Maharashtra News Updates: तळकोकणातील मालवण समुद्र किनाऱ्यावर मच्छीमारामध्ये बाचाबाची, पोलिसांनी बजावल्या नोटिसा

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 06 Jan 2023 11:20 PM
आमदार योगेश कदम यांच्या गाडीला अपघात, सुदैवाने आमदार सुखरूप

आमदार योगेश कदम यांच्या गाडीला अपघात, सुदैवाने आमदार सुखरूप


आमदार योगेशदादा कदम यांच्या गाडीला रात्री सव्वादहा च्या सुमारास पोलादपूर नजीक कशेडी घाटात चोळई येथे रायगड हद्दीत अपघात झाला आहे. 


    

Sindhudurg: तळकोकणातील मालवण समुद्र किनाऱ्यावर मच्छीमारामध्ये बाचाबाची, पोलिसांनी दिल्या नोटीसा

Sindhudurg News:  सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण समुद्र किनाऱ्यावर इलेक्ट्रिक वजनकाट्यावर कीरकोळ दरात मासेविक्री करणाऱ्या मच्छी विक्रेते आणि पारंपरिक मासे विक्री करणाऱ्या महिला मच्छिमारांमध्ये आपापसात बाचाबाची होऊन किनारपट्टीवर तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. या वादाप्रसंगी मालवण पोलीस किनाऱ्यावर पोहोचले. दोन्ही मच्छिमारांच्या गटात समजोता होत नसल्याने हा वाद अखेर मालवण पोलीस ठाण्यात चर्चेसाठी गेला. पोलीस निरीक्षक विजय यादव उपस्थित झालेल्या चर्चेत दोन्ही गटात कोणताही समझोता न झाल्याने पोलिस निरीक्षकानी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार त्या दृष्टीने दोन्ही गटाच्या मच्छिमारांविरोधात नोटिसा बजावल्या.

लग्नाच्या ऑर्डरच्या बहाण्याने केटरिंगचे सामान घेऊन फरार झालेल्या तीन आरोपींना अटक, एक फरार, खानपानाचे साहित्य जप्त

लग्नाच्या बहाण्याने केटरर्सकडून भाड्याने घेतलेली लाखो रुपयांची भांडी घेऊन फरार झालेल्या तिघांना शिवाजी नगर पोलिसांनी अटक केली आहे. तर त्यांचा एक साथीदार अद्याप फरार असून त्याचा शोध सुरू आहे. आबिद सय्यद (वय, 25), आफताब खान ( वय, 24) आणि शोएब खान (वय, 23) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून, पोलिसांनी त्यांच्याकडून चोरीची सर्व भांडी जप्त केली आहेत.


सहाय्यक पोलिस निरीक्षक नवनाथ काळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, घटना 1 जानेवारी रोजी शिवाजी नगर येथील एका केटररकडे काही लोक आले आणि त्यांनी सामान बुक केले. टोकन म्हणून थोडी रक्कम दिल्यानंतर त्यांनी लाखो रुपयांचा माल घेऊन पळ काढला. त्यानंतर संबंधिताने साहित्य घेऊन गेलेल्यांना फोन अनेक फोन केले. परंतु, त्यांना फोन उचलला नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर केटररने याप्रकरणी पोलिसांत तक्रार केली. त्यानंतर वरिष्ठ पोलिस निरीक्षक अर्जुन राजणे यांच्या मार्गदर्शनाखाली गुप्त माहिती आणि खबऱ्यांद्वारे आरोपींचा माग काढण्यात आला.  त्यांच्याविरुद्ध आणखी कोठे गुन्हे दाखल आहेत, याचा तपास पोलिस करत आहेत.

Beed News: बीडमध्ये बनावट दारूचा कारखाना चालवनाऱ्यावर एमपीडीएनुसार कारवाई
Beed News: बनावट दारू तयार करून लोकांच्या जीवाशी खेळणाऱ्या कुख्यात दारू माफिया रोहित चव्हाण याला पोलिसांनी अटक करून त्याच्यावर एमपीडीए कायद्यानुसार कारवाई केली आहे. त्याला हरसुल कारागृहामध्ये स्थानबद्ध करण्यात आले आहे. बीड शहराजवळ राहुल चव्हाण याने बनावट दारूचा कारखाना उभा केला होता. त्यावर पोलिसांनी कारवाई करून दारू जप्त केली. मात्र, जामिनावर सुटलेल्या राहुल चव्हाणने पुन्हा दारूचा व्यवसाय सुरू केल्याने त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे..
बीडमध्ये बनावट दारूचा कारखाना चालवनाऱ्यावर एमपीडीए नुसार कारवाई
बनावट दारू तयार करून लोकांच्या जीवाशी खेळणाऱ्या कुख्यात दारू माफिया रोहित चव्हाण याला पोलिसांनी अटक करून त्याच्यावर एमपीडीए कायद्यानुसार कारवाई करून त्याला हरसुल कारागृहामध्ये स्थानबद्ध करण्यात आलय.

