गडचिरोली : मराठा आरक्षणाबाबतच्या आंदोलनात आता नक्षलवादी संघटनेने उडी घेतली आहे. "मराठा तरुणांनो दलालांपासून सावध राहा," या आशयाची पत्रकबाजी गडचिरोलीत नक्षलवाद्यांकडून केली जात आहे. "आमच्यामध्ये सामील व्हा," असं आवाहनही या पत्रकाच्या माध्यमातून नक्षलवाद्यांनी मराठा तरुणांना केलं आहे. हे सरकार केवळ अंबानी-अदानीचं आहे, त्यामुळे आरक्षण सोडून व्यवस्था बदलासाठी तयार राहा असं नक्षलवाद्यांनी म्हटलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वराज्य निर्मितीची आठवण करुन देत मराठा तरुणांना भावनिकदृष्ट्या आकर्षित करण्याचा प्रयत्न नक्षलवाद्यांनी केला आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्याआड नक्षलवादी नवा डाव रचत आहेत. नक्षलीवादी या आंदोलनाचा गैरफायदा घेण्याच्या प्रयत्नात आहेत.


'मराठा समाजाने आपले खरे शत्रू ओळखले पाहिजे'
नक्षलवाद्यांच्या पत्रकात म्हटलं आहे की, "मराठा समाजातून मूठभर जे दलाल भांडवलदार निर्माण झाले आहेत, तेच खऱ्या अर्थाने मराठा समाजाच्या अधोगतीला जबाबदार आहेत. या अधोगतीचं स्वरुप सामाजिक नसून आर्थिक आहे. या आर्थिक अधोगतीला कारणीभूत सरकारांचे आजवरचे धोरणे आहेत. तेव्हा मराठा समाजाने आपले खरे शत्रू ओळखले पाहिजे."


'आम्ही तुमच्या सोबत आहोत, तुमची वाट पाहत आहोत'
"शिवबांच्या स्वराज्य निर्मितीमध्ये मराठा समाजाने पुढाकार घेतला होता, पुन्हा पुढाकार घ्यायची वेळ आली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मावळे बनावे लागेल. परत एकदा गनिमी काव्याचे डावपेच वापरावे लागतील. शत्रू, व्यवस्थेचे रखवाल, साम्राज्यवादाचे दलाल सत्ताधारी वर्ग आहेत. मित्र, सर्वच समाजातील गोरगरीब जनता आहे. मैदानात माओवादी शस्त्र उचलून लढत आहेत. लक्ष्य, मार्ग, साधने तयार आहेत. मराठा समाजातील शिवाजी महाराजांचा खरा आदर्श बाळगणाऱ्या मावळ्यांना आवाहन आहे की, त्यांनी रयतेचे खरे राज्य आणण्यासाठी मैदानात उतरावे. आपल्या संघटित शक्तीला क्रांतीकडे वळवा. आम्ही तुमच्या सोबत आहोत, तुमची वाट पाहत आहोत," असंही नक्षली संघटनेने या पत्रकात म्हटलं आहे. 




मराठा समाजाचे एवढे वाईट दिवस आलेले नाहीत : विनोद पाटील 
मराठा समाजाचे एवढे वाईट दिवस आले आहेत का? नक्षली संघटना आम्हाला सांगते आम्ही कायद्यावरचा विश्वास सोडून त्यांच्यामध्ये सामील व्हावे. आम्हाला न्याय हक्क मिळवायचा आहे. आम्हाला कायद्यावर विश्वास आहे. वेळप्रसंगी आम्ही आंदोलन करु. न्यायालयीन लढाई लढून आणि आमचं आरक्षण किंवा पर्यायी व्यवस्था मिळवू, अशी प्रतिक्रिया मराठा आरक्षणाचे याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी दिली आहे.


खासदार संभाजीराजे छत्रपती आज कोपर्डी दौऱ्यावर
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्याने हा मुद्दा चांगलाच तापला आहे. आरक्षणासाठीच्या आंदोलनात खासदार संभाजीराजे छत्रपती सक्रिय झाले आहेत. यासाठी संभाजीराजे राज्यातील सर्व मराठा नेते आणि पदाधिकारी यांच्या भेटीगाठी घेत आहेत. त्यातच संभाजीराजे आज अहमदनगरमधील कोपर्डीचा दौरा करणार आहेत. कोपर्डी बलात्कारातील पीडितेच्या कुटुंबाची भेट घेऊन स्मृतिस्थळावरही जाणार आहेत. कोपर्डी बलात्कार आणि हत्या प्रकरणानंतर तिला न्याय मिळवून देण्यासाठी आणि मराठा समाजाच्या इतर मागण्यांसाठी आंदोलनाला सुरुवात झाली होती.