Separate Marathwada: स्वतंत्र विदर्भाच्या मागणी पाठोपाठ आता मराठवाडा (Marathwada) स्वतंत्र राज्य करण्याची मागणी पुढे येऊ लागली आहे. याच विषयामध्ये उद्या उस्मानाबाद जिल्ह्यात संवाद परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. विकासासाठी समर्पक निधी दिला गेला नाही, यामुळे मराठवाड्याला अविकसितपणाचा कलंक लागल्याचा आरोप केला जात आहे. तर गुणरत्न सदावर्ते यांच्या मार्गदर्शनाखाली या संवाद परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. 


मराठवाड्याचा भाग दुर्लक्षित ठेवण्यात आला असून, राजकीय नेतृत्वामुळे असे झाला असल्याचा आरोप होत आहे. मराठवाडा आणि विदर्भ जेव्हापासून वेगळा करण्यात आला तेव्हापासून आम्हाला विकासापासून दूरू ठेवण्यात आल्याचा देखील आरोप झाला. त्यामुळे यासर्व मागण्या घेऊन उद्या उस्मानाबाद येथे वेगळ्या मराठवाड्याच्या मागणीसाठी संवाद परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. 


आयोजकांनी दिलेल्या माहितीनुसार, मराठवाड्यावरील अविकसितपणाचा कलंक आणि द्रारिद्र्यपणा कायमचा नाहीसा करण्यासाठी अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्या मार्गदर्शनाखाली संवाद परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी 25 नोव्हेंबरला दुपारी 4  वाजता उस्मानाबाद येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात ही परिषद होणार आहे. तर संवाद परिषदेसाठी अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्यासह मराठवाडामुक्ती मोर्चाचे अध्यक्ष जे. के. जाधव, संस्थापक अध्यक्ष प्रा. बाबा उगले यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. याशिवाय स्वतंत्र मराठवाड्याच्या मागणीसाठी सक्रिय असलेले मराठवाडामुक्ती मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. संजयराव तायडे, डॉ. परमेश्वर गुट्टे, प्रदेश संघटक डॉ. भागवत नाईकवाडे, युवती प्रदेशाध्यक्षा अमृता चव्हाण, महिला प्रदेशाध्यक्षा विद्याश्री सूर्यवंशी, प्रदेश महिला सचिव शकिला पठाण यांचीही उपस्थिती राहणार आहे.


या मागणीसाठी परिषदेचे आयोजन...


मराठवाड्याला नेहमीच दुय्यम वागणूक मिळाली आहे. सुशिक्षित बेरोजगारांवर रोजगारासाठी मराठवाड्याबाहेर जायची वेळ आली. मराठवाड्याला सुजलाम् सुफलाम् करण्यासाठी मराठवाडा स्वतंत्र राज्य होणे अत्यंत गरजेचे आहे, याच मागणीसाठी सातत्याने संघर्ष गतिमान केला जाणार आहे. त्याच दिशेने संवाद परिषदेमध्ये ध्येयधोरणदेखील ठरणार आहे, अशी माहिती मराठवाडामुक्ती मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस अॅड. रेवण भोसले यांनी दिली.


राजकीय वातावरण पेटणार... 


गेल्या अनेक वर्षांपासून वेगळ्या विदर्भाची मागणी होत आहे. याला काही पक्षांनी पाठींबा दिला तर काहींनी विरोध केला आहे. त्यातच आता वेगळ्या मराठवाड्याची मागणी समोर येत असल्याने यावरून देखील राजकीय प्रतिक्रिया येण्याची शक्यता असून, त्यावरून राजकीय वातावरण तापणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे उस्मानाबादमध्ये उद्या होणाऱ्या संवाद परिषदेमध्ये नेमकी काय चर्चा होणार आणि कोणते निर्णय घेतले जाणार हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.