 

बीड शहराजवळ राहुल चव्हाण यांनी बनावट दारूचा कारखाना उभा केला होता त्यावर पोलिसांनी कारवाई करून दारू जप्त केली मात्र जामिनावर सुटलेल्या राहुल चव्हाण यांनी पुन्हा दारूचा व्यवसाय सुरू केल्याने त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे..
पैशाच्या वादातून तिघा जणांची तरुणाला मारहाण.. उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू
पैशाच्या वादातून तिघा जणांनी एकाला मारहाण करून विष पाजल्याची घटना बीडच्या गेवराई तालुक्यातील पाचेगाव येथे घडली आहे.. पाचेगाव येथील गणेश जाधव या 22 वर्षाच्या तरुणाला पैश्याच्या वादातून तिघा जणांनी मारहाण करून विष पाजलं होत... त्यानंतर गणेश जाधव याला बीडच्या एका खाजगीर मला तुमच्यासाठी दाखल करण्यात आलं मात्र उपचारादरम्यान आज त्याचा मृत्यू झाला असून याप्रकरणी मारहाण करणाऱ्यावर खुणाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी गणेशच्या नातेवाईकांनी केली आहे

 
राज्यात 1432 वरीष्ठ निवासी डॉक्टरांची पदे मंजूर, राज्य शासनाचा निर्णय 

राज्यात 1432 वरीष्ठ निवासी डॉक्टरांची पदे मंजूर करण्यात आली आहेत. राज्य शासनाने आजच याबाबतचा निर्णय घेतलाय. राज्यातील महाडच्या डॉक्टरांनी दोन दिवसापूर्वी मोठा संप केला होता आणि त्यानंतर राज्य सरकारने त्यांचे प्रश्न समजून घेऊन त्याची सोडवणूक करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार आता राज्य सरकारकडून पहिले पाऊल उचलण्यात आले आणि राज्यभरातील 1432 वरिष्ठ निवासी डॉक्टरांचे पदे मंजूर करण्यात आली आहेत. 

मालवणी पोलिसांची मोठी कारवाई, 18 किलो गांजासह एकाला अटक

मुंबई पोलिसांनी ड्रग्स आणि नशेली पदार्थांविरोधातील कारवाई तीव्र केली आहे. याच मोहिमेचा एक भाग म्हणून मुंबईच्या मालवणी पोलिसांनी एनडीपीएस कायद्यानुसार कारवाई करत एका आरोपीला 18 किलो गांजासह मालवणी परिसरातून अटक केली आहे. भगतसींह शैतानसींह राठोड  (वय, 32) असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. 

Chandrapur News: काँग्रेसच्या गडचिरोली जिल्हयातील कार्यकर्त्यांनी चंद्रपुरात काढला घंटानाद मोर्चा

Chandrapur News: गडचिरोली जिल्ह्यात गेले काही दिवस वाघांच्या हल्ल्यात ग्रामस्थ बळी पडण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. सध्या धानोरा-चातगाव परिसरातील टी सिक्स वाघिणीला चार बछड्यांसह जेरबंद करण्यासाठी ऑपरेशन राबविले जात आहे. मात्र त्यात 22 दिवसांपासून कुठलेही यश आलेले नाही. परिणामी गडचिरोली जिल्ह्याच्या या भागात वाघाच्या दहशतीने शेतकरी व ग्रामस्थ त्रस्त आहेत. याच पार्श्वभूमीवर आज गडचिरोली जिल्हा काँग्रेसने चंद्रपुरात वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या घरावर घंटानाद मोर्चा आयोजित केला. चंद्रपुरात शेकडोंच्या संख्येने पोचलेल्या गडचिरोलीतील काँग्रेस कार्यकर्त्यांना पोलिसांनी पालकमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर जाण्यापासून रोखले.

पालिकेकडून कारवाईची धमकी देत दुकानदाराकडून दीड लाख रुपयांच्या खंडणीची मागणी, तोतया पत्रकारांच्या टोळीस अटक 

मुंबईच्या साकीनाका पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये कपड्यांना कलर आणि डाय करणाऱ्या व्यापाऱ्यास पालिकेत तक्रार करून कारवाईची धमकी देत दीड लाख रूपयांची खंडणी मागणाऱ्या तोतया पत्रकारांच्या टोळीचा पर्दाफाश केलाय. साकीनाका पोलिसांनी धमकी आणि खंडणी प्रकरणी  लाच घेताना तीन पत्रकारांना रंगेहात पकडले आहे.

मुंबईतील एमएचबी पोलिसांची कारवाई, 42 जुगाऱ्यांना अटक

मुंबईतील बोरिवली पश्चिम MHB पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या गणपत पाटील नगर आणि शास्त्री नगरमध्ये MHB पोलिस अधिकाऱ्यांनी रात्री दोन ठिकाणी जुगारवर छापे टाकले. यात गणपत पाटील नगर येथून 24 तर शास्त्रीनगर येथून 18 जणांना अटक करण्यात आलीय. शास्त्रीनगर येथे एका घरात पैसे घेऊन जुगार खेळत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली एमएचबी पोलिस अधिकाऱ्यांनी छापा टाकला.  

