Aurangabad News: औरंगाबादच्या गंगापूर तालुक्यातील बगडी येथे गावकऱ्यांकडून रस्त्याच्या मागणीसाठी जायकवाडी धरणाच्या बॅक वॉटरमध्ये 'जलआंदोलन' करण्यात आले आहे. गोदावरी नदीकाठी असलेल्या शेतात जाण्यासाठी रस्ता नसल्याने शेतकऱ्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतोय. तर अनेकदा मागणी करून आणि पत्रव्यवहार करून देखील मागणी पूर्ण होत नसल्याने अखेर शेतकऱ्यांनी आज जलआंदोलन केले. यावेळी शेतकरी पाण्यात उतरल्याचे पाहायला मिळाले. 


बगडी येथील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी या गोदावरी नदीकाठी असून नदीला येणाऱ्या पाण्यामुळे, तसेच बॅकवॉटरचे (फुगवट्यातील पाणी) पाणी सतत आसपासच्या परिसरात व रस्त्यावर पसरते. त्यामुळे शेतात जाण्याकरिता असलेला रस्ता वाहून जातो. आजघडीला देखील शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी रस्ताच नाही. त्यात शेतात कापूस वेचणीसाठी आला असतांना पाण्यातून कसे जावे अशी अडचण शेतकऱ्यांसमोर निर्माण झाली आहे. त्यामुळे बगडी येथील महिलांना कापूस वेचणीसाठी थर्माकलच्या तराफ्याचा वापर करून पाण्यातून जीवघेणा प्रवास करीत शेत गाठावे लागत आहे.


दरम्यान ग्रामस्थांच्या वतीने दरवर्षी लोकसहभागातून येथे मुरूम टाकून तात्पुरता रस्ता तयार केला जातो. मात्र, गोदावरी नदीला येणाऱ्या पाण्याने हा रस्ता वाहून जातो. त्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या शेतीसाठी तराफ्याच्या साह्याने जीव मुठीत घेऊन पाण्यातून प्रवास करावा लागतो. तालुक्यातीलअनेक गावे जायकवाडी धरणाच्या पाण्यामुळे पुनर्वसित झाली आहेत. या धरणाला सुमारे 50  वर्षे उलटून देखील धरणासाठी जमिनी घेतलेल्या गावातील लोकांना शासनाच्या वतीने मूलभूत सुविधा अद्यापही मिळाल्या नाही. तर शेतकरी, ग्रामस्थांच्या या जीवघेण्या समस्येकडे प्रशासन व लोकप्रतिनिधीचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे रस्त्याच्या मागणीसाठी आज शेतकऱ्यांनी जलआंदोलन केले आहे. 


शेतकऱ्यांचे पाण्यात उतरून आंदोलन... 


रस्त्याच्या मागणीसाठी आज बगडी गावातील ग्रामस्थांनी जायकवाडी धरणाच्या बॅक वॉटरमध्ये उतरून  'जलआंदोलन' केले. यावेळी तरुण शेतकऱ्यांची देखील मोठ्याप्रमाणावर उपस्थिती पाहायला मिळाली. तर यावेळी जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. 'रस्ता आमच्या हक्काचा नाही कोणाच्या बापाचा', 'नदीवर पूल झालाच पाहिजे', 'झोपलेल्या प्रशासनाच करायचं काय खाली मुंडके वरती पाय', अशा घोषणा यावेळी आंदोलन करणाऱ्या गावकऱ्यांकडून देण्यात आल्या. 


शेतात जाण्यासाठी रस्ताच नाही...


जायकवाडी धरणासाठी गंगापूर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहण करण्यात आल्या आहेत. तर उरलेल्या जमिनीत शेतकरी शेती करून आपला उदरनिर्वाह करतात. मात्र अनकेदा अतिवृष्टी झाल्यास किंवा धरणाची पाणीपातळी वाढल्यास बॅकवॉटरचे पाणी रस्त्यावर येत असल्याने शेतात जाणारे रस्ते बंद पडतात. त्यामुळे हंगामात शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी रस्ताच नसतो. 


Aurangabad: प्रेमप्रकरणातून प्रेयसीसह स्वतः पेटवून घेणाऱ्या तरुणाचा अखेर मृत्यू; मुलीवर उपचार सुरु