलच्या दरम्यान तिथं पायरीवर धूप दाखवतात, आरती करतात. ही गेल्या अनेक वर्षांची परंपरा असून ती पूर्वापार चालत आलेली आहे. मुस्लिम दर्ग्यावर हिंदू लोकही जातात, हाजी अली, अजमेर अशा ठिकाणी हिंदू लोक जातात. रामनवमीला कधी दंगल झाली नव्हती, मग आता का? असा सवाल करत सरकारच्या पायाखालची जमीन हादरली असल्यानं हे होत असल्याची टीका राऊत यांनी केली. महाराष्ट्रात सामाजिक सलोखा राखला पाहिजे, पण सत्ताधारी सामाजिक सलोखा बिघडवत असल्याचे ते म्हणाले. 


बजरंगबलीची गदा मोदींनी फिरवली, पण.... 


दरम्यान राऊत पुढे म्हणाले की, बजरंगबलीची गदा मोदींनी फिरवली, पण ती त्यांच्याच डोक्यात पडली. हिंदुत्व आमचा व्यवसाय नाही, राजकीय भांडवल नाही, श्रद्धा आहे. देशद्रोही कोण हे स्पष्ट दिसतंय, आरएसएसचा प्रचारक प्रमुख पाकिस्तानच्या हनी ट्रॅपमध्ये अडकला. कुरुलकर प्रकरण हे सर्व भाजपच्या संबंधीत आहे, तिथं एसआयटीची स्थापना करा आणि चौकशी करा. इथं काय एसआयटी स्थापना करताय, असा सवाल संजय राऊत यांनी गृहमंत्री फडणवीस यांना उद्देशून उपस्थित केला. त्याच्यावरील दुर्लक्ष करण्यासाठी त्र्यंबकेश्वर आणि शेवगाव सारख्या दंगली घडविल्या जात आहेत. मुस्लिमांवर अत्याचार करणे ही आमची परंपरा नसल्याचे ते म्हणाले.