तीन लाख रूपयांचे दागिने घेऊन पसार झालेल्या चांघांना अटक, पालघर पोलिसांची कारवाई 

पालघर : महिलेचा खून करून 70 लाख रुपये लुटलेल्या घनेचा पोलिस तपास करत आहेत. त्यामुळे तुमचे दागिने आमच्याकडे द्या असं सांगून 3 लाख 24 हजार रुपयांचे दागिने घेऊन पसार झालेला चौघांना स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतले आहे.  सातिवली सफाळे या मार्गावर ही घटना घडली असून यानंतर सफाळे पोलिस ठाण्यात 420, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर संशयितांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.  

सोलापुरात प्रहार संघटनेचे आंदोलन, पथ दिव्याच्या खांबाला धक्का लागून मृत्यू झालेल्या मुलीच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्याची मागणी 

सोलापूर : पथ दिव्याच्या खांबाला धक्का लागल्याने विजेचा झटका बसून चिमुकलीचा मृत्यू झाल्या प्रकरणी प्रहार संघटनेच्या नेतृत्वाखाली मृत मुलीच्या कुटुंबियांचे शासकीय रुग्णालयात आंदोलन सुरु केले आहे. आज सकाळी आठ वाजल्या पासून शासकीय रुग्णालयातील शिवविच्छेदन विभागसमोर ठिय्या आंदोलन सुरू आहे. मयत मुलीच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत मिळावी आणि संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी प्रहार संघटनेकडून करण्यात येत आहे. मागील 10 तासापासून आंदोलन सुरु असून पालिकेकडून उद्याप कोणतीही दखल घेतली गेली नसल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केलाय. काल संध्याकाळी नई जिंदगी परिसरात घरासमोर खेळताना विजेचा धक्का बसल्याने ऐमन बिराजदार या आठ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला होता. काल संध्याकाळपासून मृतदेह परिवाराने अद्याप ताब्यात घेतलेला नाही.  

समीर वानखेडेंना दिलासा देण्यास न्यायालयाचा नकार, सीबीआयच्या कारवाईपासून संरक्षण देण्याची मागणी फेटाळली  

मुंबई : बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी सनदी अधिकारी समीर वानखेडेंना कोणताही दिलासा देण्यास दिल्ली उच्च न्यायालयाने नकार दिलाय. सीबीआयच्या कारवाईपासून संरक्षण देण्याची वानखेडे यांची मागणी न्यायालयाने नाकारली आहे. 

राष्ट्रवादी-भाजप पुन्हा आमने सामने! राष्ट्रवादीचे स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज स्टिकर्स तर भाजपचे धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज स्टिकर्स

राष्ट्रवादी काँग्रेसकडून स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज असा मजकूर असलेली स्टिकर्स छापण्यात आलीयत.  पक्षाच्या नेत्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या वाहनांवर ही स्टिकर्स लावण्यात येतायत. स्वतः अजित पवारांनी एका कार्यकर्त्याच्या गाडीवर हे स्टिकर्स चिकटवून याची सुरुवात केली. त्याला उत्तर म्हणून आता पुणे भाजपकडून देखील धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज अशी स्टिकर्स छापण्यात आलीयत.  संध्याकाळी पाच वाजता ती वाहनांवर चिकटवण्यात येणार आहेत.

Nawab Malik: माजी मंत्री नवाब मलिकांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ

Nawab Malik: माजी मंत्री नवाब मलिकांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आले आहे. नवाब मलिक यांची न्यायालयीन कोठडी नियमित 14 दिवसांनी वाढवण्याचे निर्देश मुंबई सत्र न्यायालयाने दिले आहे. नवाब मलिक यांच्यावर सध्या न्यायालयाच्या परवानगीनं कुर्ल्यातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत

MCD Mayor Election : दिल्ली महापालिकेत शपथविधी सोहळ्यादरम्यान मोठा गोंधळ

MCD Mayor Election : दिल्ली महापालिकेत शपथविधी सोहळ्यादरम्यान मोठा गोंधळ झाला आहे. आम आदमी पार्टी आणि भाजपच्या नगरसेवकांमध्ये धक्काबुक्की देखील झाली आहे.

Sanjay Raut: संजय राऊत यांच्याविरोधात एनबीडब्ल्यू (नॉन बेलेबल वॉरेट) जारी, शिवडी दंडाधिकारी कोर्टाची कारवाई

Sanjay Raut: संजय राऊत यांच्याविरोधात एनबीडब्ल्यू (नॉन बेलेबल वॉरेट) अजामीनपात्र जारी करण्यात आला आहे.  शिवडी दंडाधिकारी कोर्टाने कारवाई केली आहे. पुढची सुनावणी 24 जानेवारीला होणार आहे. 

