Abdul Sattar: शिंदे गटातील मंत्री आणि उद्धव ठाकरेंच्या गटातील नेते एकेमकांवर आरोप-प्रत्यारोप करण्याची एकही संधी सोडत नाही. त्यातच कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची सतत मागणी केली जात आहे. या सर्व आरोपांवरच बोलतांना अब्दुल सत्तार यांनी विरोधकांना उत्तर दिले आहे. मुख्यमंत्री यांनी परवानगी दिली तर बुधवारपर्यंत मी राजीनामा देऊ शकतो. मात्र त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी देखील राजीनामा देऊन सिल्लोडमधून निवडणूक लढवून दाखवण्याची हिम्मत करावी असे अब्दुल सत्तार यांनी म्हंटले आहे. 


औरंगाबाद येथे माध्यमांशी बोलतांना अब्दुल सत्तार म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परवानगी देताच मी राजीनामा देण्यासाठी तयार आहे. मात्र चंद्रकांत खैरे आणि आदित्य ठाकरे यांनी माझ्याविरुद्ध निवडणूक लढवून सिल्लोडमधून विजय होऊन दाखवावे. गेल्या लोकसभा निवडणुकीत खैरे यांची जीलील यांच्यामार्फत मीच विकेट घेतली होती. आता खैरे चांदीचा गदा घेऊन फिरत आहे. मात्र त्यांच्या गेदेचा सामना करण्यासाठी आमची ढाल तयार असल्याचं सत्तार म्हणाले आहे. 


अब्दुल सत्तार आणि हिंदुत्व यांचा संबध काय? या प्रश्नाला उत्तर देतांना सत्तार म्हणाले की, जेव्हा मी उद्धव ठाकरेंच्या पक्षात होतो तेव्हा त्यांना मी हिंदुत्ववादी वाटत होतो. आता पक्ष सोडला म्हणून लगेच त्यांच्या दृष्टीने वाईट झालो का? असा टोला सत्तार यांनी यावेळी लगावला. 


केंद्रीय कृषिमंत्र्यांची भेट घेणार... 


यावेळी पुढे बोलतांना सत्तार म्हणाले की, केंद्रीय कृषीमंत्री  नरेंद्र सिंह तोमर हे पुण्याच्या दौऱ्यावर येणार आहे. त्यामुळे त्यांची भेट घेऊन राज्यातील अतिवृष्टीबाबत सर्व माहिती देणार आहे. तसेच राज्यातील नुकसानग्रस्त भागाची केंद्रीय पथकाने पाहणी करण्याबाबत त्यांच्याकडे मागणी करणार असल्याच सत्तार म्हणाले.