Nashik News : नाशिक (Nashik) जिल्ह्यावर शोककळा पसरली असून जिल्ह्यातून पहिल्यांदाच सीमा सुरक्षा दलात (SSB) रुजू झालेल्या महिला जवानाचे निधन झाल्याची घटना घडली आहे. निफाड तालुक्यातील (Niphad) देवगाव येथील गायत्री विठ्ठल जाधव या सीमा सुरक्षा दलात जवान म्हणून कार्यरत होत्या. ट्रेनिंगच्या दरम्यान खड्ड्यात पडून अपघात झाला होता. 


विशेष म्हणजे नाशिक जिल्ह्यातून सीमा सुरक्षा दलात भरती होणारी पहिली महिला जवान गायत्री जाधव (Gayatri Jadhav) होती. अत्यंत हलाखीची परिस्थितीत गायत्रीने रोजंदारी करत देवगाव येथील डी आर भोसले महाविद्यालय शिक्षण घेतल्यानंतर लासलगाव नूतन महाविद्यालयात उच्च माध्यमिक शिक्षण घेतले. त्यानंतर लासलगाव येथीलच एका खाजगी अकॅडमी ट्रेनिंग घेतले. त्यानंतर 2021 मधील स्टाफ सिलेक्शनच्या सीमा सुरक्षा बलाच्या परीक्षेत ती पास झाली. त्यानंतर राजस्थान येथील अलवर येथे ट्रेनिंगसाठी तिची निवडही झाली. राजस्थानमध्ये ट्रेनिंग पूर्णत्वास जात असताना खड्ड्यात पडून तिचा अपघात झाला. यावेळी तिच्या मेंदूवर शस्त्रक्रिया करण्यात आली. 


दरम्यान शस्त्रक्रियेनंतर गायत्री पुन्हा ट्रेनिंगला रुजू झाली. मात्र पुन्हा त्रास जाणवू लागल्याने जयपूर येथील एसएम हॉस्पिटलमध्ये पुन्हा मेंदूवर शस्त्रक्रिया करण्यात आली आणि ती पुन्हा ट्रेनिंगला रुजू झाली. ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर बिहार राज्यातील अरिहार जिल्ह्यातील एसएसबी बथनाहा येथील नेपाळ सीमेवर नियुक्ती झाली. मात्र काहीही दिवसानंतर तिला पुन्हा त्रास जाणवू लागल्याने ती सुट्टी घेऊन घरी आली. त्यानंतर नाशिक येथील दोन खाजगी दवाखान्यात उपचार केल्यानंतर जून महिन्यात मुंबई येथील लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. या हॉस्पिटलमध्ये तीन महिने उपचार घेतल्यानंतर तिला पुन्हा त्रास जाणवू लागल्याने अधिक उपचारासाठी एम्स दिल्ली येथे संदर्भ देण्यात आला. मात्र तिथे जाण्यापूर्वी तिची तब्येत खालावली. व त्यातच तिचा मृत्यू झाला. 


नाशिक जिल्ह्यातून पहिली महिला
नाशिक जिल्ह्यातून सैन्यात जाणाऱ्या पहिल्या दोन मुलींमध्ये व निफाड तालुक्यात सैन्यात जाणारी पहिली महिला होती. गायत्रीच्या घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असताना तिने यश संपादन केले. मात्र ट्रेनिंगच्या दरम्यान झालेल्या अपघातामुळे तिच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला. एकीकडे ट्रेनिंग सुरु असताना अपघात झाला. अपघातानंतर शस्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर ती रुजू झाली. मात्र काही दिवसांनंतर पुन्हा त्रास जाणवू लागल्याने ती पुन्हा हॉस्पिटलमध्ये दाखल झाली. यात कुटुंबियांना मोठा त्रास सहन करावा लागला. अखेर गेल्या अनेक महिन्यांपासून झुंज देत असलेल्या गायत्रीने प्राण सोडला. तिच्या निधनाने कुटुंबियांसह गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.