 Nandurbar News: नंदुरबारामध्ये लम्पीनंतर घातलेली बंदी जिल्हा प्रशासनाने तीन महिन्यानंतर उठवली
 Nandurbar News: उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठा बैल बाजार नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा आणि तळोदा बाजार समितीत होत असतो या बैल बाजारातून मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होत असते. मात्र गेल्या चार महिन्यापासून लम्पी आजाराच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाच्या वतीने गुरांचे बाजार आणि गुरांच्या वाहतुकीवर बंदी घातली होती. त्यामुळे गुरांच्या खरेदी विक्रीतून होणारे कोट्यावधी रुपयांची उलाढाल ठप्प झाली होती. आज जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील गुरांचे बाजार आणि वाहतूक करण्यावर घातलेले निर्बंध मागे घेतल्याने बैल बाजार पुन्हा सुरू होणार आहेत तर निर्बंध हटवताना प्रशासनाच्या वतीने बाजार समिती आणि गुरांच्या व्यापाऱ्यांना खबरदारीच्या सर्व उपाययोजना करण्याचा  सूचना करण्यात आल्या आहेत .
Maharashtra News: उर्फी जावेद आणि चित्रा वाघ यांच्या वादात अंजली दमानियांची उडी

Maharashtra News: उर्फी जावेद आणि भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यातील वाद काही थांबायचं नाव घेत नाहीये. आणि या वादामध्ये आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उडी घेतली आहे. उर्फीच्या बोल्ड कपड्यांविरोधात आक्रमक झालेल्या चित्रा वाघ यांच्यावर दमानिया यांनी निशाणा साधला. दमानिया यांनी  भाजप नेते रमेश विदुडी यांच्या कार्यक्रमातील अश्लील नृत्याचा व्हिडिओ ट्वीट करत चित्रा वाघ यांच्यावर टीका केलीय.. दरम्यान हा व्हिडिओ राजस्थानातील असल्याची माहिती मिळतेय.

रत्नागिरीमध्ये पारंपरिक मच्छिमार आणि पर्ससिन तसंच एलईडीधारक मच्छिमार यांच्यातील वाद चिघळण्याची शक्यता

Ratnagiri News : रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पारंपरिक मच्छिमार विरुद्ध पर्ससिन आणि एलईडीधारक मच्छिमार यांच्यातील वाद चिघळण्याची शक्यता आहे. कारण, एक जानेवारीपासून पर्ससिन मच्छिमारीवर बंदी आहे. त्यानंतर देखील समुद्रात पर्ससिन बोटी जात आहेत. मासेमारी करत आहेत. पण त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नाही. अशावेळी पारंपरिक मच्छिमार या बोटी पकडून देण्यासाठी स्वतः समुद्रामध्ये जाणार आहेत. अधिकाऱ्यांच्या वरदहस्तांमुळेच या गोष्टी होत असल्याचा गंभीर आरोप पारंपरिक मच्छिमारांनी केला आहे.

जायकवाडीच्या वरील भागात म्हणजेच नगर आणि नाशिक जिल्ह्यांत कोणतेही नवे धरण बांधण्यात येऊ नये, औरंगाबाद खंडपीठात याचिका

Aurangabad News : जायकवाडीच्या वरील भागात म्हणजेच नगर आणि नाशिक जिल्ह्यांत कोणतेही नवे धरण बांधण्यात येऊ नये अशी विनंती करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे आगामी काळात मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र असा पाण्याचा वाद पुन्हा एकदा समोर येऊ शकतो. 19 सप्टेंबर 2019 रोजी राज्य शासनाने काढलेल्या एका आदेशानुसार कोकणातील वाहून जाणारे अतिरिक्त 168 टीएमसी पाणी मराठवाड्यात वळवण्याचे निश्चित झाले होते. मात्र, हे पाणी नाशिकला वळवण्याचे प्रयत्न सुरु झाले असून, सिन्नर आणि वाघाडी अशा दोन प्रकल्पांसाठी प्रस्तावही तयार करण्यात आले आहेत. त्यामुळे आता याला विरोध होत असून जायकवाडीच्या वरील भागात म्हणजेच नगर आणि नाशिक जिल्ह्यांत कोणतेही नवे धरण बांधण्यात येऊ नये अशी याचिका औरंगाबाद खंडपीठात दाखल करण्यात आली आहे. 

जॉन्सन अँड जॉन्सन बेबी पावडरबाबत सोमवारपर्यंत भूमिका स्पष्ट करा, मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश

Johnsons Baby Powder : जॉन्सन अँड जॉन्सन बेबी पावडरबाबत सोमवारपर्यंत भूमिका स्पष्ट करा


मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश


नव्या नियमावलीनुसार पुन्हा नव्याने बेबी पावडरच्या नमुन्यांची चाचणी शक्य


कोलकाता येथील प्रयोगशाळेत नमुने पाठवले जातील, एफडीएची माहिती


नव्या चाचणीचा अहवाल 14 दिवसांत प्राप्त होईल - एफडीए


जर उत्पादन लहान मुलांच्या आरोग्याशी संबंधित असेल तर चाचणीचा निकाल आठवड्याभरात यायला हवा - हायकोर्ट


तूर्तास जॉन्सन अँड जॉन्सन बेबी पावडरच्या वितरण आणि विक्रीवरील बंदी कायम

Sanjay Raut: संजय राऊतांचा जामीन रद्द करण्यासाठीच्या याचिकेवर आज सुनावणी नाही

Sanjay Raut: संजय राऊतांचा जामीन रद्द करण्यासाठीच्या याचिकेवर आज सुनावणी नाही. न्यायमूर्ती नीतीन बोरकर काही कारणानं अनुपस्थित असल्यानं आजचं कामकाज तहकूब केले आहे. ईडी सोमवारी पुन्हा तातडीच्या सुनावणीसाठी प्रयत्न करणार आहेत. 

