Chhagan Bhujbal : महाराष्ट्र कमकुवत करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र महाराष्ट्र कमकुवत होणार नाही. दिल्लीला (Delhi) देखील आधार देण्याचं काम महाराष्ट्र करतो, हे कुणीही विसरू नये अशी टीका करत महाराष्ट्र कधी झुकला नाही झुकणारही नाही. दिवस येतात आणि दिवस जातात जरा धीर धरा आपले दिवस परत येतील असा सबुरीचा सल्ला राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ (Chhagn Bhujbal) यांनी शेतकरी मेळाव्या प्रसंगी उपस्थितांना दिला.


नाशिक (Nashik) जिल्ह्यातील निफाड (Niphad) तालुक्यातील काकासाहेब नगर, रानवड येथे स्व.अशोकराव बनकर नागरी सहकारी पतसंस्था पिंपळगाव बसवंत, संचलित ‘कर्मवीर काकासाहेब वाघ सहकारी साखर कारखान्याचा 40 वा गळीत हंगाम शुभारंभ छगन भुजबळ यांच्या हस्ते पार पडला. यावेळी आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी छगन भुजबळ म्हणाले की, देशात आणि राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकरी अडचणीत आलेला असून त्यांना दिलासा देण्याची केंद्र राज्य सरकारची जबाबदारी आहे. त्यामुळे केंद्र व राज्य सरकारने शेतकऱ्यांना भरीव मदत द्यावी अशी मागणी त्यांनी केली. तसेच जिल्हाधिकाऱ्यांना नको ते प्रश्न विचारण्यापेक्षा कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांना काय अडचणी आहे. याची विचारपूस करण्याची गरज आहे अशी टीका त्यांनी केली. तसेच पक्षभेद असले तरी शेतकरी हितासाठी सर्वांनी एकत्रित येण्याची गरज आहे. निवडणूका आल्यावर आपआपले झेंडे काढू मात्र विकासाच्या कामासाठी एक होऊन काम करूया असे आवाहन त्यांनी केले. 


ते म्हणाले की, निफाड मधील कारखाने सुरू करण्यासाठी आमदार दिलीप बनकर यांचे सातत्याने प्रयत्न करत असून शरद पवार साहेब व अजित पवार यांच्या पाठपुराव्यामुळे रानवड कारखाना सुरू झाला. या कारखान्याचे खऱ्या अर्थाने चीज बनकर यांनी केले आहे. तसेच आता निफाड साखर कारखाना सुरू करण्यासाठी दिलीप बनकर प्रयत्न करत आहे. त्यासाठी त्यांना सर्वांनी पाठिंबा देण्याची आवश्यकता आहे. शेतकरी हितासाठी कारखाने सुरू होणे आवश्यक असून शेतकऱ्यांनी संयमाची भूमिका ठेवावी असे त्यांनी सांगितले. तसेच नाशिकमधूनच सगळं पाणी पुढे मराठवाड्याकडे जात तरी देखील नाशिकचे कारखाने बंद पडले. आणि मराठवाडा परिसरातील कारखाने मात्र सुरू राहिले अशी खंत त्यांनी व्यक्त केली.


ते म्हणाले की, एअरबस प्रकल्पाचे काम जेव्हा टाटा यांना मिळाले त्यावेळी सर्वात प्रथम टाटा यांना पत्र लिहून नाशिकच्या एचएएल मध्ये सर्व सुविधा उपलब्ध करून देऊ हा प्रकल्प नाशिकला द्या अशी विनंती केली होती. मात्र हा प्रकल्प आता महाराष्ट्राबाहेर गेला आहे. त्याबद्दल अतिशय दु:ख असून महाराष्ट्रातील नागरिकांसाठी ही अतिशय चिंतेची बाब आहे. निफाड सहकारी साखर कारखान्याच्या जागेवर ‘ड्रायपोर्ट’ करणार असे गेल्या काही वर्षांपासून केवळ आपण ऐकत आलो आहे. ते ही आता गुजरातला गेले तर आश्चर्य वाटायला नको असा टोला त्यांनी यावेळी लगावला.


रेल्वे मंत्रालय झोपले होते का ?
नाशिक-पुणे सेमी हाय स्पीड रेल्वे प्रकल्प रद्द होण्याच्या टप्प्यावर आहे.  या रेल्वे मार्गासाठी राज्य सरकारने 20 टक्के वाटा उचलण्याला मंजुरी दिली होती. राज्य सरकार आणि रेल्वे मंत्रालय यांच्या भागीदारीतून महारेल या स्वतंत्र कंपनीची निर्मिती करण्यात आली. हे सर्व सोपस्कार पार पडल्यानंतर गेल्या 06 महिन्यांपासून हा प्रकल्प रेल्वे मंत्रालयाच्या अंतिम मंजुरीच्या प्रतीक्षेत होता. आता रेल्वे मंत्रालयाला अचानक हा प्रकल्प योग्य नसल्याचा साक्षात्कार झाला. त्यांना वेगवेगळ्या मंजुऱ्यांसाठी 05 वर्षांचा कालावधी गेला. एवढे दिवस रेल्वे मंत्रालय झोपले होते का? असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला.