Aurangabad Crime News: औरंगाबाद शहरात धक्कादायक घटना समोर आली असून, एका तरुणाने तरुणीच्या अंगावर पेट्रोल टाकून स्वतःलाही जाळून घेतल्याचा प्रकार समोर आला आहे.  प्रेमप्रकरणातून हि घटना घडली असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. तर दोघांनाही पुढील उपचारासाठी औरंगाबादच्या शासकीय घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समोर आले आहे. गजानन मुंडे आणि पूजा साळवे अशी प्रेमीयुगुलाचे नाव आहे. 


याबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील झुलॉजी विभागातील संशोधक विद्यार्थी गजानन मुंडे आणि पूजा साळवे यांच्यात प्रेमप्रकरण होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात जमत नसल्याने दोघांमध्ये वादही झाले होते. त्यामुळे याबाबत पूजा साळवेने पोलिसात दोन-तीन वेळा लेखी तक्रारही दिली होती. परंतु पोलिसांकडून अदखलपात्र नोंद करण्यात आला आणि पूजाच्या तक्रारीची पोलिसांनी गांभीर्याने दखल घेतली नसल्याची खंत या मुलीच्या मैत्रिणींनी व्यक्त केली. 


अन् गजाननने घेतल पेटवून...


आज दुपारी महाविद्यालयात सुट्टी झाल्यावर पूजा साळवे प्राध्यापक कक्षात एकटीच बसली होती. हीच संधी साधून गजानन अचानक आतमध्ये घुसला आणि त्याने आतून कडी लावून घेतली. पुजाला काही कळण्याच्या आतच त्याने स्वतःच्या व तिच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून घेतले. स्वतःच्या अंगाला आग लागल्याने त्याने पुजाला मिठी मारली. त्यामुळे यात दोघेही भाजले. त्यानत्राची त्यांना तत्काळ घाटी रुग्णालयात हलविण्यात आले. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार मुलगा साधारण 70  तर मुलगी 30 टक्के भाजले आहे. 


पोलिसांची घटनास्थळी धाव...


याबाबत माहिती मिळताच बेगमपुरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तर पंचनामा करत घडलेल्या प्रकरणाची चौकशी केली. तर घटनेची गंभीरता लक्षात घेत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने घाटी रुग्णालयात जाऊन देखील परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर जखमी मुलीचा आणि मुलाचा जबाब देखील घेण्यात आला आहे. तर घाटी परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त देखील पाहायला मिळाला. 


विद्यापीठात खळबळ...


विद्यापीठ परिसरात रोज विद्यार्थ्यांची नेहमीच मोथिओ गर्दी असते. दरम्यान आज दुपारी एका तरुणाने स्वतः सह एका मुलीला पेटवून घेतल्याची बातमी संपूर्ण विद्यापीठात वाऱ्यासारखी पसरली. त्यामुळे सर्वत्र याचीच चर्चा सुरु होती. तर नेमकं काय घडलं हे जाणून घेण्यासाठी मुलं एकेमकांना फोन करून विचारत होते.