Jalgaon News: महानुभव पंथाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामनराव बिडकर बाबा यांचं निधन
Jalgaon News: अखिल भारतीय महानुभाव पंथाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा प म श्री वर्धनस्त उपाध्य कुलाचाऱ्या वामनराव बिडकर बाबा यांचं आज पहाटे वृद्धपकाळाने निधन झाले आहे. ते 82 वर्षांचे होते. जळगाव जिल्ह्यातील अमलनेर तालुक्यातील रणाईचे येथील त्यांच्या आश्रमात राहत होते.गेल्या काही दिवसांच्या पासून ते आजारी होते.  महानुभाव पंथाच्या तेरा अनुयायांपैकी ते श्रेष्ठ महंत म्हणून मानले जात होते.  जळगाव जिल्ह्यात नव्हे तर संपूर्ण जगभरात त्यांचे अनुयायी पसरले आहेत. आज सायंकाळी चार वाजता अमळनेर तालुक्यातील रनाईचे येथे त्यांच्यावर महानुभाव पंथाच्या रीतीरीवाजा प्रमाणे अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. 

 
Twitter Security Breach : 200 दशलक्ष ट्विटर युजर्सचा डेटा चोरीला, ईमेल आयडी लीक झाल्याचा रिपोर्टमध्ये दावा

Twitter Safety Breach : ट्विटर (Twitter) युजर्ससाठी मोठी बातमी आहे. ट्विटर युजर्सचा डेटा चोरीला (Data Leak) गेल्याची माहिती समोर आली आहे. एका रिपोर्टमध्ये हा दावा करण्यात आला आहे. सिक्योरिटी रिसर्चर रिपोर्टच्या दाव्यानुसार, 200 दशलक्षहून अधिक ट्विटर युजर्सचा ईमेल आयडी चोरीला गेला आहे. हॅकरने युजर्सचे ई-मेल आयडी चोरून ते एका ऑनलाइन फोरममध्ये पोस्ट केले आहेत. ब्रीच-नोटिफिकेशन साइट हॅव आय बीन प्वेन्डचे निर्माते ट्रॉय हंट यांच्या माहितीनुसार, 200 दशलक्ष ट्विटर युजर्सचा ईमेल आयडी चोरीला गेला आहे.


सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Sanjay Raut: संजय राऊतांचा जामीन रद्द करण्यासाठी ईडी हायकोर्टात

Sanjay Raut: संजय राऊतांचा जामीन रद्द करण्यासाठी ईडीने हायकोर्टात धाव घेतली आहे. तपासयंत्रणेनं दाखल केलेल्या याचिकेवर तातडीनं सुनावणी घेण्याची विनंती करणार आहे. पत्राचाळ घोटाळा प्रकरणी पीएमएलए कोर्टानं 9 नोव्हेंबर रोजी  संजय राऊतांना जामीन दिला आहे. मुंबई सत्र न्यायालयानं दिलेला जामीन रद्द करण्याकरता ईडीनं त्याच दिवशी हायकोर्टात धाव घेतली होती 

डॉक्टरवर हल्ला प्रकरणी सर्व शिकवू डॉक्टरांनी यवतमाळमध्ये पुकारला संप

Yavatmal :  वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पुन्हा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. वॉर्डात रुग्णावर उपचार करीत असलेल्या कनिष्ठ निवासी डॉक्टरवर रुग्णाने चाकूने हल्ला केल्याची घटना घडली. यात डॉक्टरच्या गळ्यावर दुखापत झाली आहे.  रुग्णालयातील वॉर्ड क्र. 25 मध्ये ही घटना घडली. त्यानंतर संतप्त डॉक्टरांनी आंदोलनाचा पवित्रा घेत सुरक्षेचा मुद्दा उचलून धरला आहे. त्यामुळं इतर रुग्णांचीही काही प्रमाणात गैरसोय झाली आहे. विभागात पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाला असलेले डॉ. सॅबिस्टीयन यांच्या मानेला गंभीर दुखापत झाली असून चार ते पाच टीचेस पडले आहेत. 
सध्या प्रकृती स्थिर असून या रुग्णालय परिसरात पीएसआय दर्जाची एक पोलीस चौकी देण्यात यावी अशी मागणी शिकावू डॉक्टरांकडून होत आहे. तसेच या डॉक्टरांच्या संपला आयएमए आणि इतर मेडिकलच्या संघटनेचा पाठिंबा आहे.

