नागपूर : नागपुरातील रेशीमबाग परिसरात असलेल्या डॉ. हेडगेवार स्मृती भवनाची रेकी करणाऱ्या दहशतवाद्याचा ताबा अखेरीस महाराष्ट्र एटीएसला मिळाला आहे.  जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा सदस्य असलेल्या रईस अहमद यानं गेल्या वर्षी जुलै महिन्यात नागपुरात येऊन रेकी केली होती. जम्मू काश्मीरमध्ये तपास यंत्रणांनी रईस अहमदला पकडलं आणि त्यानंतरच्या चौकशीत त्यांनं ही रेकी केल्याचं कबूल केलं होतं. या प्रकरणात पुढील तपासासाठी रईस अहमदला महाराष्ट्र एटीएसच्या ताब्यात देण्यात आलंय. पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आलेला रईस अहमद शेख कोण आहे? हे जाणून घेऊया. 


कोण आहे रईस अहमद शेख?



  •  रईस अहमद शेख 26 वर्षांचा असून तो जम्मू काश्मीर मधील पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपुरा मधील खाटी मोहल्लामध्ये राहणारा आहे.

  • अत्यंत गरीब कुटुंबातला रईस अहमद त्याच्या एका मित्राच्या माध्यमातून तो जैश ए मोहम्मदच्या संपर्कात आला.

  •  पैशाची चणचण दूर करण्यासाठी तो जैश ए मोहम्मदच्या संपर्कात आल्याचे त्याने तपास यंत्रणांना सांगितल्याची माहिती आहे. नंतर जैश ए मोहम्मदचा पाकिस्तानमधील हँडलर ओमरने त्याला पाकव्याप्त काश्मीरमध्ये बोलावून घेतले.

  • एप्रिल 2021 मध्ये रईस पाक व्याप्त काश्मीरमध्ये जाऊन आल्याची माहिती आहे.

  • रईस अहमद फार शिकलेला नाही. मात्र तो इलेक्ट्रिक कामांमध्ये निष्णांत आहे.

  • पाकव्याप्त काश्मीरमधून परत आल्यानंतर त्याला नागपुरात संघाच्या रेकीसाठी पाठवण्यात आले. तो दहशतवादी संघटनेसाठी अगदी नवा रिक्रूट असताना ही त्याला नागपुरात पाठवण्यात आले.

  •  नागपुरात त्याला फक्त रेकी करायची जबाबदारी देण्यात आली होती.

  • नागपुरात त्याला एक स्थानिक कॉन्टॅक्ट दिला जाईल असे सांगण्यात आले.

  • 13 जुलैला रईस दिल्लीवरून आधी मुंबईला आणि त्यानंतर नागपूरला विमानाने पोहोचला.

  •  काश्मीरमधून संघाचा कार्यालय असलेल्या नागपुरात थेट आल्याने तपास यंत्रणेला शंका येईल कदाचित हेच टाळण्यासाठी त्याने दिल्लीतून नागपूरची थेट फ्लाईट घेतली नसावी.

  • 13,14  आणि 15 जुलै तो नागपुरात होता. या दरम्यान तो सीताबर्डी परिसरातील एका हॉटेलमध्ये तसेच संत्रा मार्केट परिसरातील एका मशिदीत थांबला.

  • मात्र, त्याला कथित स्थानिक कॉन्टॅक्टची मदत मिळाली नाही. त्यामुळे एका ऑटो चालकाच्या मदतीने तो सर्वत्र फिरल्याचे त्याने आतापर्यंतच्या तपासात तपास यंत्रणांना सांगितले आहे.


नागपुरात त्याने काय काय केले?


14 जुलै रोजी तो रेशीमबाग परिसरात डॉ. हेडगेवार स्मृती भवन परिसर समोरील मोठ्या मैदानात पोहोचला. त्या ठिकाणी त्याने मोबाईलमध्येच परिसराचे चित्रीकरण केले आणि लगेच ते जैश ए मोहम्मदचा हॅण्डलर ओमरला ते चित्रीकरण पाठविले. ओमरने त्याला आणखी चित्रीकरण करण्यास सांगितले. मात्र रईस अहमद शेखने एटीएस ला दिलेल्या माहितीप्रमाणे त्या ठिकाणी इतर लोक असल्यामुळे तो घाबरला आणि जास्त चित्रीकरण करू शकला नाही. ओमरला आणखी व्हिडिओ पाठवू शकला नाही. त्यानंतर रईस अहमद शेख रेशीमबाग मधून ऑटोने संत्रा मार्केट परिसरातील एका मशिद गाठली आणि तिथे तो थांबला. काही तास तिथे मुक्काम केल्यानंतर तो 15 जुलैला हॉटेलमध्ये परतला. 15 जुलै रोजी नागपूर - नवी दिल्ली - श्रीनगर असा विमानाने प्रवास करून तो काश्मीरला परतला.


नंतर काय घडले ?


पुढे सप्टेंबर महिन्यात तो काश्मीर पोलिसांच्या हाती लागला. त्याचा जैश-ए-मोहम्मद सोबत संपर्क आहे अशी माहिती मिळाल्यामुळेच काश्मीर पोलिसांनी त्याला अटक केली होती. त्या वेळेस ही त्याच्याकडून दोन हॅण्डग्रेनेड सापडले होते. जेव्हा काश्मीर पोलिसांनी त्याची चौकशी केली तेव्हा त्याने जुलै महिन्यात नागपूरला प्रवास केल्याची माहिती समोर आली. त्यानंतर मिलिटरी इंटेलिजन्स नेही त्याचा तपास केला आणि नागपूर पोलिसांना जैश ए मोहम्मदच्या दहशतवाद्याने नागपूर प्रवास केल्याची माहिती दिली.


त्यानंतर नागपूर पोलीसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी काश्मीर मध्ये जाऊन रईस अहमद शेख ची चौकशी केली होती. तेव्हा त्यांनी दिलेल्या कबुलीजबाबच्या आधारावर नागपूरच्या कोतवाली पोलीस स्टेशन मध्ये 'अनलॉफुल अॅक्टिव्हिटीज प्रिवेन्शन ॲक्ट' अन्वये नागपुरात केलेल्या रेकी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. नंतर नागपूर पोलिसांनी संबंधित गुन्हा एटीएसला हस्तांतरित केला आणि आता त्याच गुन्ह्याअंतर्गत एटीएसने काश्मीरमधून रईस अहमद शेखला प्रोडक्शन वॉरंटवर नागपुरात आणून अटक केली आहे.


एटीएस समोर काय आव्हान आहे?
 
सध्या एटीएसचे पथक रईस अहमद शेख नागपुरात कोणा कोणाला भेटला? त्याला स्थानिक पातळीवर कोणी मदत केली? नागपुरात त्याला हॉटेलचे बुकिंग तसेच येण्याजाण्याच्या विमानाच्या टिकीट संदर्भात कोणी मदत केली?  याचा शोध एटीएस अधिकारी लावत आहेत.