Nanded News:  नांदेडमध्ये अपघातापासून सुरक्षिततेसाठी “उजवीकडून चला” अभियानाचा आज शुभारंभ

Nanded News:  रस्त्यावरील अपघातात पादचाऱ्यांचे वाढणारे निष्पाप बळी लक्षात घेऊन, यावर उपाययोजनेसाठी आजवर अनेक उपक्रम राबविले आहेत. पूर्वीच्या प्रघातानुसार आपण डाव्या बाजुनेच रस्त्यावर चालल्यामुळे पाठीमागुन येणाऱ्या वाहनांची कल्पना न आल्याने गेलेले बळी अधिक आहेत. हे लक्षात घेऊन रस्त्यावर चालतांना समोरून येणारी वाहने आपल्याला दिसावीत व त्यापासून स्वत:ची सुरक्षा करता यावी यादृष्टीने नांदेड जिल्ह्यात “उजव्या बाजुने चला” "वॉक ऑन राईट"ही अभिनव मोहिम आज प्रादेशिक परिवहन विभागाने हाती घेतली आहे.

धुळ्यातील तापमान 7 वरुन 11 अंश सेल्सिअसवर गेल्याने नागरिकांना दिलासा

Dhule Cold : धुळे शहरासह जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून सात अंश सेल्सिअसवर असलेले तापमान आज 11 अंश सेल्सिअसवर गेले आहे. यामुळे नागरिकांना कडाक्याच्या थंडीपासून काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे, गेल्या दोन ते तीन दिवसांपासून शहरासह जिल्ह्यातील तापमानात मोठ्या प्रमाणात घट झाल्याने कडाक्याच्या थंडीचा परिणाम हा दिवसभर जाणवत होता. वाढत्या थंडीमुळे सकाळी आणि सायंकाळी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात नागरिकांची संख्या घटली होती. तसेच दिवसभर धुक्याची चादर पसरली असल्याने याचा परिणाम रब्बी हंगामाच्या पिकांवर देखील होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान आज तापमानात तब्बल चार अंश सेल्सिअसने वाढ झाल्याने वातावरणातील गारठा काही प्रमाणात कमी झाला आहे.


 
Sangli News :' आटपाडीतील ख्रिस्ती धर्मांतर प्रकरणी सकल हिंदू समाजाचा मोर्चा

Sangli News :'संशयित ख्रिस्ती धर्म प्रसारक संजय गेळेच्या कारभाराची चौकशी करा या मागणीसाठी  सांगलीतल्या आटपाडीत सकल हिंदू समाजाने मोर्चा काढला.. संजय गेळेने बेकायदेशीरपणे चर्च
उभारल्याचा आरोप करण्यात येत आहे. 

Yashwantrao Holkar: महाराजा यशवंतराव होळकर राज्याभिषेक दिन सोहळा

Yashwantrao Holkar: संपूर्ण हिंदुस्ताना मधे इंग्रजांच्या विरुद्ध एक मोठा लढा उभारणारे महाराजा यशवंतराव होळकर (प्रथम) यांचा राज्याभिषेक दिन सोहळा 06 जानेवारी 2023 (शुक्रवार) रोजी सकाळी-9.00am किल्ले वाफगाव(ता-खेड, जिल्हा-पुणे) येथे प्रति वर्षानुसार मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. या ऐतिहासिक सोहळ्यास संपूर्ण देशातून अनेक ऐतिहासिक घराण्यांचे वंशज, राजकीय, सामाजिक क्षेत्रात कार्यरत व्यक्ती-संघटना व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असून..सर्वांनी गट-तट बाजूला ठेऊन या ऐतिहासिक कार्यात सहभागी होण्याचे आवाहन होळकर घराण्याचे वंशज श्रीमंत भूषणसिंह राजे होळकर यांनी केले आहे. गजी नृत्य, ढोल वादन, मर्दानी खेळ, शस्त्र अस्त्र प्रदर्शन, पुस्तक प्रदर्शन, इतिहासिक व्याख्यान, इत्यादी या शाही सोहळ्याचे आकर्षण असणार आहेत.. 3 डिसेंबर 1776 रोजी महाराजा यशवंतराव होळकर यांचा जन्म वाफगाव च्या किल्ल्या मधे झला. पुढे अनेक लढायांमध्ये सहभागी होत त्यांनी आपल्या पराक्रमाचा परिचय दिला.. पण 1798-99 मध्ये सुभेदार तुकोजीराव होळकर यांच्या निधनानंतर होळकर घराण्यावर मोठे संकट आले..ज्या घराण्याने उत्तरेमध्ये स्वराज्याच्या सीमा अटकेपार नेहल्या त्या होळकर घराण्याला संपावण्याचे डाव रचले जाऊ लागले... या कठीण काळात आपले कुलदैवत खन्डोबा चे दर्शन घेऊन जेजुरी हून फक्त एक घोडा आणि अंगावरच्या वस्त्रानिशी बाहेर पडलेल्या महाराजा यशवंतराव होळकर यांनी आपल्या पराक्रमाच्या जोरावर आपले राज्य पुन्हा मिळवले व 06 जानेवारी 1799 रोजी स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला.. हि बाब आजच्या तरुण वर्गासाठी प्रेरणा दायी आहे.. कि कोणतीही गोष्ट अशक्य नाही..

Parbhani News: परभणी जिल्ह्यातील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या 30 नगरसेवकांचा शिंदे गटात प्रवेश

Parbhani News:  परभणी जिल्ह्यातील पाथरी, पूर्णा, पालम येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तसेच राष्ट्रीय समाज पक्ष, एमआयएम, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या 30 नगरसेवकांनी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बाळासाहेबांची शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला.

Nashik News: अपहरण झालेला चिराग कलंत्री या मुलाची सुखरूप सुटका,अपहरणकर्त्यांचा पोलिसांकडून शोध सुरू

Nashik News: नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील धक्कादायक घटना घडली आहे.  काळेवाडा परिसरात घराजवळ खेळणाऱ्या चिराग कलंत्री या 12 वर्षीय मुलाचे अपहरण झाले आहे. अपहरण झालेला
चिराग कलंत्री या मुलाची सुखरूप सुटका झाली आहे. अपहरणकर्त्यांनी दुचाकीवरुन मुलाला घराजवळ सोडलं आहे. फरार अपहरणकर्त्यांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. 

Mandhardevi Yatra: लाखो भाविकांचे श्रध्दा स्थान असणा-या मांढरदेव यात्रेला उत्साहात सुरुवात

Mandhardevi Yatra: लाखो भाविकांचे श्रध्दा स्थान असणा-या मांढरदेव यात्रेला उत्साहात सुरुवात झाली आहे. शाकंबरी पौर्णिमेला या यात्रेचा मुख्य दिवस असल्याने राज्यासह बाहेरच्या राज्यातील हजारो भाविकांनी यात्रेला उपस्थिती लावली आहे. नवसाला पावणारी काळूबाई अशी ख्याती असलेल्या देवीची यात्रा 10 दिवस सुरु राहते. यात्रे दरम्यान वाद्य वाजविणे, पशु हत्या आणी करणी करण्याच्या उद्देशाने झाडंना बाहुल्या तसेच खिळे ठोकणे यावर बंदी असुनकोरोनाच्या पार्श्वभुमीवर मास्क घालण्याचं आवाहन सुद्धा प्रशासनानं केलं आहे.

Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर दोन ट्रकच्या भीषण अपघातात एकाचा मृत्यू , एक गंभीर जखमी.

Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर चॅनेज 327.8 जवळ नागपूर कॉरिडॉरवर रात्री झालेल्या दोन ट्रकच्या अपघातात एक ट्रक चालकाचा जागीच मृत्यू  झाला तर दुसऱ्या ट्रकचा चालक गंभीर जखमी झालाय. एक ट्रक औरंगाबाद हुन नागपुरकडे जात असताना चालकाला झोप आल्याने हा ट्रक महामार्गावर सुरक्षा भिंतीवर आदळून महामार्गाच्या आकस्मित लेन मध्ये पलटी झाला. त्या मागून येणाऱ्या दुसऱ्या ट्रक चालकाला हा अपघातग्रस्त ट्रक न दिसल्याने मागून येणारा हा ट्रक अपघातग्रस्त ट्रकवर आदळून या ट्रकचा चालक ज्ञानेश्वर कातकडे यांचा जागीच मृत्यू झाला. तात्काळ महामार्ग पोलीस घटनास्थळी पोहचून महामार्गावरील ट्रक क्रेनच्या साहायाने बाजूला हटवून वाहतूक सुरळीत केली आहे. जखमी चालकांवर सिंदखेडराजा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.




Ambarnath News: भाजप पदाधिकाऱ्यांच्या घराबाहेर फेरीवाल्यांचा गोंधळ

Ambarnath News: अंबरनाथमध्ये भाजप पदाधिकाऱ्याच्या घराबाहेर महिला फेरीवाल्यांनी गोंधळ घातल्याची घटना घडली आहे. सदर पदाधिकारी फेरीवाल्यांविरोधात सतत तक्रारी करत असल्याने पालिका वारंवार आमच्यावर कारवाई करते, या रागातून फेरीवाल्यांनी हा गोंधळ घातला. याप्रकरणी 18 ते 20 महिला फेरीवाल्यांविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

Jejuri News: जेजुरीत पौष पोर्णिमेनिमित्त गाढवांचा बाजार

Jejuri News: जेजुरीत पौष पोर्णिमेनिमित्त गाढवांचा बाजार भरला आहे.  गाढवांच्या पारंपारिक बाजारात काटेवाडी, गावठी आणि विविध प्रकारची हजारो गाढवं दाखल झाली आहेत. पौष पौर्णिमेला जेजुरीच्या खंडेरायाची यात्रा असते आणि याच दिवशी गाढवांच्या बाजाराचा मुख्य दिवस असतो 

Nandurbar News:  सातपुड्यात तापमानाचा पारा 9 अंश सेल्सिअसवर

Nandurbar News:  सातपुड्याच्या डोंगररांगांमध्ये तापमानाचा पारा चांगलाच खाली जात आहे. तापमान 8.5 ते 9 अंश सेल्सिअस पर्यंत खाली आहे याचा परिणाम मानवी जनजीवनावर होत असल्याचे चित्र आहे. सकाळी 10 वाजे पर्यंत या परिसरात कडाक्याची थंडी राहत आसल्याने नागरिक थंडी पासून बचावासाठी शेकोटीचा आधार घेत असल्याचे चित्र ठिकठिकाणी पाहण्यास मिळत आहे.सातपुड्याच्या डोंगर रंगामध्ये दाट धुके पाहण्यास मिळत असून तोरणमाळ येथील सातपायरी घाट,सिताखाई,यशवंत तलाव परिसरात दाट धुके पाहण्यास मिळत आहे. 

Ratnagiri News:  पंधराव्या वित्त आयोगातून निधीच नाही, पदाधिकारी नसल्याने 20 कोटींवर पाणी

Ratnagiri News:  स्थानिक स्वराज्य संस्थांना 15 व्या वित्त आयोगातून दरवर्षी कोट्यावधी रुपयांचा निधी मिळतो.त्यातून ग्रामीण भागातील विकासाला चालना मिळते जिल्हा परिषद आणि पंचायत समिती यांच्या वाट्याला मिळणारा निधी या वर्षाला आलाच नाही.जिथं प्रशासक आहेत त्या ठिकाणी वर्षभरात एकही रुपया दिले नसल्याचे समोर आले आहे.त्यामुळे आता 20 कोटी रुपयांवर पाणी पडणार आहे.

पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये..


 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. त्याशिवाय संजय राऊत आजपासून दोन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर आहेत. प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिराच्या प्राणांगणात माणदेशी महोत्सवाला सुरुवात झालेली आहे. तर मुंबई महानगरपालिका प्रभाग रचनेविरोधात ठाकरे गटाचे माजी नगरसेवरक राजू पेडणेकरांकडून दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर  मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे, यासह दिवसभरात कोणत्या महत्वाच्या घटना आहेत,, त्यासंदर्भात जाणून घेऊयात... 


संजय राऊत दोन दिवस नाशिक दौऱ्यावर


नाशिक – शिवसेना खासदार संजय राऊत आजपासून दोन दिवस नाशिक दौऱ्यावर आहेत. उध्दव ठाकरे नशिकमध्ये सभा घेणार आहेत त्या पार्श्वभूमीवर राऊताचा दौरा महत्वाचा आहे. ठाकरे गटाला सुरुंग लागल्यानंतर डॅमजे कंट्रोलसाठी उध्दव ठाकरे मैदानात असून संजय राऊत मैदान तयार करण्यासाठी येत आहेत. संपर्क प्रमुख, माजी आमदार, 12 नगरसेवक पदाधिकारी यांनी मागील 15 दिवसात पक्ष्याला जय महाराष्ट्र केलाय. 


मुख्यमंत्री पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आजपासून दोन दिवसांच्या पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. पाहूयात कसा असेल त्यांचा दौरा
कोल्हापूर – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर आहेत. सकाळी 11 वाजता करवीर निवासिनी अंबाबाईचे दर्शन घेतील. त्यानंतर श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांची भेट घेणार आहेत. 
सातारा – महाराष्ट्रातील आणि कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सातारा जिल्ह्यातील मांढरदेवी गडावरील काळूबाईची यात्रा शाकंभरी पोर्णिमेला भरते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन वर्षापासून या गडावरच्या काळूबाईची यात्रा भरवण्यास शासनाने बंदी घातली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज या यात्रेसाठी जाण्याची शक्यता आहे.  त्यानंतर मुख्यमंत्री त्यांच्या दरे गावी जाणार आहेत.  


माणदेशी महोत्सवाला सुरुवात 


मुंबई – प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिराच्या प्राणांगणात माणदेशी महोत्सवाला सुरुवात झालेली आहे. पुढचे 4 दिवस हा महोत्सव होणार आहे. या महोत्सवाला मुंबईकरांचा भरभरून असा प्रतिसाद मिळत असतो. मुंबईकर माणदेशी खाद्यपदार्थांची चव चाखण्याकरता आवर्जून या महोत्सवाला भेट देत असतात त्याचसोबत या महोत्सवामध्ये अनेक कलाकार आपली कला सादर करत असतात. महिलांचं सबलीकरण आणि सशक्ति करणाच्या संदर्भातलं हे पुढचं पाऊल उचलण्यात आलंय असं देखील या महोत्सवाला म्हटलं जातं.  


कोचर दांपत्यांच्या सुटकेच्या मागणीवर सुनावणी 


कोचर दांपत्यानं सीबीआयच्या कारवाईला हायकोर्टात आव्हान देत जेलमधून तात्काळ सुटकेची मागणी केली आहे. आयसीआयसीआय बँकेच्या माजी व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) चंदा कोचर आणि त्यांचे पती दीपक कोचर यांनी सीबीआयनं केलेल्या अटकेच्या कारवाईला हायकोर्टात आव्हान दिलं आहे. त्यावर उत्तर दाखल करण्यासाठी केंद्रीय अन्वेषण विभागानं (सीबीआय) मंगळवारी हायकोर्टाकडे वेळ मागितला होता. सीबीआयतर्फे जेष्ठ वकील राजा ठाकरे यांनी ही विनंती केली, त्यावर आज सुनावणी होणार आहे. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.